रिमझिम गिरे सावन ….

रिमझिम गिरे सावन…..
पावसाळा आला की पंख फुटतातच हो.
भरून आलेलं आभाळ, बहरून आलेली धरा ! प्रियेच्या आवेगाने धरित्रीकडे झेपावणाऱ्या वर्षेच्या धारा ! सगळंच कसं मोहून टाकणारं, वेड लावणारं. जणू काही कालिदासाच्या मेघदूतामध्ये वर्णिलेले त्या कामार्त यक्षराजाचे ते विरहवेडे दुतच ! यक्षाचा निरोप घेऊन त्याच्या प्रियेकडे (कि धरेकडे?) निघालेले ते मेघदूत !
निळे सावळे घन थरथरणारे
दंव्-बिंदूचे अन हळवे स्पंदन
विहग स्वरांचे सुखे मिरवती
शुभ्र क्षणांचा सुरेल मेणा…
आणि मिलनाच्या त्या आतुर, अधीर ओढीने अलगद स्रवणारी ती वसुधा, तिच्या जणूकाही स्तनसम पर्वतातून झरणारे ते निर्झर कुठल्याश्या अनामिक ओढीने , अज्ञात दिशेने, आवेगाने धावत सुटतात. आणि जिथून जिथून जातील तिथली धरा आपलं रूप पालटायला लागते, नटायला लागते. हिरवाईचा विलक्षण, संमोहक साज लेवून सज्ज होते. अगदी नजर पोचेल तिथपर्यंत हिरवेगार मखमली गालिचे अंथरलेले. केवळ जमीनच नाही, तर झाडे, वेली एवढेच नव्हे तर एखाद्या एकाकी, ओसाड, घराची एखादी जीर्ण पडकी भिंतसुद्धा हिरवीगार होऊन गेलेली असते या दिवसात. एखाद्या शुष्क वृक्षाला सुद्धा बांडगुळाच्या रुपात का होईना पण हिरवाई चिकटतेच. अगदी जातिवंत कुरुपतेलासुद्धा सौंदर्य मिळवून देणारी अशी ही या ऋतूची किमया.
पावसाची किमयाच काही अशी आहे की एरव्ही कमालीची रुक्ष, प्रॅक्टीकल, घड्याळाच्या काट्याला बांधलेली म्हणून ओळखली जाणारी मुंबई नगरी सुद्धा आपला नेहमीचा मुखवटा टाकून एखाद्या अल्लड़, नवथर तरुणीसारखी पूर्ण रंगात येते. अगदी सिमेंट काँक्रिटच्या इमारतीं सुद्धा गरत्या होतात आणि त्यांनाही हिरव्या शेवाळाची पोरं-बाळं लोंबू लागतात. पावसाच्या नुसत्या चाहुलीने सगळा आसमंत प्रसन्न, हिरवा होवून जातो. एकप्रकारचे चैतन्य वातावरणात पसरते. हवेत मृदगंधाचा मनमोहक सुगंध पसरायला लागते आणि अशा या स्वर्गीय वातावरणात कधी अचानक पावसाची रिमझिम संततधार भेटते…
अहाहा, यासारखे दुसरे सुख नाही. पावसाची साथ कुणाला नको असते? पण माणसाला हे क्षण जपून ठेवावेसे वाटतात. नभातून कोसळणारा पाऊस, चोहोबाजुला पसरलेली हिरवाई आणि “थांब, मी या पावसाला कैदच करून टाकते!” म्हणणारी चिंब प्रिया…, ती हिरवळलेली वसुधा ! स्वर्ग-स्वर्ग तो अजून काय असतो?
अश्या वेळी ती बरोबर असावी.  तुमच्याप्रमाणेच चिंब भिजलेली आणि त्या भिजण्याशी एक अनामिक नाते जोडून तुमच्याही श्वासात रुजलेली. पावसाची रिमझिम संततधार चालू आहे. आसमंतात मातीचा गंध पसरलाय. पावसाची रिपरिप, रस्त्यातल्या पाण्यातून चालताना पचाक-पचाक करत चपलीचे होणारे आवाज. जस्ट इमैजिन , अश्या या धुंद करणाऱ्या वातावरणाने आधीच आपली अवस्था ‘देता किती घेशील दो करांनी’ अशी झालेली असताना दुधात साखर म्हणून पार्श्वभुमीला लताबाईंचे प्रसन्न, तृप्त सुर असावेत.
रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाये मन
भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन
images (1)
१९७९ साली बासू चटर्जी नावाच्या एका मनस्वी कलंदराने चित्ररसिकांना एक देखणे स्वप्न दाखवले. १९६५ साली आलेल्या  ‘आकाश कुसूम’ नामक एका बंगाली चित्रपटाच्या कथेशी साधर्म्य सांगणारा ‘मंझील’ हा चित्रपट बासुदांनी चित्र रसिकांसाठी पडद्यावर आणला. अमिताभ बच्चन आणि  मौशुमी चटर्जी असे भन्नाट कास्टिंग होते.
तो काळ अमिताभच्या करियरच्या सुरुवातीचा होता. हळुहळु त्याचे नाव व्हायला लागले होते. पण अजुनही बच्चन पुर्णपणे त्याच्या १९७५ सालच्या अँग्री यंग मॅन विजयच्या आहारी गेलेला नव्हता. अजुनही वेगवेगळ्या विषयावरचे , त्याच्या प्रगल्भतेला आव्हान देणारे चित्रपट करत होता. त्यात समोर मौशुमीसारखी देखणी आणि तितकीच अभिनयसंपन्न रुपगर्विता अभिनेत्री होती. बासुदांसारखा हात लावेल त्याचे सोने करणारा परीस होता. त्यातून जे काही निर्माण झालं ते नितांत सुंदर होतं. चित्रपटाच्या कथानकाबद्दल बोलण्यासारखं फार काही नाहीये. तशीही मंझीलची कथा सर्वांना माहीत आहेच. एका सर्वसाधारण, सामान्य माणसाची , त्याच्या आयुष्याशी मांडलेल्या संघर्षाच्या साक्षीने फुललेली प्रेमकथा होती ती. अमिताभच्या अभिनयाचे खुप कौतुक झाले या चित्रपटासाठी. मौशुमीचे काम तर अप्रतिमच झाले होते. पण या चित्रपटाचा युएसपी होता तो म्हणजे पंचमदांचे संगीत. सोबतीला लताबाई, आशाबाई आणि अर्थातच “द किशोर कुमार”! या चित्रपटातले बाकी काही जरी लक्षात राहिलेले नसले तरी हे एक गाणे मात्र पंचमदा, लताबाई आणि किशोरदा या त्रिकुटाने अजरामर करून टाकलेले आहे. आज जवळपास ३९ वर्षानंतर सुद्धा पावसाची गाणी आठवायची म्हटले की ओठावर येणार्‍या पहिल्या ओळी असतात….
images

रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन……..
एवढी या गाण्याची जादू, त्याची गोडी अमिट आणि अवीट आहे. या गाण्याचे वैशिष्ठ्य म्हणजे चित्रपटात हे गाणे दोनदा येते. एकदा लताबाईंच्या आवाजात, तर एकदा किशोरदांच्या. किशोरदांच्या आवाजातील गाणे हे अमिताभच्या तोंडी एका घरगुती मैफलीत चित्रीत झालेले आहे. नुसते डोळे बंद करून गाणे अनुभवायचे झाले तर किशोरदांच्या आवाजातील हे गाणे म्हणजे एक कानांना एक मेजवानी ठरते. पण माझ्यासारख्या पाऊसवेड्या लोकांसाठी यापेक्षाही लताबाईंच्या आवाजातील गाणे हे जास्त सुखद आणि पुन्हा-पुन्हा ऐकावेसे वाटणारे आहे.
पहले भी यूँ तो बरसे थे बादल
पहले भी यूँ तो भीगा था आँचल
अब के बरस क्यूँ सजन, सुलग-सुलग जाए मन
भीगे आज इस मौसम में…

लताबाईंच्या व्हर्जनचे वैशिष्ठ्य आहे ते या गाण्याचे चित्रिकरण. बहुदा पावसातली गाणी हि स्टुडीओमध्ये कृत्रिम पाऊस निर्माण करून चित्रीत केली जातात. पण या गाण्यासाठी बासुदांनी कृत्रिम पावसाचा वापर न करता खर्‍याखुर्‍या पावसातच शुटींग करायचा निर्णय घेतला होता. माझे एक जिवश्च कंठश्च स्नेही श्रीयुत अतुल ठाकूर यांचे या गाण्यावर विलक्षण प्रेम आहे आणि तितकेच आमच्या मुंबईवर सुद्धा. रादर मुंबईवरचे प्रेम हा आम्हा दोघांच्या मैत्रीचा एक महत्त्वाचा समान मुद्दा आहे. अतुलभाऊ म्हणतात, “मुंबईबद्दल अनेकांची अनेक मते आहे. तिच्या रुक्षपणाबद्दल, वक्तशिरपणाबद्दल, तिच्या प्रॅक्टीकल लाइफबद्दल अनेक जण करवादतात सुद्धा. पण पावसात मुंबई विलक्षण देखणी दिसते याबद्दल कुठलेही दुमत नसावे. खरेच आहे. आणि या चित्रपटाचा काळ आहे १९७९ चा , जेव्हा मुंबई अजुनही आजच्या इतकी गजबजलेली नव्हती. अजुनही इमारतींची इतकी गर्दी वाढलेली नव्हती. अजुनही मुंबईत भरपूर झाडे आणि मोकळे , श्वास न कोंडलेले रस्ते होते. पुलंनी सर्व बलाढ्य शहरांमध्ये फक्त मुंबई ही स्त्रीलिंगी आहे हे नमुद केले आहे. या देखण्या मुंबईला आणखी देखणेपणाने सादर केले आहे बासु चटर्जींनी आपल्या या चित्रपटातील या गाण्यात.

unnamed

या गाण्यात या जोडीला नुकताच आपल्यातील नव्या, गोड नात्याचा साक्षात्कार झालेला आहे. प्रेमात पडलेल्या माणसाला आपोआपच आजुबाजुची सगळी सृष्टीच सुंदर वाटायला लागते. आजुबाजुला कोकिळ गात असल्याचा भास व्हायला लागतो. तशात जर पावसाची रिमझिम संततधार सोबतीला असेल तर तो आनंद, ते समाधान दुप्पट होवून जाते. सगळी धरा जणू आपल्यासाठी हिरव्या पायघड्या घालून बसलीय असा भास व्हायला लागतो. या आधी सुद्धा पाऊस पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे. पण तो इतका सुंदर नव्हता. आता त्यात प्रेमभावनेचे अत्तर मिसळलेले आहे. त्यामुळे या आधीचा पावसाचा अनुभव आणि आत्ताचा अनुभव हा सर्वस्वी भिन्न अनुभव आहे त्या दोघांसाठीही. वरुन पाऊस कोसळतोय पण तरीही मनात मात्र प्रेमाची ऊब आहे.

आमचे मित्र अतुलभाऊ म्हणतात, “मी जेव्हा-जेव्हा हे गाणे पाहतो तेव्हा आणि त्यानंतर नेहेमीच हे गाणं ऐकताना मला पावसाच्या गारेगार सरी अंगावर कोसळत असल्याची अनुभूती येते. लताने आवाजात चिंब ओलावा आणुन ही गाणे गायले आहे अशातर्‍हेने वातावरणाची अनुभुती आवाजात देणारी दुसरी गाणी मला तरी चटकन आठवत नाहीत. पण ही अनुभुती येथेच संपत नाही. गाण्यात नुसता पाऊसच नाही तर एकमेकांच्या हातात हात घालुन प्रेमात अगोदरच चिंब भिजलेले प्रियकर आणि त्याची प्रेयसी देखिल आहेत. त्यांना पावसात भिजताना मनात लागलेल्या प्रणयाच्या आगीची अनुभुती येते आहे. कवी योगेश यांचे समर्पक शब्द या गाण्याला लाभले आहेत. “नेमेची येतो मग पावसाळा” तेव्हा हाच पावसाळा एवढा वेगळा का भासतो आहे हा प्रश्न प्रेयसीला पडला आहे.” गंमत म्हणजे यात हे गाणे अभिनेत्रीच्या तोंडी नाहीये. नायक-नायिका फक्त हातात हात घालून त्या पावसात उन्मुक्तपणे निसर्गाची मजा घेत आनंदी पाख्ररासारखे बागडताहेत. आणि पार्श्वभुमीला गाणे स्वतंत्रपणे वाजत राहतं.

“पहले भी यूं तो बरसे थे बादल, पहले भी यूं तो भीगा था आंचल, अबके बरस क्युं सजन सुलग सुलग जाये मन…”

पडद्यावर गाणे जरी कुणी गात नसले तरी गाण्यातील भावना प्रेयसीच्या आहेत असं कुठेतरी आपल्याला जाणवतं. एकुणच हे गाणे मौशमीच्या अमिताभबद्दलच्या मुग्ध भावना मुकपणे व्यक्त करतं.

इस बार सावन दहका हुआ है
इस बार मौसम बहका हुआ है
जाने पी के चली क्या पवन, सुलग-सुलग जाए मन
भीगे आज इस मौसम में…

मनात जागृत झालेल्या प्रेमाग्नीमुळे हा पाऊस काही वेगळाच भासतोय तिला. सगळा निसर्गच बहकला असल्याची भावना होतेय. या गाण्याचे अजुन एक वैशिष्ठ्य म्हणजे थेट खर्‍याखुर्‍या स्पॉटवर केलेले चित्रिकरण. यात कुठेही स्टुडिओमधली कृत्रिमता नाहीये. सगळे चित्रिकरण थेट मुंबईच्या रस्त्यांवर केलेले आहे. सत्तरच्या दशकातील देखणी मुंबई गाण्यातून डोकावत राहते. पावसाच्या संततधारेत भिजलेली, गारेगार करणार्‍या वार्‍यात रमलेली मुंबई या गाण्यात जाणवत राहते. मुंबईत कोंक्रिटचे साम्राज्य निर्माण होण्यापूर्वीच्या देखण्या इमारती, अजुनही अधुन मधुन डोकावणार्‍या छोट्या-छोट्या बंगल्या. रेनकोट घालून पावसात भिजत शाळेला जाणारी छोटी छोटी मुले, छत्र्या घेवून ओफिसला निघालेले सामान्य मुंबईकर, उधाण आलेला समुद्र, पावसाचे पाणी उडवत भर्रकन जाणार्‍या देशी-विदेशी गाड्या आणि या सगळ्यातून जणुकाही आपण त्या गावचेच नाही अश्या भावनेने आजुबाजुची सर्व सृष्टी विसरून आपल्याच विश्वात रममाण झालेले नायक-नायिका. यात जोडीला असते पंचमदांचे अवीट संगीत आणि लताबाईंचा दैवी आवाज.

हे गाणे इथे ऐकता येइल…

https://g.co/kgs/DDmc8f

पण खरं सांगू, मला हे गाणे आवडते ते बासुदांच्या जगावेगळ्या रोमँटिसिझममुळे. भले ही हे गाणे चित्रपटाच्या नायक-नायिकेवर चित्रीत झालेले असेल पण बासुदांचे दिग्दर्शन इतके मनस्वी आणि साजिरे आहे की गाण्यातून आपल्याला क्षणोक्षणी अजुन एक वेगळीच प्रेमकहाणी जाणवत राहते. पाऊसवेड्या धरित्रीची आणि प्रियेला भेटायला आतूर झालेल्या प्रेमातुर पावसाची. जलमय झालेल्या सृष्टीची, जागोजागी साचलेल्या पावसाच्या पाण्याची.

पानोपानी तरुवेलींची
घेत चुंबने सुटला पाऊस
स्पर्शाने मोहरली वसुधा
गात्रोगात्री रुजला पाऊस

निसर्गाच्या नाना कळा, नाना रंग , विविध रूपे. निसर्ग जेव्हा आपल्याच लहरीत, स्वतःच्याच तालावर डोलायला लागतो ना, तेव्हा त्याच्या लीला , त्याची रूपे पाहण्यासारखी असतात. त्यातही त्याचा मुड आनंदी असेल तर मग सगळे विश्वच सुंदर होऊन जाते. मग अगदी एखाद्या शुष्क, पर्णहीन वृक्षाला सुद्धा एक वेगळेच सौंदर्य प्राप्त होते. पावसाळा म्हणजे अशीच पर्वणी असते.  पाऊस जर फार मोठा नसेल ना तर त्या पावसाची एक वेगळीच गंमत असते. मातीला एक जीवघेणा , वेड लावणारा गंध सुटलेला असतो.पावसाच्या आगमनाने वसुधा जणुकाही मोहरून गेलेली असते. अश्यावेळी मला सानेकरांच्या ओळी आठवतात.

उनाड पाऊस, अशांत पाऊस, अधीर भिरभिणारा पाऊस
निरोप घेऊन आभाळाचा भटके हा बंजारा पाऊस

पावसाचा तो अधीरेपणा सांभाळत, जणुकाही मेघांचा तो निरोप घेवून पृथ्वीकडे झेपावणार्‍या त्याच्या थेंबा थेंबातून त्याची आतुरताच झळकत असते. त्याचे थेंब पृथ्वीवर पोचले रे पोचले की त्यांच्या स्पर्शाने ओलावलेले रस्ते तो गंध घेवून सगळीकडे पसरवण्याच्या कामात व्यग्र होवून जातात. वारा आपल्याबरोबर जिथे जाईल तिथे पावसाच्या आगमनाची द्वाही घेवून जात राहतो. आणि कवि योगेश गौड यांच्या देखण्या ओळींना पंचमदांचा दैवी स्वरसाज लेवून जन्माला आलेले हे गाणे आपल्या गात्रागात्रांतुन, मनाच्या प्रत्येक स्तरावर हळुहळू झिरपत चित्तवृत्तीतून सतारीचे स्वर झंकारायला लागते….

रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाये मन
भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन !
पुढचे काही महिने सगळी वसुंधरा आपल्या प्रियाच्या समवेत प्रणयाराधन करत सगळ्या सृष्टीला प्रेममय करण्यात रममाण झालेली असते.
धन्यवाद.
विशाल विजय कुलकर्णी, पनवेल. ९९६७६६४९१९

3 thoughts on “रिमझिम गिरे सावन ….”

  1. khup chaan varnan kelay … he gaana eiktana punha navyane premat padavasa
    watate …. te zopalyawachun zulayche divas athavtaat

    loved it

    2018-07-01 20:26 GMT+05:30 ” ऐसी अक्षरे मेळवीन !” :

    > अस्सल सोलापुरी posted: “रिमझिम गिरे सावन….. पावसाळा आला की पंख फुटतातच
    > हो. भरून आलेलं आभाळ, बहरून आलेली धरा ! प्रियेच्या आवेगाने धरित्रीकडे
    > झेपावणाऱ्या वर्षेच्या धारा ! सगळंच कसं मोहून टाकणारं, वेड लावणारं. जणू काही
    > कालिदासाच्या मेघदूतामध्ये वर्णिलेले त्या कामार्त यक्षराजाचे ”
    >

    Like

  2. कितीही वेळा पाहिले तरी सतत नवी खुमरी असणारे हे द्वन्द गीत आहे. रसग्रहणाबद्दल आभार.
    मंज़ील, गोलमाल, छोटीसी बात यात चित्रित केलेला काळ व प्रसंग मनात कायमचे बसले आहेत व तेसगळ्याना फारच आपलेसे वाटतात.

    Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s