कुठल्याही देशासाठी त्यांचे लष्कर हा अतिशय अभिमानाचा आणि आत्मविश्वासाचा विषय असतो. रस्त्याने जाताना कुणी मिलिटरी, नौसेना अगर वायुसेनेचा जवान अथवा अधिकारी दिसला की मान आपोआपच आदराने लवते. कारण देशाचे सैन्य, देशाचे सैनिक हे काय्म देशाच्या पर्यायाने देशातील नागरिकांच्या सेवेसाठी आपले सर्वस्व पणाला लावत असते. मिलिटरी असो, नौसेना असे वा वायुसेना यापैकी कुठल्याही दलाचा विचार मनात आला की पहिली गोष्ट डोळ्यासमोर येते ती म्हणजे या विविध सैन्यदलांतर्फे पाळली जाणारी विलक्षण शिस्त, त्यांची शिस्तबद्धता. आपण येता जाता म्हणत असतो की माणसाला जर शिस्त लावायची असेल, शिकवायची असेल तर त्याला आयुष्यातले एक वर्षका होइना सैन्यात घालवायला हवे. आणि हे म्हणणे म्हणजे अगदीच अतिशयोक्ती नसते. या सर्व सैन्यदलांत पाळली जाणारी शिस्त ही कायम सर्वसामान्य नागरिकांच्या अभिमानाचा, आदराचा विषय असते. आपल्यासाठी ते शिस्तीचे आदर्श असतात. आपण आपल्या मुलांना शिस्तीबद्दल सांगताना, शिकवताना देखील नेहमी सैन्याचे, एन्.डी.ए. आणि तत्सम सैन्य प्रशिक्षण संस्थांचे उदाहरण देत असतो. पण गेल्या काही वर्षात काही वेगळेच चित्र पाहायला मिळते आहे. काही वर्षापुर्वी देहुरोड भागत मद्यधुंद लष्करी जवांनाच्या एका गटाने घातलेल्या गोंधळाची बातमी प्रसिद्ध झाली होती. ती आठवण जरा जुनी होत नाही तोवर आता कालची पुण्यातील संभाजी पुलावरील घटना….
काल रात्री लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) ऑफिसर-कॅडेट्सनी लकडी पुलावर पोलिसांसह माध्यमांच्या प्रतिनिधींना मारहाण-शिविगाळ करीत मंगळवारी रात्री धुडगूस घातला. पुण्यातील डेक्कनजवळील लकडी पुलावर दुचाकी वाहनांना प्रवेश नाही, वाहतुकीचा गोंधळ होवु नये म्हणुन या मार्गावर दुचाकी वाहनांना मनाई आहे. दुचाकी वाहनांसाठी खास वेगळे मार्ग आहेत. लकडी पुलावर रात्री नऊ वाजेपर्यंत टू-व्हीलरला मनाई आहे. तरीही ‘सीएमई’तील हे अधिकारी-कॅडेट्स तेथून आले. ते पाहून संभाजी चौकीतील वाहतूक पोलिस आणि अधिकारीवर्गाने त्यांना अडविले. लकडी पुलावर दुचाकीला मनाई असल्याकारणाने त्यावेली तिथे ड्युटीवर हजर असलेल्या वाहतूक पोलिसाने त्यांचा रस्ता रोखुन त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या गाडीची किल्ली काढून घेण्यात आली. ते पाहून लष्कराच्या या अधिकाऱ्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी शिविगाळ करीत पोलिसांवर हात उचलला. त्या पोलीसाने हटकल्याचा राग येऊन या अधिकारी – कॅडेटसनी चक्क पोलीसांनाच मारहाण सुरु केली आपल्या इतर मित्रांना फोन करुन बोलावून घेतले. काही वेळातच ४०च्या वर सैनिकी विद्यार्थी हजर झाले आणि त्यांनी पोलीसांना तसेच उपस्थित माध्यमांच्या प्रतिनिधींनाही मारहाण आणि दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी त्या ठिकाणी आलेल्या वाहिन्यांच्या प्रतिनिधींचे कॅमेरे हिसकावून घेत फोडले. महिला पत्रकारांना अर्वाच्य शब्दांत दम भरण्यात आला. तसेच लष्कराच्या दहा गाड्यांचा ताफा मागवून दमदाटी करण्यात आल्याने या परिसरात रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते.
या प्रकारला विरोध करणार्या उपस्थित सर्वसामान्य नागरिकांनाही दमबाजी करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे हा प्रकार पाहून संतप्त नागरिकांनी या लष्करी अधिकाऱ्यांचा समाचार घेतला. दरम्यान, या अधिकाऱ्यांना ‘कुमक’ मागवून घेतली आणि काही वेळातच लष्करी पोलिसांच्या आठ-दहा गाड्या लकडी पुलावर दाखल झाल्या. संतप्त जमावासह पोलिसांशीही हुज्जत घालण्यास प्रारंभ करण्यात आला. अगदी हात काट देंगे वगैरे धमक्याही देण्यात आल्या. या घटनेचे मोबाईलने फोटो काढण्याचे प्रयत्न करणार्या सामान्य नागरिकांचे फोन हिसकावून घेण्यात आले. त्यातील मेमरी कार्ड काढून घेवुन मोबाईल फेकुन देण्यात आले.
या घटना लष्करी अधिकार्यांच्या माजोरीपणाचे तर द्योतक नाहीत ना? पुन्हा समस्या अशी आहे की लष्करी अधिकार्यांवर कसलीही कारवाई करण्याचा अधिकार पोलींसाना नाही असा लष्कराचा दावा असतो. त्याच्या जोरावर हे देशाचे तथाकथीत रक्षक हवा तसा धुडगुस घालायला लागतात. आता या अशा घटना अपवादात्मक असतात हे जरी खरे असले. तरी हे भारतीय लष्कराच्या परंपरेला आणि किर्तीला अतिशय घातक आहे.
या घटनेसंदर्भात लष्कराच्या प्रतिनिधींनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. प्रश्न असा आहे की यापद्धतीने कायदा हातात घेणार्या त्या मग्रुर सैनिकी अधिकार्यांवर – कॅडेटसवर काही कारवाई होणार की नाही? झाल्यास ती लष्करच करणार की पोलीस? अगदी ते भारतीय लष्कराचे सैनिक – विद्यार्थी असले तरी याच देशातील कायद्याच्या प्रतिनिधीवर हात उचलण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला? माझ्यामते तरी त्या सर्व विद्यार्थ्यांना – अधिकार्यांना पोलीसांच्या ताब्यातच देण्यात यावे आणि नागरी कायद्यानुसार त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. तुम्हाला काय वाटते?
संदर्भ :
१. दै. सकाळ – पुणे आवृत्ती
२. दै. महाराष्ट्र टाईम्स – पुणे ई आवृत्ती
विशाल कुलकर्णी
तेथे झालेला गोंधळ हा किल्ली काढून घेणे ह्या एका सकृतदर्शनी सामान्य परंतु अत्यंत महत्वाच्या कृती मुळे घडलेला आहे… जी कृती सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त असते ती तशीच सैनिकांसाठी लागू करता येत नाही… हा झाला विवेकी न्याय आणि घडलेला (अ)न्याय..
LikeLike
हो ना ! पण झालेली चुक मान्य न करता कायद्याच्या रक्षकांना मारहाण करणे, सर्वसामान्य नागरिकांना, माध्यमाच्या प्रतिनिधींना दमदाटी करणे , त्यांचे कॅमेरे फ़ोडणे हे कृत्य लष्कराच्या नावलौकिकाला निश्चितच कलंक निर्माण करणारे आहे. 😦
LikeLike
तो कलंक एकवेळ पुसता येईल पण ऐन युद्धाच्या वेळी तोफेत पाणी (सा)पडले तर दारुगोळा भिजेल त्याचे काय? आणि त्यामुळे युद्धात जर देश हरला तर काय आपण चीनला दोष द्यायचा…?
अहो, चीन या शब्दाचा अर्थच कापडाचा तुकडा असे आहे… त्या वस्त्राची शान ***नंगे को खुदा भी डरता है** वाले कैसे जान सकत हूँ?
पोलीसांचे ज्ञान आणि ***आतिथ्य*** कमी पडले ऐसे सरळ मान्य करणे भाग आहे…
LikeLike
लष्कराने आपले काम चोख बजावले आहे असा आमचा तरी निष्कर्ष आहे… पहा डोके खाजवून तुम्हांस काही वेगळे सापडले तर कायद्याच्या रद्दीत!
LikeLike
हे कोणी सांगितले तुम्हाला ? असे चालते हे कोणी सांगितले ?
जर पोलिस लष्कर भागात गेले आणि त्यांनी चुकून हेल्मेट घातले नसेल तर त्यांना दंड होतो. इथे त्यांच्या साठी वेगळा नियम नसतो. लष्करासाठी सायही सारखे असतात तर कायदासाठी नको का? उद्या तुमच्या घरात लष्कराचे अधिकारी घुसले आणि म्हटले कि तुमच्या घरात देशाला हानी पोहोचु शकणारे कागदपत्र आहेत आणि महाला शोधाशोध करायची आहे. तसे काही कागद पत्र नाही सापडले तर ते माफ करा बोलून निघून जातात आणि तुम्ही काही करू शकत नाही. पण हेच काम जर पोलिसांनी केले तर? तुम्ही तर संतापानी वेडे व्हाल. बरोबर आहे कि नाही? हि लोकशाही आहे हुकुमशाही किंवा लष्करशाही नाही आहे. हे जे झाले ते अत्यंत चूक आहे भले त्यात पोलिसांची चूक का असेनात
LikeLike
मी तुमच्या मताशी पुर्णपणे सहमत आहे कुणाल. ’असे चालते’असे मी म्हटलेले नाहीये, तर तसा लष्करी अधिकायांचा दावा आणि अरेरावी असते मी म्हटलेय. अशा घटना यापुर्वीही घडलेल्या आहेत. पबमध्ये प्रवेश दिला नाही म्हणून एक छोटा स्फ़ोट घडवून पबचे लोखंडी प्रवेशद्वार उडवून देण्याचे प्रकार घडलेले आहेत. मागे दापोडी पोलीस चौकीवर झालेला हल्लाही याच अरेरावी वृत्तीसे उदाहरण आहे. दरवेळी लष्कराकडून कारवाई करण्याची आश्वासने दिली जातात, पण ती आजपर्यंत पाळली गेलेली नाहीत.
आणी हे तर अजुन विद्यार्थीच आहेत. आजच काहीच नसताना जर एवढा उद्दामपणा आणि मस्ती आहे तर उदा अधिकार मिळाल्यावर ही मुलं कशी वागतील? किमान या बाबतीत तरी मी पोलीसांचा काही दोष आहे असे म्हणणार नाही. त्या विद्यार्थ्यांकडून चुक झाली होती, ती सरळपणे मान्य करुन त्यांनी माफ़ी मागीतली असती तर हे प्रकरण इतके पुढे गेलेच नसते.पण त्यांचा माज तरी बघा……
आणि केवळ पोलीसच नाही तर सामान्य नागरिक आणि पत्रकारांवर हल्ला करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. आणि संबंधित लष्करी अधिकारी त्याबद्दल काहीही बोलायला तयार नाहीत, फ़क्त माहिती घेवु एवढेच त्यांचेच उत्तर आहे.
खेदाची गोष्ट म्हणजे अशा घटना पोलीस कमिश्नर किंवा संबंधीत एस.पी. पदावरच्या लोकांनी गंभीरपणे घ्यायला पाहाजेत, पण त्यांच्यातच कमालीची उदासिनता आढळते. हा खरेतर समग्र पोईसखात्यावरचाच , पर्यायाने कायद्यावरचा हल्ला आहे. पोलीसांबद्दल काही प्रवाद, काही आरोप असले तरी एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी की कायद्याचे वहन करणारे कर्मचारी, रक्षक भ्रष्ट असु शकतात, कायदा कधीच भ्रष्ट नसतो. तो सगळ्यांना सारखाच लागु होतो, मग ते सामान्य नागरिक असोत किंवा लष्करी अधिकारी ! पण मुळातच इथे पोलीसांमधेही वरच्या स्तरावर कमालीची उदासिनता असल्याने ही प्रकरणे दाबुन टाकली जातात. यात भरडला जातो तो सामान्य पोलीस कर्मचारी. मग समोर कधी असे उद्दाम लष्करी अधिकारी असतात, कधी भ्रष्ट नेतेमंडळी तर कधी त्यांचेच वरीष्ठ पोलीस अधिकारी ! हे दुष्टचक्र कधी संपणार आहे कोण जाणे? 😦
LikeLike
ह्या विषयावर कायद्यात अजून कोणताही संदर्भ सापडणार नाही… अशी बरीच कामे अण्णा हजारेंकरिता मोकळी सोडली आहेत… मागच्या पिढीने… पुढची पिढी सध्या नक्की कोठे आहे?
LikeLike
दुर्दैवाने का होइना पण खरेय तुमचे म्हणणे. 😦
LikeLike
लष्कराने आजवर नेहमीच त्यांचे काम चोख पणे बजावले आहे. आक्षेप त्यावर नाहीच आहे. काल जी कृती त्या विद्या्र्थ्यांनी केली त्याला आमचा आक्षेप आहे. ते १००% चुकच आहे.
LikeLike
पोलीसांचे ज्ञान आणि ***आतिथ्य*** कमी पडले ऐसे सरळ मान्य करणे भाग आहे… पण जर ते विद्यार्थी असतील आणि नुसते अर्थार्जनार्थी सुरक्षा रक्षक नसतील तर तेही ह्यातून काहितरी शिकलेले असतीलच, जरी वरकरणी तसे भा(रत)स(रकार)ले नाही तरी… 🙂
LikeLike
ते सी.एम.ई. चे विद्यार्थी होते असेच कळले आहे. शिकले असतील यातुन काही तर चांगलेच आहे 😉
LikeLike
baabo!!!!!
avaghad aahe 😦
LikeLike
अवघड तर आहेच देवानु 😦
LikeLike
स्टिंग ऑपरेशन करणाऱ्यानी कानफटात बसली म्हणून ओरडण्याचे कारण नाही असे मला वाटते.
LikeLike
पोळीचे किती हि नालायक / हरामखोर / लाचखावू असले तर हि लष्कर विद्यार्थ्यांची कृती अतिशय निंदा जनक आहे. ह्याला बरोबर म्हणणे म्हणजे शाळेतील प्रिन्सिपल ने शिस्त / नियम शिकवतो म्हणून शिक्षकाला मारण्या सारखे आहे. दोघेही सारख्या दर्जाचे आहेत. काम ते दोघेही मुलांना शिस्त लावायचे करतात. नेयं हा सगळ्यांना सारखाच असला पाहिजे. मग तो प्रिन्सिपल असो कि शिक्षक कि विध्यार्थी .
LikeLike