Category Archives: सामाजिक कथा

चिकणी चमेली….

“ए हिरो वो देख, आ गयी तेरी ‘चिकनी चमेली’?”

राज्याने रोहनच्या पोटात कोपराने ढोसत खुसखुसत सांगितले तसे रोहनने त्या दिशेने पाहीले. चमेली नेहमीप्रमाणेच चमकत होती. साधारण गव्हाळ म्हणता येइल असा वर्ण, शार्प फिचर्स आणि नावाला साजेशी चमचम करणारी चंदेरी साडी. पदर कंबरेला खोचलेला, तोंड बहुदा तिचे नेहमीचेच जर्दा पान खाऊन लालभडक झालेले. रोहनकडे नजर जाताच तिने त्याला एक कचकचीत डोळा मारला आणि …

“रुक रे, आती मै अब्बीच!” असे म्हणत पुढच्या व्यक्तीकडे वळली.

“रोहन्या, तू पण ना, या जगाबाहेरचा आहेस साल्या. तूला सापडून सापडून ही चमेलीच सापडली? अबे भीक मागणारीच हवी होती तर त्यातही कोणीतरी ‘बाई’ शोधायची होतीस? हे काय? धड बाई ना बाबा?”

रोहन नुसताच हसला, तोवर चमेली समोर येवुन उभी राहीली होती.

“किंव रे चमडी? साले, अकेला होता है तो मेरे पिछे पिछे आके इधर उधर हात लगाने को मंगताय और मेरे चिकनेको मेरेइच खिलाफ भडकाताय क्या?”

चमेलीने आपली जेमतेम अडीच इंचाची छाती पुढे काढत एका हाताने राज्याच्या पृष्ठभागावर एक लाडिक फटका मारला आणि दोन्ही हात छातीसमोर आणत आपल्या परंपरागत पद्धतीने दोन खणखणीत टाळ्या वाजवल्या.

“किंव रे चिकणे, तेरे को बोला था ना ऐसे दोस्तोसें तो दुश्मन भले करकें!”

“चमेली, तु काय त्याच्याकडे ल़क्ष देते? तुला तर माहीती आहे ना त्याचा स्वभाव? तो असाच आहे. तुला पाहील्यावर तर त्याला अजुनच चेव येतो.”

रोहनने हसत हसत राज्याला शालजोडीतला दिला तसा राज्या हसायला लागला. बसस्टॉपवरील लोकांनी त्यांना बघून बघीतल्यासारखे केले. पहिल्या दिवशी जेव्हा चमेली या बस स्टॉपवर दिसली तेव्हा रोहनने तिला हाक मारुन जवळ बोलावले होते. त्यावेळी मात्र लोकांच्या, विशेषतः तरुण मुलींच्या नजरा पार विचित्र झाल्या होत्या. होणारच ना हो. एक देखणा, गोरा गोमटा अगदी सहा फुटी, एखाद्या ग्रीक देवतेसारखा दिसणारा तरुण तिथल्या इतक्या सुंदर मुली सोडून एका भिक मागणार्‍या हिजड्याशी एवढी जवळीक दाखवतो हे तसे थोडे विचित्रच होते.

इतरांचे सोडा, पहिल्या भेटीत राज्याची प्रतिक्रिया सुद्धा अशीच काहीशी होती. अर्थात ते साहजिकही होते म्हणा कारण राज्या गेल्या सहा महिन्यापासुन रोहनला ओळखत होता. बीडसारख्या तुलनेने कमी विकसीत जिल्ह्यातून शिक्षणासाठी म्हणून मुंबईला आलेला रोहन जागीरदार, राज्याचा रुम पार्टनर होता. अतिशय सरळ, सभ्य पण विदर्भ, मराठवाड्याचा असल्याने तो झटकाही त्याच्यात होताच. स्त्रीयांच्या बाबतीत अगदीच शामळु नसला तरी फार पुढारलेलाही नव्हता. अतिशय हुशार, अभ्यासु मुलगा. एकच दोष होता रोहनमध्ये तो म्हणजे त्याचं भावनाप्रधान कवीमन!

तसा रोहन कधीच कुणाच्या अध्यात्-मध्यात नसायचा. मुलींचे वावडे नव्हते त्याला पण स्वत:हुन ओळख करुन घेणे, त्यांच्या मागे पुढे रेंगाळणे असले प्रकार त्याच्या गावीही नसायचे. अगदी स्वतःहून ओळख करुन घेणार्‍या मुलींशीही त्याचे वागणे जेवढ्यास तेवढे. तसा तो उशीराच मुंबईत आला होता, कॉलेजचे प्रवेश कधीच संपलेले होते. पण बहुदा रोहनच्या वडीलांची पोहोच चांगली असावी, त्यामुळे त्याला कॉलेजला प्रवेश मिळून गेला होता. हॉस्टेल मात्र फुल्ल झालेले असल्याने तिथे दाळ शिजली नाही. पण कॉलेजमध्ये पहिल्याच दिवशी ओळख झालेल्या राजेश जगतापने त्याला आपली रुम (आणि भाडेही अर्थातच) शेअर करण्याची ऑफर दिली आणि त्याने ती सहज स्विकारली. तसा रोहन सधन घरचा. वडीलांचा छोटासाच पण स्वतःचा कारखाना होता. घरी लक्ष्मी पाणी भरत होती. पण या वेड्याला मुंबईची ओढ लागलेली. वडीलांच्या मागे लागुन त्याने मुंबईत कॉलेजला प्रवेश घेतला होता. येताना बाईक बरोबर घेवुन आलेला. पण एकदा राज्याबरोबर बसने प्रवास केला आणि गच्च भरुन वाहणार्‍या बसची मज्जा त्यालाही आवडायला लागली. त्यानंतर आठवड्यात किमान तीन दिवस बसने कॉलेजला जायचे हे ठरुनच गेले. गेले सहा महिने राज्या त्याचा सभ्यपणा अनुभवत होता. विशेषतः तरुण मुलींच्या बाबतीत हा मुलगा इतका सोवळा कसा काय राहु शकतो? तेही आपल्याकडे एवढे अ‍ॅसेट्स असताना? याचे राज्याला कोडे पडले होते. म्हणुनच परवा जेव्हा बस स्टॉपवर रोहनने चमेलीला हात केला तेव्हा राज्यापण शॉक झाला होता.

“रोहन…., आयला कॉलेजमध्ये इतक्या पोरी तुझ्या मागे लागताहेत. त्यांच्याकडे ढुंकूनही पाहात नाहीस आणि आज चक्क हा हिजडा? ”

तसा रोहन गालातल्या गालात हसला. या आणि अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया येणार हे माहीत होते त्याला. पण त्याचा स्वभावच असा होता की जे पटेल तेच करणार. दुनीया जाये तेल लेने……! पण नकळत तो त्या विचारातच हरवला. त्याला चमेलीशी झालेली पहीली भेट आठवली…..

तसे तर कॉलेज आणि रुम दोन्हीही अंधेरीतच असल्याने त्याचे नेहमी बसने किंवा बाईकनेच जाणे व्हायचे. पण त्या दिवशी तो बाबांच्या आग्रहावरुन लोकल ट्रेनने विरारला त्यांच्या एका स्नेह्यांच्या घरी गेला होता. तिथेच जेवण वगैरे झाले. परत येताना तसा बराच उशीर झाला होता त्याला. रात्री ११ वाजुन गेले होते. उलटे अंधेरीकडे जायचे असल्याने लोकल गाड्यांना फारशी गर्दी नव्हती. लोकलने मीरारोड ओलांडले आणि अचानक कसलास गलका ऐकु आला म्हणून त्याने आवाजाच्या रोखाने पाहीले. २-३ हिजडे मिळून आपल्यातल्याच एका हिजड्याला मारहाण करत होते.

“तेरेको कित्ते बार बोला, इदर नइ आनेका करके. तेरा इलाका अंधेरी है ना तो उदरीच धंदा करनेका, ये हमारा इलाका है, इदरकु फिरसे दिखी ना तो टांग तोड देगी मै तेरा. बोलके रखती पैलेसेच.”

एका साडी नेसलेल्या (गुडघ्यापर्यंत वर घेतलेली), पुर्णपणे पुरुषी दिसणार्‍या, गालावर दाढीची खुंटे बाळगणार्‍या हिजड्याच्या तोंडी ती स्त्रीयांची भाषा फार मजेशीर, काहीशी विचित्रही वाटत होती. ते तिघेही हिजडे तसलेच सांडच्या सांड दिसत होते. त्यातल्या त्यात ज्याला ते मारहाण होते तो हिजडा मात्र बर्‍यापैकी नाजुक होता. गोरापान, नाजुक चणीचा, देखण्या चेहर्‍याचा………

“अरे जमनामौसी, मै तो किसीसे मिलने गयी थी नालासोपारामें. धंदा करने नै आयी थी रे इदर.”

तो चौथा गयावया करुन त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होता पण ते त्या तिघा/तिघींच्या पचनी काही पडत नव्हते. तिघे मिळुन चौथ्याला मारहाण करतच होते. डब्ब्यातलं पब्लिक नेहमीप्रमाणेच आपण त्या गावचेच नाही अशा पद्धतीने तमाशा बघत होतं. शेजारचा माणुस मरत असेल तरी जोपर्यंत स्वतःला धक्का लागत नाही तोपर्यंत आपण त्या गावचेच नाही अशी वृत्ती असते. येथे तर चार हिजड्यांच्या आपापसातील भांडणात पडण्याचे त्यांना काहीच कारण वाटत नव्हते. सुरुवातीला रोहनने पण दुर्लक्षच केले. पण त्या तिघांचा जोर वाढतच चालला तसा त्याला राहवेना, तो उठुन मध्ये पडला.

“ए छोडो उसको, उसने बोला ना , वो यहा धंदा करने नही किसीसे मिलने आया था करके?”

तसा त्यांच्यापैकी एकाने त्याच्याकडे मोहरा वळवला. दोन्ही हातांनी टाळ्या वाजवत त्याने विचारले.

“ए चिकने, तेरी सगेवाली लगती है क्या रे ये चमेली?” तसं गाडीतलं पब्लिक हसायला लागलं. रोहन क्षणभर गोरामोरा झाला. पण लगेच त्याने स्वतःला सावरुन घेतलं.

“हो आहे ! या जगातला प्रत्येक माणुस माझा नातेवाईकच आहे. काय म्हणणं आहे? सोडा त्याला.” रोहनने बाह्या मागे सरकवल्या आणि तावा तावात पुढे झाल्या. तेवढ्यात पुढचं स्टेशन आलं, तसे रोहनचा रुद्रावतार पाहून त्या तिघांनी पळ काढला. जाता जाता एक जण पिंक टाकुन गेलाच तरीही….

“जिसको तू ‘त्याला, तो’ बोल रहा है ना, वो एक हिजडा है…., ना मर्द ना तो औरत! दुर ही रहना, फिर कभी देख लेंगे तेरेको.”

“सच तो कहा है साब उन्होने. मै तो हु ही एक हिजडा. ना मर्द ना औरत ! हम जैसोसे दुरही रहो आप. भले घरके लगते हो!”

इतका वेळ मार खाणारा तो चौथा विव्हळत म्हणाला. तसे रोहनने त्याला खांद्याला धरुन उठवले, तिथल्याच एका बेंचवर बसवले.

“इन्सान तो हो , मेरे लिये उतनाही काफी है!”

रोहन हसुन म्हणाला तशी त्याच्या डोळ्यात एक मिस्कील चमक परत आली.

“बंबईमे नये लगते हो बाबु…….!”

अंधेरी आलं दोघेही उतरुन आपापल्या दिशेने रवाना झाले. पण हे नातं इथेच संपायचं नव्हतं. पुढे कुठल्या ना कुठल्या ठिकाणी रोहनची आणि ‘त्या’ची भेट होत राहीली. कुठल्यातरी क्षणी मैत्री झाली. एक पुरुष आणि एक हिजडा या पलिकडे जावून दोन माणसे या पातळीवरची ती मैत्री होती. झोकुन देणं हा रोहनचा स्वभावच होता.

“ए चिकने, चल अपनी बस आ गयी.”

चमेलीच्या आवाजाची नक्कल करत राज्याने रोहनचा शर्ट खेचला तसा रोहन परत वर्तमानात आला आणि खांद्यावरची सॅक सांभाळत बसकडे धावला.

” रोहन्या, यार मला एक सांग, नक्की काय, म्हणजे कसलं रिलेशन आहे तुझं चमेलीबरोबर.” राज्याने न राहवून विचारले

“कसलं म्हणजे?” रोहनने डोळे मिचकावत उलट विचारले तसा राज्या गडबडला.

“म्हणजे…? म्हणजे… तसलं काही नसणार याची खात्री आहे मला. पण हे जरा विचित्रच वाटत नाही का तुला?”

“काय विचित्र आहे त्यात. मी ही एक माणुस आहे, तुही एक माणुस आहे, चमेलीही माणुसच ! मग जर तुझ्याशी माझी घनिष्ट मैत्री होवू शकते तर चमेलीशी का नाही?”

राज्या भडकला…..

“शब्दांचे खेळ नको खेळु माझ्यासोबत. तुझ्या चमेलीसोबतच्या नात्याला कसलेही ऑब्जेक्शन नाहीये माझे, तो तुझा व्यक्तीगत मामला आहे. पण एक मित्र म्हणून फक्त ते संबंध कश्या स्वरुपाचे आहेत हे जाणुन घ्यायची इच्छा आहे मला. तू जर त्या ‘कल्याणी’च्या प्रपोजलला सहमती दिली असतीस तर ते समजण्यासारखे होते. एक स्त्री आणि एक पुरुष यांच्यातील नाते समजण्यासारखे आहे. पण एक पुरुष आणि एक………. ! हे काहीतरी विचित्र आहे असं नाही वाटत तुला?”

त्यांच्याच क्लासमधली कल्याणी देशमुख, भावी कॉलेज क्वीन आत्तापासुनच हात धुवून रोहनच्या मागे लागली होती. पण रोहन काही तिला दाद द्यायला तयार नव्हता. त्या पार्श्वभुमीवर रोहनची चमेलीशी असलेली मैत्री जवळच्या सगळ्या मित्रांमध्ये चर्चेचा विषय होवू पाहत होती. राज्याला एकच भीती वाटत होती ती म्हणजे हे जर कॉलेजमध्ये पसरले तर त्याचा रोहनच्या करियरवर परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे तो आता थोडासा गंभीर झाला होता या विषयावर. ही वेळ कधी ना कधी येणार होतीच, त्यावर रोहनकडे स्पष्टीकरण पण तयार होते. राज्याने निर्वाणीने हा प्रश्न विचारला आणि स्वतःच्याही नकळत रोहन परत भुतकाळात शिरला….

त्यादिवशीच्या लोकलमधील भेटीनंतर बर्‍याच वेळा चमेलीची आणि त्याची भेट कुठे ना कुठे होत राहीली होती. कधी बस स्टॉपवर, कधी रेल्वे स्टेशनवर….. कधी असेच बाजारात फिरताना. अंधेरी ईस्ट हा चमेलीचा व्यवसायाचा इलाखा होता. सुरुवातीला थोडा टाळण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याच्या कायम काही तरी हटके शोधण्याचा आणि मग स्वतःला झोकुन देण्याचा स्वभाव त्याला चमेलीच्या बिनधास्त आणि बेफिकीर वागण्याकडे आकर्षित होण्यापासून रोखु शकला नव्हता. कुठल्यातरी क्षणी त्याच्या मनाने स्विकारले होते की चमेली एक चांगली मित्र होवू शकते आणि त्याच्यासाठी ते पुरेसे होते.

“तू प्रॉपर कुठली आहेस?’

“क्या करेगा जानकर? शादी बनायेगा मेरेसे? बच्चे तो हो नही पायेंगे.”

आपल्या नेहमीच्या बेफिकीर स्टाईलमध्ये चमेलीने उलट विचारले आणि रोहन एकदम कावराबावरा झाला. काय उत्तर द्यावे तेच सुचेना त्याला.

“ए चिकणे, डर मत्..मै तो ऐसेइच मजाक कर रैली थी! मै जानती है रे… आमच्या नशिबात हे शादी-बिदी काय नसतं राजा. साली सगळी जिंदगीच नशिबाला फितुर झालेली. गंमत म्हणजे नशिब पण आपलं आणि जिंदगी पण आपली,पण तरीही दोघापैकी कुणावरच आपला हक्क नाही राहीलेला. तेरेको मालुम ४ साल पैले एक ‘इन्सान’ मिला था………!”

“इन्सान? ते तर रोजच भेटत असतील तुला चमेली.”

“कहा यार…., चार साल पैले एक मिला था होर उसके बाद अब जाके तू मिला है! आमच्यासारख्यांच्या किस्मतमध्ये साले जानवरच ज्यादा होते है! इन्सान होते कहा है हमारे लिये?”

हसत हसत बोलणार्‍या चमेलीच्या आवाजातला दर्द अगदी सहजपणे रोहनच्या मनाला स्पर्षून गेला. आपली असहायता जाणवली आणि तो अजुनच अबोल झाला.

“अरे रोहन, तू तो एकदम , वो क्या बोलते है सेंटीमेंटल हो गया यार. मै तो ऐसेही मजाक कर रही थी!”

आपल्या शब्दातला काटेरीपणा कमी करण्याचा प्रयत्न करत चमेलीने रोहनची समजुत काढण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत काटा रुतायचा तो रुतला होताच.

त्यानंतरच्या भेटींमधुन कधीतरी रोहनला तिच्याबद्दल कळले होते.बिहारमधल्या कुठल्यातरी एका खेड्यातुन ती मुंबईत आली होती, रादर आणली गेली होती. एका अतिशय परंपरावादी मुस्लीम घराण्यात ती जन्माला आली होती. जन्मल्यानंतर काही काळातच तिच्यातला वेगळेपणा तिच्या आई-वडीलांच्या लक्षात आला आणि ती आपोआपच आई-वडीलांपासून दुर होत गेली. बिहारच्या त्या खेडेगावातील रुढीग्रस्त वातावरण, जुनाट परंपरां आणि रिती रिवाजांमध्ये अडकलेले कुटुंबीय साहजिकच तिच्यापासुन दुरावत गेले होते. पण तिच्या त्या तृतीयपुरुषी शरीरातले मन मात्र एका स्त्रीचे होते. तिला जरी तृतीयपुरुषी असण्याचा शाप मिळालेला असला तरी तिचं बाह्य शरीर मात्र एखाद्या स्त्रीप्रमाणेच डौलदार आणि आकर्षक होतं. त्रासात का होइना पण बालपण सहज संपलं, लाजेकाजेस्तव घरच्यांनी जगापासून ही बाब लपवून ठेवली होती. तिचं नावही नसीमन ठेवण्यात आलं होतं. पण सोळावं ओलांडलं आणि नियतीने दावा साधला……

यु.पी.-बिहारच्या च्या अजुनही सरंजामशाही मिरवणार्‍या खेड्यातून जे होतं तेच नसीमनच्या बाबतीत झालं. गावच्या मुखियाची नजर पडली आणि वयाच्या सतराव्या वर्षी सर्वात पहिल्यांदा नसीमनचं अपहरण झालं. मुखियाने मजा तर लुटलीच पण इतके दिवस लपवून ठेवलेलं गुपीत आता जगजाहीर झालं. लोकांच्या तिच्याकडे बघण्याच्या नजरा बदलल्या. गावातल्या रिकामटेकड्या टोळभैरवांना तर ‘नसीमन’ म्हणजे हक्काची सोय वाटू लागली. घरच्यांनी तर नावच टाकलं होतं. आपल्या माणसांपासून तुटलेल्या जमनाला चार वर्षांपुर्वी पहिला आधार मिळाला तो ‘चमन’चा. तिच्या आयुष्यात आलेला पहिला ‘इन्सान’. चमनने तिला आपल्याबरोबर मुंबईला आणलं……..

“तू यकीन नै करेगा रोहन, पर चमन मेरे साथ ब्याह रचानेवाला था! ”

“काय सांगतेस काय चमेली?” रोहनसाठी हा आश्चर्याचा धक्का होता. पण लगेच त्याच्या आवाजात संशय आला. “तुम्हे पक्का यकीन है? और था का मतलब?”

“वो यहा गोदीमें वर्कर था! हमारे बंबई आनेके बाद दुसरेही हप्तेमें एक कंटेनरके नीचे दब गया, मै फिरसे अकेली हो गयी! लेकीन रोहन, वो एक हप्ता मैने जिंदगीके सारे सुख भोग लिये थे……! हम पुरी बंबई घुमे, कभी लोकल ट्रेन, कभी बस, कभी पैदल….. बहोत खुश थी मै, लेकीन हसते रहना शायद मेरी किस्मतमें नही था!”

“फिर……….?”

“फिर क्या…, कोशीश तो बहुत की कुछ काम करनेकी, मेहनत करनेकी! पर लोगोंकी नजरे होर नियते फिसलते देर नही लगती! मुझे तो उपर वालेने बला का हुस्न दिया था! बदकिस्मतीसे, किसी तरहा जमनामौसी को मेरेबारेमें पता चलही गया! उसके बाद मुझे इनके गिरोह का मेंबर बनाया गया जबरन. दस दिन तक कमसे कम पच्चीस लोग मेरेको रोंदते रहे, किसी अनजान पलमें सारे अहसास मर गये…., उनके साथ वो नसीमनभी मर गयी !

वही मेरेको यें नया नाम मिला… “चमेली”!

शुरु शुरुमें भोत रोती थी मै…., कई राते जाग के निकाली है मैने उसके यादमें! लेकीन अब तो बस…. यही साली हरामकी जिंदगी है……! साले इतने जानवर भरे हुये है यहा की तेरे जैसे इन्सान कमही मिलते है! तू यकीन नई करेगा रोहन, लेकीन तेरा वो दोस्त, राजेश भी दो बार मेरे साथ ‘बैठ’ चुका है!”

चमेलीच्या डोळ्यात पाणे होते आणि रोहनच्या डोळ्यात प्रचंड आश्चर्य ! “राजेश?”

“यकीन नही होता ना? कभी पुंछ के देख उसको!”

“भोत सपने देखे थे मैने भी. तब कुछ समझता नही था. पास पडौसकी औरते जब उनके शोहर के बारेमें, बच्चोके बारेमें बाते करती थी, तो मै भी सोचती थी…. की कभी मेरीभी शादी होगी, प्यार करनेवाला शोहर होगा, बच्चे होगे. जब समझ आयी तो पहली बार जाना की ये सपने कमसेकम मेरे बारेमें तो कभी पुरे नही होनेवाले. भोत रोयी थी उस वक्त…. उसके बाद तो जैसे आँसुही सुख गये…!”

चमेलीने एक शुष्क नि:श्वास सोडला…… !

त्यानंतरच काही दिवसांनी ‘कल्याणी’ने रोहनला प्रपोज केले होते. खरेतर रोहनलाही कल्याणी आवडायला लागली होती. पण का कोण जाणे त्याने कल्याणीला स्पष्टपणे नकार देवुन टाकला. तो स्वतःच प्रचंड गोंधळलेला होता.

नक्की काय चाललय आपल्या मनात. हे कसलं द्वंद्व आहे. कल्याणी की चमे……

छे छे… काहीतरीच !

पण मग आपण कल्याणीला नकार का दिला?

कमॉन रोहन, स्वतःलाच फसवण्याचा प्रयत्न करु नकोस रे. त्याने तुलाच त्रास होणार आहे.

पण चमेली..? मग आई-बाबा? कस्सं शक्य आहे हे?

एक गोष्ट मात्र नक्की चमेलीने मनात घर केलय हे पक्कं !
…………
……………….
……………………..

“रोहन, रोहन्या… फोन वाजतोय तुझा. कोण पेटलाय बघ तरी जरा.”

राज्याचा आवाज ऐकला आणि रोहन वर्तमानात परत खेचला गेला. त्याने खिश्यातुन मोबाईल काढून कानाला लावला.

“हॅलो रोहन जागीरदार बोलतोय.”

“मी हवालदार डोइफोडे बोलतोय, डी.एन. नगर पोलीस चौकीतुन. तुम्हाला लगेच इथं चौकीवर यावं लागेल.”

“पण कशासाठी? मी काय केलय आणि फोन नंबर कुठे मिळाला तुम्हाला?”

“साहेब एका डेडबॉडीच्या खिश्यात एक मोबाईल सापडलाय. एक चिठ्ठीपण आहे, चिठ्ठीवरच मागे तुमचा नंबर लिहीलेला होता नावासकट. म्हणुन तुम्हाला फोन लावलाय.”

“डेडबॉडी?”

” अंधेरीतल्या एका हिजड्याची डेडबॉडी आहे साहेब. तुमच्या नावाने एक चिठ्ठी पण आहे.”

रोहनच्या हातातला फोन पडता – पडता वाचला. तेवढ्या बस कुठल्यातरी स्टॉपला थांबली. तसा रोहन धडपडत उठला आणि बस मधुन उतरला. अरे-अरे करत राज्याही त्याच्या मागे उतरला…

“रोहन, काय झालं? कुणाचा फोन होता? तु एवढा घाबरल्यासारखा का वाटतोयस?”

रोहनने काही न बोलता एक रिक्षा पकडली, तसा राज्याही त्याच्यामागोमाग रिक्षात शिरला.

रोहन गप्पच होता.

डी.एन. नगर पोलीसचौकीसमोर रिक्षा थांबली, रिक्षावाल्याच्या अंगावर १००ची एक नोट टाकत रोहन चौकीच्या आत धावला. चेंज परत घेण्यासाठी थांबावे की नको याचा विचार करण्याची पाळी राज्याची होती. पण रोहनला इतका घाबरलेला पाहून तोही तसाच त्याच्यामागे चौकीत पळाला.

“साहेब, मी रोहन जागीरदार !”

हवालदाराने त्याच्याकडे एकवार खालपासुन वरपर्यंत पाहीले.

“ह्म्म्म चांगल्या घरातले दिसता?”

“हवालदार साहेब, घरे सगळी चांगलीच असतात. त्यातली माणसे बरी वाईट असतात. तुम्ही मुद्द्याचे बोला. चमेली कुठे आहे?”

“म्हणजे तुम्ही त्या हिजड्याला ओळखताय तर. चला आमचा बाण अगदीच वाया गेला नाही तर…!”

“ती चिठ्ठी?”

हवालदाराने ती चिठ्ठी त्याच्या हातात सरकवली आणि एक रजिस्टर पुढे केले.

“इथे सही करा. चिठ्ठी अर्धवटच आहे. सुरुवात केली असावी पण नंतर बहुदा विचार बदलला असावा म्हणून अर्धवटच सोडून दिलीय. तारिख किमान ४ दिवसांपुर्वीची आहे. मघाशी समोरच्या चौकात एका ट्रकने उडवले, जागच्या जागी खल्लास. मेंदुच बाहेर आला होता. बॉडी क्लेम करायची असेल तर उद्या संध्याकाळी या हॉस्पिटलमध्ये. ”

हवालदाराने अतिशय कोरड्या स्वरात सांगितले, त्याच्यासाठी असे अपघात नेहमीचेच होते. खरेतर त्याने एवढेही श्रम घेतले नसते, पण चमेलीकडे सापडलेली ती चिठ्ठी त्याने वाचली असावी बहुदा….

प्यारे रोहन,

प्यारे या शब्दावर काट मारलीय क्युंकी मै उस काबिल नही. जब भी तुम्हे देखेती हुं, मुझे मेरे चमनकी याद आती है! दो ही तो ‘इन्सान’ मिले थे जिंदगी में…एक ‘वो’ होर एक ‘तू’ ! कभी कभी लगता है , कही मेरेको तुमसे प्यार तो नही हो गया! साला ये दिलभी अजीब हिमाकती है, इतनी ठोकरे खायी, फिरभी आस नही मिटती! लिख तो रही हुं लेकीन मुझे नही लगता कभी ये चिठ्ठी तुम्हें देने की हिंमत भी कर पाऊंगी या नही? काश, तुम्हारी तरह मै भी नॉर्मल इन्सान होती….!

दिल तो बहुत करता है की शादी होती, बच्चे होते तो कितना मजा आता जिंदगी में ! लेकीन साली अपनी जिंदगी भी ….. , खाली बोतल की तरह……!

एक बात बताऊ चिक…………”

इथुन पुढे काहीच लिहीलेले नव्हते, आणि आता कधीही लिहीले जाणार नव्हते.

रोहनचा चेहरा वेदनेने पिळवटुन गेल्यासारखा दिसत होता. डोळे भरुन आले होते. हवालदार आश्चर्याने एकदा रोहनकडे तर एकदा राज्याकडे पाहात होता. एका लावारिस हिजड्यासाठी डोळ्यात पाणी आणणारा तरुण त्याने प्रथमच पाहिला होता. रोहनचे डोळे सारखे सारखे त्याच ओळींवरुन फिरत होते.

दिल तो बहुत करता है की शादी होती, बच्चे होते तो कितना मजा आता जिंदगी में ! लेकीन साली अपनी जिंदगी भी ….. खाली बोतल की तरह…...”

त्याने मनाशी काहीतरी निश्चय केला…..

“राज्या, खिश्यात किती पैसे आहेत तुझ्या? माझ्याकडे अडीच-तीन हजार आहेत. ”

राज्याने खिसा चाचपला, हजारभर निघाले त्याचाही खिश्यात.

“यात सोन्याच्या दोन वाट्या आणि काळे मणी नक्कीच येतील.चल……..”

रोहन उत्साहात बाहेर पडला, राज्याने काहीच न कळल्यासारखा त्याच्यामागे बाहेर पडला.

हवालदाराने समाधानाने आपल्यासमोरचे रजिस्टर मिटले. चमेली आयुष्यभर एक हिजडा म्हणून जगली होती, पण मेल्यानंतर का होइना सौ. चमेली रोहन जागीरदार म्हणून सुखाने सरणावर चढणार होती.

समाप्त.

विशाल कुलकर्णी

नाते

“आई, मग काय विचार केलास तू? की अजुनही तुझा हट्ट कायमच आहे?” तन्मयने काकुळतीला येवुन विचारले.

“नाही, तेवढं सोडून बोला. हे मी कधीच मान्य करणार नाही.” गायत्रीबाई आज अगदी हट्टालाच पेटल्या होत्या.

“आई, पण का आणि कशासाठी हा हट्ट? आम्हा पोटच्या पोरांपेक्षा तुझा हा शंभु तुला जास्त प्रिय आहे का? आणि आम्ही जे काही करतोय ते आपल्या सगळ्यांच्या हितासाठीच करतोय ना?” चिन्मय गेल्या चार दिवसात प्रथमच या वादात पडला होता.

“यात कसलं हित साधणार आहात तुम्ही? शंभुमुळे चार माणसं येतात, एकत्र जमुन बोलतात. एकमेकांची सुख-दु:खे वाटून घेण्याचा प्रयत्न करतात. तर त्यात आपल्याला किंबहुना तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? प्लीज एक ल़क्षात ठेवा, जसे तुम्ही माझी मुले आहात तसेच शंभुदेखील माझे अपत्यच आहे. तुमच्याएवढा सक्षम नसेल तो, पण कदाचित म्हणुनच तो मला जास्त प्रिय आहे. म्हणतात ना आईला आपले सगळ्यात दुबळे मुलच जास्त जवळचे असते, तसं समजा हवं तर. हे बरंय तुमचं, त्याला बिचार्‍याला काही बोलता येत नाही, तो तुम्हाला विरोध करू शकत नाही म्हणुन केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आज तुम्ही त्याला घालवायला निघाला आहात. हे मला मान्य नाही. कृपया कुणीही शंभुला माझ्यापासुन दुर करण्याचा प्रयत्न करु नका. मला ते कधीही मान्य होणार नाही.”

गायत्रीबाई आपल्या निर्णयावर ठाम होत्या.

“मी मधे बोलु का थोडे तन्मय?” तनयानेही संभाषणात भाग घेतला.

तन्मयने प्रश्नार्थक मुद्रेने तनयाकडे पाहीले…., त्याच्या कपाळावरच्या आठ्या जाणवल्या तशी तनया गप्प झाली.

“बोल, कदाचित तुझे तरी ऐकेल ती?”

“मी काय म्हणते तन्मय, जर समजा शंभु राहीला इथेच आपल्याबरोबर तर काय हरकत आहे? काय गं चिन्मयी तुला काय वाटते?”

तनयाने चिन्मयीकडे, आपल्या जावेकडे बघत विचारले. तशी चिन्मयीने होकारार्थी मान हलवली.

“मला पटतेय वहिनी तुमचे म्हणणे.”

“काय्य? तनु..आता तू सुद्धा? अगं त्याच्यामुळे बाहेरची कितीतरी माणसे आपल्या घराच्या आवारात येत राहतात. बाबा होते तोपर्यंत ठिक होतं पण आता आई एकटीच असते. कधी काही भलतं सलतं घडलं तर?”

“दहा वर्षे झाली त्यांना जावून! काही झालय का या दहा वर्षात? तूझ्या मनात उगाचच भलते सलते विचार येताहेत हा तनु!” गायत्रीबाई पुन्हा कुरकुरल्या.

“काळजी वाटते गं आई! आम्ही सगळेच तिकडे लांब अमेरिकेत. तू एकटीच असतेस इथे. तुला तिकडे ये म्हणलं कायमची तरी येत नाहीस. मग तिथे कायम आम्हाला काळजी लागुन राहते गं!”

तन्मयची काळजी खरोखर जेन्युइन होती. त्याचं बोलणं ऐकलं आणि गायत्रीबाई हलकेच हसल्या.

“अरे वेड्या, मला कळत का नाही? पण या वास्तुत त्यांच्या सगळ्या आठवणी आहेत रे? शंभुलादेखील तेच घेवुन आले होते. त्यांचा खुप जीव होता शंभुवर. त्यामुळे तर आता त्याला दुर करणे जिवावर येतेय राजा.”

गायत्रीबाई आपल्या यजमानांच्या आठवणीने हळव्या झाल्या. तसे तन्मय हलकेच पुढे येवून त्यांच्या शेजारी बसला, त्याने आपले डोके त्यांच्या खांद्यावर हळुवारपणे टेकवले.

“ठिक आहे आई, तुच सांग काय आणि कसे करायचे ते? शंभुची कशी व्यवस्था करायची ते?”

गायत्रीबाईंनी हळुवारपणे आपले दोन्ही डोळे मिटून घेतले आणि हळु-हळु भुतकाळात शिरण्याचा प्रयत्न करू लागल्या.

**********************************************************************************************************

साधारणतः दोनेक दशकांपुर्वींचा काळ….

श्री. दिवाकर सबनीस आणि त्यांची पत्नी गायत्री, त्यांची दोन मुले तन्मय आणि चिन्मय असं सुखी, समाधानी चौकोनी कुटुंब.

दिवाकरराव स्टेट बँक ऑफ इंडियात ब्रांच मॅनेजर म्हणून कार्यरत होते. नाशकात छावणीच्या भागात सुरेखसा छोटेखानी बंगला होता. दोन्ही मुले अतिशय हुशार होती. मोठा तन्मय एम.टेक. करून अमेरिकेला गेला आणि धाकट्या चिन्मयने आय.आय.एम. करुन यु.एस. मध्येच एका मोठ्या कंपनीत नोकरी पटकावली. त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात दोघेही दिवसें दिवस प्रगती करत होते. नंतर हळु हळु दोघांचीही लग्ने झाली अगदी आई वडीलांच्या पसंतीने, भारतीय पद्धतीप्रमाणे. दोघे ही आपापल्या क्षेत्रात स्थिरावले होते. सुरेख चालले होते दिवस….

सुरूवातीचे काही दिवस खुप छान होते. आनंदाचे होते. आमची दोन्ही मुले परदेशात चांगल्या ठिकाणी, चांगल्या हुद्द्यावर आहेत. ही भावना दिवाकरराव आणि गायत्रीताई दोघांनाही विलक्षण सुखावून टाकत असे. नातेवाईकांना, आप्तांनाही त्याबद्दल एक प्रकारचे असुयायुक्त कौतुक वाटायचे.

जेव्हा बरोबर काम करणारे गांगल म्हणायचे…

“तुम्ही मोठे नशिबवान हो, दिवाकरराव. तुमच्या दोन्ही चिरंजिवांनी नाव काढले तुमचे. दोघेही एवढ्या मोठ्या कंपन्यातुन , इतक्या मोठ्या हुद्द्यावर काम करताहेत. तुम्हाला एकदम कर्तव्यपुर्ती झाल्यासारखे, अगदी कृतार्थ वाटत असेल नाही?”

हे ऐकले की दिवाकररावांचे मन आपल्या मुलांबद्दलच्या अभिमानाने भरुन यायचे. दिवस कसे भरकन उडून गेले कळायचेच नाही. कालपर्यंत अंगा-खांद्यावर खेळणारी, छोट्या छोट्या गोष्टींसाठी हट्ट करणारी ही मुले किती मोठी झाली. साता समुद्रापार भविष्य उजळायला निघून गेली. याचे त्यांना खुप कौतुक वाटायचे. पण जसजसे दिवस जायला लागले, मुले त्यांच्या करियरमध्ये व्यस्त होत गेली तसे फरक जाणवायला लागला. आधी सहा महिन्यातून एकदा भारतात चक्कर मारणारी मुले…मग तो कालावधी हळुहळु ९ महिने, मग १ वर्ष मग कधी त्याहीपेक्षा जास्त काळ अंतर पडायला लागले. आयुष्याची संध्याकाळ जवळ आली तसतसे दिवाकररावांना हा एकलेपणा फार जाणवायला लागला. त्याक्षणी त्यांना जाणीव झाली निवृत्त होइपर्यंत का होइना पण आपल्याला निदान बँक, इथली कामे, समस्या…, हजार गोष्टी आहेत मन रमवायला. पण गायत्रीचे काय? चिन्मयच्या जन्मानंतरच तिने आपली नोकरीही सोडून दिली होती. तेव्हापासुन आजपर्यंत घर, मुले आणि संसार यातच तिने स्वतःला गुंतवून घेतले होते.

अशातच एके दिवशी दिवाकरराव सकाळचा आपला चालण्याचा व्यायाम आणि पेन्शनर्सचा कट्टा आटपून घरी परत आले. त्यांच्या हातात एक कापडाची छोटीशी पोटली होती. अगदी जपुन धरली होती त्यांनी. गायत्रीबाईंना कुतुहल वाटले. आपला नवरा सकाळी सकाळी काय घेवुन आला असेल एवढे जपुन?

“काय हो, काय आहे त्या कापडात? एखादं लहान बाळ असल्यासारखं जपताय ते त्याला.”

चहाचा कप दिवाकरांच्या समोर ठेवत गायत्रीबाईंनी विचारले. तसे दिवाकरराव गालातल्या गालात हसले.

“हो लहान बाळच आहे. त्याच्या आईने नाकारलं त्याला, म्हणुन मी त्याला आपल्या घरी घेवुन आलोय. बघ, जमेल तुला? होशील त्याची आई?”

तश्या गायत्रीबाई घाबरल्या. दिवाकररावांच्या उपद्व्यापी स्वभावाची त्यांना सवय होती. गेली कित्येक वर्षे त्या दिवाकरांची सगळी हौस, सगळे शौक जपत आल्या होत्या.

“अहो कायतरीच काय? कुणाचं लेकरु उचलुन आणलत आता? अहो, आईच ती! कावली असेल क्षणभर पण म्हणुन काय पोटच्या पोराला टाकून देतं का कुणी? आधी ते लेकरु ज्याचं त्याला परत करुन या बघु.”

“अगं, अगं आधी बघशील तरी की नाही लेकराला.”

दिवाकरांनी तो कपडा उलगडला. त्यात एक छोटंसं…

छोटंसंच पण हिरवंगार रोप होतं…..!

गायत्रीबाईंनी ते बघीतलं आणि हसायलाच लागल्या.

“केवढं घाबरवुन सोडलंत मला. मी म्हटलं खरोखरच कुणाचं लेकरु घेवुन आलात की काय? तुमचा काही भरवसा देता येत नाही बाई. कसलं रोप आहे? आपल्या परसात लावु या आपण आणि हो या पिल्लाची मात्र आनंदाने आई होइन बरं मी.”

“मला खात्री होती गं, म्हणुनच घेवुन आलो. अगं झालं काय, ते नाईक आहेत ना. त्यांच्या अंगणात उगवलं होतं हे उंबराचं रोपटं. आज सकाळी बागेला वाफे करताना चुकुन उखडलं गेलं. असंही आपल्याकडे उंबराचं झाड कोणी अंगणात लावत नाही, त्याची फार पथ्ये असतात म्हणे. म्हणुन नाईक ते फेकुनच द्यायला निघाले होते. मी म्हणलं द्या, मी घेवुन जातो त्याला आणि आणलं झालं. बघ तुला चालेल ना उंबराचं झाड अंगणात?”

“न चालायला काय झालं? अहो, पथ्ये कसली, सगळी खुळं आहेत झाली आपल्या अंधश्रद्धाळु लोकांची. हा.., आता झाड मोठं झाल्यावर त्याचा कचरा खुप होतो अंगणात. उंबराची फळं, वाळलेली पानं वगैरे प्रचंड कचरा होतो. पण लेकराने कचरा, पसारा करायचा आणि आईने तो आवरायचा हा नियमच आहे ना विधात्याचा. मी करीन त्याचं सगळं.”

गायत्रीबाईंनी ते उंबराचं रोप उचललं आणि लगबगीने परसदाराकडे गेल्या. तसा दिवाकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आता निदान महिनाभर तरी गायत्रीबाई त्या रोपाच्या देखभालीत मग्न राहणार होत्या. त्यांची नेहमीची एकटेपणाची तक्रार काही अंशी का होइना कमी होणार होती. त्यांच्या डोळ्यातली ती एकटेपणाची उदास जाणीव आता किमान महिनाभरतरी दिसणार नाही या आनंदाने दिवाकरराव सुखावले. गेले काही दिवस गायत्रीबाई फारच उदास राहायला लागल्या होत्या. तसे दर दोन दिवसाआड मुलांचे, सुनांचे फोन असत. पण शेवटी प्रत्यक्ष सहवासाचा जिवंतपणा फोनवर थोडाच अनुभवता येतो? पण काही काळ का होइना गायत्रीबाई आता त्या रोपट्याच्या सरबराईत रमतील या कल्पनेने दिवाकरराव जरा शांत झाले. त्यांनी हलकेच डोळे मिटून घेतले व आरामखुर्चीच्या पाठीवर थोडेसे रेलुन निवांत झाले.

गायत्रीबाई तृप्त मनाने आपल्या नवर्‍याकडे बघत होत्या. एवढी काळजी करणारा जोडीदार मिळणे ही पण पुर्वसंचिताचीच गोष्ट ना. दिवाकरपंतांची ही सगळी धडपड त्यांना कळत का नव्हती? त्यांना पक्के माहीत होते… नाईकांचे केवळ नाव पुढे केलेय दिवाकरांनी. त्यांनी नक्की कुठूनतरी, एखाद्या नर्सरीतुन हे रोप विकत वगैरे आणलेले असणार. गायत्रीबाईंची झाडा-झुडपांची आवड त्यांना पक्की माहीत होती. निदान त्या निमीत्ताने का होइना आपण आपला एकटेपणा, उदासी विसरावी, आपल्याला थोडे समाधान लाभावे यासाठीच आपल्या नवर्‍याचा हा सगळा आटापिटा चालला आहे हे न कळण्याइतक्या गायत्रीबाई दुधखुळ्या नव्हत्या. पण म्हणुनच आज त्यांना खुप आनंद झाला होता. या वयातदेखील आपला नवरा आपल्याला सुखी, समाधानी ठेवण्यासाठी धडपडतोय ही गोष्ट त्यांना प्रचंड सुखावून गेली होती आणि म्हणुनच त्यांनी मनाशी पक्का निर्धार केला होता, मनोमन आपल्या नवर्‍याला वचनच दिले होते म्हणा ना…

“मुला-बाळांचा विरह ही अशी विसरता येण्यासारखी बाब नव्हती. पण यापुढे कधीही आपण आपल्या चेहर्‍यावर ती उदासी, ते दु:ख दिसू द्यायचे नाही. दिवाकरना आपल्या चेहर्‍यावर कायम प्रसन्नपणा दिसला पाहीजे हे त्यांनी मनाशी पक्के ठरवुन टाकले होते. शेवटी मनातली वेदना दडवून वरवर हसत राहणे हे त्यांच्या स्वभावातच होते. किंबहुना प्रत्येक स्त्रीचे तेच तर वैशिष्ठ्य असते. ही एक गोष्ट अशी आहे की जी स्त्रीया लिलया करु शकतात तर पुरुषांना ती बर्‍यापैकी अवघड जाते.”

त्या दिवसापासून गायत्रीबाईंनी स्वतःला आजुबाजुच्या गोष्टीत गुंतवून घेतले होते. त्यात दिवाकरांनी आणलेले हे नवीन रोपटे हे एक चांगलेच साधन ठरले होते.

“मग काय म्हणतं तुझं ते उंबराचं झाड?”

एके दिवशी जेवण झाल्यावर नॅपकिनने हात पुसता पुसता दिवाकररावांनी हसत हसत आपल्या बायकोला विचारले, तशा गायत्रीबाई उसळल्या.

“शंभु…शंभु नाव ठेवलय मी त्याचं! याच्यापुढे त्याला शंभु म्हणायचं कळलं?”

“कमाल आहे. झाडाचे सुद्धा नाव ठेवलेस तर!”

“झाड नाही, माझं धाकटं लेकरुच आहे आता ते. यापुढे त्याला त्याच्या नावानेच हाक मारायची.”

गायत्रीबाई आपल्या कामाला लागल्या….

दिवस जात होते. गायत्रीबाई आणि दिवाकरराव आपल्या त्याच त्या आयुष्यात हळुहळु स्वतःला गुंतवून घेत होते. दरवर्षी सुट्टीत चिन्मय आणि तन्मय आठवणीने आपल्या मुला-बाळांसकट यायचे. महिनाभर राहून धमाल करायचे. प्रचंड आनंदात जायचा तो महिना गायत्रीबाईंसाठी. जोडीला शंभुही वाढत होता. आता त्याने हळु-हळु आकार धरायला सुरूवात केली होती. वयाबरोबर त्याचा पसाराही वाढत चालला होता. गायत्रीबाईंसाठी तर तो खरोखरच त्यांचा तिसरा मुलगाच झाला होता. दिवाकरांना वाटलेही नव्हते इतक्या गायत्रीबाई शंभुशी एकरुप झाल्या होत्या. मुले यायची तेवढा एक महिनाच काय तो शंभु जरा एकटा पडायचा. नाहीतर गायत्रीबाई कायम त्याच्या बरोबर असायच्या. मुलांनीही आता गायत्रीबाईंचे हे शंभुप्रेम स्विकारले होते. आधी त्यांना थोडे विचित्र वाटले खरे. पण सुदैवाने चिन्मय, तन्मय आणि त्यांच्या बायकाही समंजस होत्या. आईच्या मनाची घालमेल अगदी व्यवस्थीत त्यांच्यापर्यंत पोचत होती त्यामुळे त्यांनीदेखील शंभुला आता आपल्या कुटुंबांचा एक सदस्य म्हणुन स्विकारले होते. प्रत्येक वेळी भारतात आले की दोघेही दिवाकर्-गायत्रीच्या मागे लागायचे आता चला तिकडे. अजुन किती दिवस असे आमच्यापासुन दूर राहणार म्हणुन. पण दिवाकर आणि गायत्रीबाई दोघांनाही मायदेश सोडून जिवावर यायचे. आतातर दोघांनाही शंभूचा इतका लळा लागला होता की त्याला इथे सोडून परदेशात निघून जायचे ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती. गायत्रीबाई तर चक्क तासन तास गप्पा मारायच्या शंभुबरोबर. आधी लोकांनी दिवाकरांना सल्लेही दिले एखाद्या मानसोपचार तज्ञाची भेट घेण्याचे. पण मग जेव्हा गायत्रीबाईंची उत्कटता, त्यामागची गहिरी भावना लक्षात आली तेव्हा लोकांना त्यांचे कौतुक वाटायला लागले. शंभुबरोबर त्याची इतरही भावंडे लाडा-कोडात वाढत होती गायत्रीबाईंच्या अंगणात. पण शंभूची ऐट काही वेगळीच होती. अशातच तो दिवस आला……

काळ कुणाला चुकलाय? एके दिवशी तृप्त समाधानी मनाने दिवाकरांनी इहलोक सोडला. पण जाताना मनात एक समाधान होते की आपल्यामागे गायत्री एकटी राहणार नाही. अगदी मुलांबरोबर जायचे तीने नाकारले तरीदेखील शंभु कायम तिच्या बरोबर असेलच. आणि तसेच झाले….

गायत्रीबाईंनी मुलांबरोबर जाण्याऐवजी इथे एकटीन राहण्याचा पर्याय स्विकारला. या वास्तुत, या परिसराच्या कणा-कणात त्यांचा दिवाकर व्यापुन राहीलेला होता. तो अदृष्य स्पर्श, ती दिवाकरांच्या सतत सोबत असण्याची जाणीव तिथे परदेशात थोडीच येणार होती. आणि पुन्हा दिवाकरांनी त्यांच्या हाती सोपवलेलं त्याचं धाकटं लेकरु , त्यांचा शंभु होताच की सोबत.  गायत्रीबाई आपल्या शंभुबरोबर मागेच राहील्या.

***************************************************************************

दिवसामागून दिवस, महिने…वर्षे उलटून गेली. दिवाकररावांना जावून जवळ जवळ दहा वर्षे उलटली होती. शंभू या घरात आला त्यालाही १४-१५ वर्षे होत आली होती. आता शंभुचे रुपांतर एका देखण्या, डेरेदार वृक्षात झाले होते. अजुन काही वर्षांनी त्याला फळे यायला सुरूवात झाली असती. गायत्रीबाईंनी शंभुच्या पायथ्याशी एक छान पार बांधून घेतला होता. दिवाकरांच्या हयात पेन्शनर मित्रांचा कट्टा आता शंभुच्या कुशीतच भरायला लागला होता. दिवाकरांचा अंदाज अगदी खरा ठरला होता. शंभुने गायत्रीबाईंचा एकटेपणा पार नाहीसा करून टाकला होता. रोज सकाळ संध्याकाळ कितीतरी पेन्शनर्स गायत्रीबाईंच्या अंगणात शंभुच्या सहवासात जमायला लागले. गायत्रीबाईंनी आपल्या अंगणाला मागच्या बाजुने देखील एक फाटक बनवुन घेतले होते. सकाळ संध्याकाळ फिरायला येणारे-जाणारे आता हळु-हळु शंभुच्या सोबतीला क्षणभर विसावू लागले होते. गायत्रीबाईंचा वेळ छानच जात होता.

पण नेमकी हिच बाब मुलांच्या काळजींचे कारण बनली होती. कारण ते तिकडे परदेशात असत, इथे आई एकटीच. शंभुमुळे घरात लोकांचा वावर वाढलेला. पण लोकांच्या वाढलेल्या वावराबरोबर एक असुरक्षिततेची भावनाही मुलांच्या मनात निर्माण झाली होती. साहजिकच होते म्हणा….

“आई इथे एकटीच असते. इथे प्रत्येकालाच मुक्त प्रवेश. आओ, जाओ घर तुम्हारा अशी परिस्थिती. जरी आईचा एकटेपणा कमी होण्याच्या दृष्टीने ही बाब चांगली असली तरी तेवढीच धोकादायकही होती. आजच्या जगात कुणाचा भरवसा देता येतो. कुणाच्या मनात पाप आले तर……..!”

त्यामुळे मुलांची आईला परदेशात आपल्याबरोबर घेवुन जाण्याची मागणी आता जोमाने वर यायला लागली होती. दोघी सुना हट्ट धरुन बसल्या होत्या गायत्रीबाईंकडे. कुठेही राहा, चिन्मयकडे वा तन्मयकडे. तुम्हाला आवडेल तिथे राहा. पण इथे एकट्या नका राहू आणि नातवंडानासुद्धा आज्जीचे प्रेम, माया अनुभवायला कधी मिळणार? पण गायत्रीबाईंची ही वास्तू, दिवाकरांचे सतत जाणवणारे सान्निध्य सोडून जायची इच्छा होत नव्हती. लग्नानंतर दोनच वर्षात दिवाकरांनी ही वास्तु बांधली. तेव्हापासून त्यांचं सगळं सुख – दु:ख या वास्तुशी जोडलं गेलं होतं. सगळ्या भावना, जाणिवा या परिसराशी निगडीत होत्या. त्यामुळे गायत्रीबाई काही आपलं घर सोडून मुलांबरोबर जायला तयार नव्हत्या.

अशाच कुठल्यातरी एका क्षणी तन्मयच्या मनात ती अभद्र कल्पना आली. जर आई हे घर, ही वास्तु सोडून यायला तयार नसेल तर ठिक आहे. राहू दे तिला इथे एखादी कंपेनियन ठेवता येइल फारतर बरोबर. पण या सगळ्या भीतीचे मुळ कारण , ते उंबराचं झाड तेच जर समुळ निपटून टाकलं तर. जर ते झाडच राहीलं नाही तर लोकांची वर्दळ आपोआपच कमी होइल. मग वाटणारा धोका ती काळजीही राहणार नाही. इतरांनाही ती कल्पना पटली आणि त्यांनी गायत्रीबाईंसमोर हा मुद्दा मांडला होता. ते उंबराचं झाड आपण कापून टाकू. तसेही उंबराच्या मुळ्या खुप खोलवर आत जातात. वास्तुला धोकादायकच ते. त्यापेक्षा ते झाडच कापून टाकले की जी अनावश्यक वर्दळ वाढलेली आहे ती आपोआपच कमी होइल. बाबांचे जे जुने मित्र इथे जमतात ते बाबांच्या, आईंच्या प्रेमापोटी. त्यांना काही ते झाड कापल्याने फारसा फरक पडणार नव्हता. ते तसेच येत राहणार होते.

पण हे ऐकल्यावर गायत्रीबाई कोसळल्याच. पोटच्या मुलासारखा वाढवला होता त्यांनी शंभुला. अगदी एवढ्याश्या रोपाचा एक डेरेदार वृक्ष होताना पाहीला होता त्यांनी. त्यांच्या दिवाकराच्या कितीतरी आठवणी निगडीत होत्या शंभुबरोबर. गेली कित्येक वर्षे त्यांच्या एकटेपणाचा एकमेव साक्षीदार आणि एकमेव सोबती होता तो. दिवाकर गेल्यानंतर कित्येकदा त्यांच्या आठवणीत आपले मन मोकळे केले होते त्यांनी शंभुपाशी. त्याच्या अंगावर डोके टेकवुन किती तरी वेळा आपल्या आसवांना मुक्त केले होते त्यांनी. आज स्वतःच्या स्वार्थासाठी त्या शंभुचा बळी द्यायचा. शक्यच नाही. गायत्रीबाईंनी या कल्पनेला अगदी कडाडून विरोध केला होता. गेले काही दिवस मुलांशी एकप्रकारचा अबोलाच धरला होता त्यांनी आणि आज तनु निर्वाणीचे विचारत होता.

“आई, मग काय विचार केलास तू? की अजुनही तुझा हट्ट कायमच आहे?”

“काय उत्तर देवु या पिल्लाला? अरे, जसा तू तसाच मला शंभुपण आहे रे. त्याला जन्म नसेल दिला मी. पण त्याचं सगळं बालपण अनुभवलंय मी. त्याचं वाढणं, मोठं होणं, कधीमधी कोमेजणं या डोळ्यांनी पाहीलय मी. त्याला सोडून कसं येवु मी? आणि त्याचा या पद्धतीने बळी देणं माझ्यातल्या आईला कसं शक्य होइल?”

पण ही लेकरं पण त्यांचीच होती, त्यांच्याच काळजीने व्याकुळ झाली होती. त्या माऊलीचा आपल्या लेकरांची ही घालमेलही बघवेना झाली. गायत्रीबाईंनी एकदा तन्मयकडे पाहीलं. त्याच्या चेहर्‍यावरचे त्यांच्याबद्दलचे प्रेम, माया ती काळजी त्यांना जाणवत होती. त्यांचे सगळे कुटूंब त्यांच्याकडे मोठ्या आशेन पाहात होते. गायत्रीबाईंनी थोडा विचार केला, मनोमन काही निर्णय घेतला आणि उठल्या.

“तनु, चिनु मला थोडा वेळ द्या. मी आलेच जावून तासाभरात. परत आले की माझा निर्णय सांगेनच. पण एक गोष्ट आत्ताच सांगुन ठेवते. यावेळी मी जो निर्णय घेइन तो अंतीम असेल. त्यात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. आलेच मी………!”

“कुठे चाललीहेस, मी सोडतो ना तुला”, म्हणत दारापर्यंत आलेल्या चिन्मयला त्यांनी तिथेच थांबवले.

“थांब चिनु, हा निर्णय माझा आहे, माझा मलाच घेवु दे, काळजी करु नका मी लवकरच परत येते.”

उंबर्‍यापासल्या चपला गायत्रीबाईंनी पायात सरकवल्या आणि त्या बाहेर पडल्या.

****************************************************************************************************************

एकाचे  दोन तास झाले तरी गायत्रीबाईंचा पत्ता नव्हता. तशी मुलांची चुळबुळ वाढायला लागली. काळजी वाढतच होती.

“अजुन कशी नाही आली आई? कुठे गेली असेल? मी बघुन येतो तिला.” तन्मय प्रचंड काळजीत होता.

“तू मुळात त्यांना एकट्याने बाहेर जावु द्यायलाच नको होते. मी पण मुर्खासारखी गप्प कशी बसले. मी जायला पाहीजे होतं त्यांच्याबरोबर. कुठे गेल्या आहेत कुणास ठाऊक?”

तनया तर रडकुंडीलाच आली होती. चिन्मय आणि चिन्मयी त्यांची समजुत काढायला लागले. पण मनातुन त्यांनाही काळजी वाटत होतीच. कुठे गेली असेल आई?

तेवढ्यात दारात चपला वाजल्या. गायत्रीबाई परत आल्या होत्या. त्यांच्या चेहर्‍यावर एक वेगळेच समाधान होते, थोडी वेदनाही दिसत होती. बहुदा त्या कुठल्यातरी निर्णयाप्रत आल्या होत्या.

“आई………..”

तन्मयचे वाक्य मध्येच तोडत गायत्रीबाई म्हणाल्या.

“मी माझा निर्णय घेतलाय बाळांनो…….

मी तुमच्याबरोबर येणार आहे. निदान सद्ध्यातरी… पुढे मागे जर वाटलंच तर परत येइन कदाचित अधुन मधुन शंभुला भेटायला.”

“येस्स्स्स्स्स…..!” सगळ्यांच्याच तोंडून एकदम आनंदाने चित्कार बाहेर पडला. तनयाने तर गायत्रीबाईंना कडकडून मिठीच मारली. सगळे वातावरणच बदलून गेले अचानक एका क्षणात.

“अरे अरे हळु..हळु! माझे बोलणे अजुन संपलेले नाहीये. मला माझे बोलणे पुर्ण करु द्याल की नाही.”

“ओक्के आई, आता तू म्हणशील ते ऐकायची आमची तयारी आहे. बोल तू!” चिन्मय आणि तन्मय एकदमच बोलले.

“मी आत्ता एका ठिकाणी जावून आले. तुमच्या बाबांच्या एका जुन्या स्नेह्याला भेटायला गेले होते. दादासाहेब आत या ना. ” गायत्रीबाईंनी दाराबाहेर उभ्या असलेल्या एका व्यक्तीला आत बोलावले. तसे एक धोतर, सदरा घातलेली साधारण सत्तरीच्या घरातली व्यक्ती आत आली.

“हे दादासाहेब सरवटे. एक छोटीशी समाजसेवी संस्था चालवतात. अनाथ मुले, निराधार स्त्रीया, तसेच मुलांनी टाकलेली वृद्ध दांपत्ये यांच्यासाठी त्यांची ही संस्था नेहमी मदतीचा हात देते. त्यांचे पालन्-पोषण करते. त्यांना त्यांची सद्ध्याची जाग अपुरी पडतेय आपल्या कार्यासाठी. म्हणून मी तुमच्या बाबांनी बांधलेली ही वास्तू त्यांच्या या संस्थेला दान करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याबदल्यात त्यांनी शंभुची कायम काळजी घ्यावी अशी विनंती मी त्यांना केली आणि त्यांनी ती आनंदाने मान्य केली. आता शंभुचा विरह थोडा जड जाईल मला काही दिवस. पण माझी इच्छा होइल तेव्हा इथे या भावी स्नेहाश्रमात येवुन राहण्याची त्यांनी मला परवानगी दिलेली आहे….

बाळांनो, तुमच्या रुपात माझा शंभु कायम माझ्याबरोबर असेलच. पण हा शंभु इतर अनेक बाळांना, आई-बहिणींना, वृद्धांना असाच इथे कायम सावली आणि विसावा देत राहील या आशेवर आज मी माझ्या शंभुचा निरोप घेतेय.”

“काका, आई बरोबर माझीही एक मागणी आहे. जर कधी इच्छा झालीच तर आम्हा सगळ्यांना काही दिवस तुमच्या या स्नेहाश्रमात इथल्या सर्वांबरोबर व्यतीत करण्याची तुमची परवानगी मला हवी आहे. मिळेल ना?”

तन्मयने पुढे येत विचारले तसे दादासाहेबांच्या डोळ्यातुन कृतज्ञतेचे अश्रु ओघळले तर मुलांच्या-सुनांच्या डोळ्यांतून आनंदाश्रु …………….!

गायत्रीबाई आपल्या शंभुला ही बातमी द्यायला त्याच्याकडे जायला निघाल्या.

समाप्त.