“आजकाल सगळंच उलटं-सुलटं झालय. सगळे संदर्भ बदलले आहेत. आमच्यासारख्यांनी हरी-हरी करत शांत बसावं हेच खरं!”
देशपांड्यांनी आपला नेहमीचा डायलॉग टाकला आणि सगळा कट्टा एकमेकाकडे पाहात डोळे मिचकवायला लागला. ‘बघ मी म्हटलं नव्हतं?’ अशी काहीशी मिस्कील तक्रारवजा सुचना प्रत्येक डोळ्यात दिसत होती. ते देशपांडेंच्या लक्षात आले आणि त्यांनाही हसु आवरले नाही.
“हसता काय चिरमुले? अहो मी म्हणतोय त्यात काही चुकीचं आहे का?”
बसल्या बसल्या आपली मान १८० अंशात हलवत रादर हलवण्याचा प्रयत्न करत असलेल्या सत्तरीच्या चिरमुलेकाकांकडे पाहात देशपांडे म्हणाले. चिरमुल्यांचा मानेचा व्यायाम चालुच होता.
“अहो चिरमुले, काय म्हणतोय मी?”
“देशपांडेसाहेब दिले ना तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी होकारार्थी मान हलवून!”
“मान हलवून?”
तसे चिरमुल्यांच्या लक्षात आले की आपण मानेचाच व्यायाम करतोय त्यामुळे आपले तथाकथीत होकारार्थी मान हलवणे कुणाच्याही लक्षात आले असण्याची शक्यता शंभरात एक एवढीच आहे. त्यांनी आपली ऑलरेडी डुगुडुगु हलणारी मान एका जागी स्थिर करण्याचा निष्फळ प्रयत्न केला आणि आपल्या मित्रांकडे पाहून हलकेच हसायला लागले. चिरमुल्यांचे हसणे हाही एक संशोधनाचा विषय होता. त्यांच्या भरघोस मिशा (देव जाणे कशा, पण तेवढ्याच ठिकाणी काय ते भरघोस केस उरले होते. डोक्याने कधीच घसरगुंडीशी स्पर्धेला सुरूवात केली होती). तर चिरमुले हसायला लागले की त्यांच्या एरव्ही ओठांचे अस्तित्व अदृष्य करणार्या मिशा किचिंत वर उचलल्या जात आणि चिरमुल्यांच्या ओठांचे दर्शन होत असे. पण त्यावरून ते हसताहेत की काही बोलताहेत हे मात्र कळत नसे. पण कट्ट्यांच्या मेंबरांना आता अनुभवाने कळायला लागले होते ‘चिरमुले हसताहेत की बोलताहेत? त्यात त्यांचा आवाज म्हणजे ताशांच्या खणखणाटात टाचणी पडल्यावर होयील एवढा खणखणीत होता. त्यांचे बहुतांशी बोलणे खुणांवरुनच ओळखुन घ्यावे लागत असे.
थोड्याफार फरकाने सगळ्यांचीच अवस्था तीच होती. चिरमुले काय, देशपांडे काय, खांडेकर काय आणि ‘बी’ विंगमधले सावंत काय? जवळजवळ सगळ्यांनाच आता परतीचे वेध लागलेले, फक्त बोलावणे यायची वाट बघत थांबलेले ते जिव. पण असे असले तरी प्रत्येकाच्या नसा-नसातुन जिवनरस मात्र भरभरून वाहत होता. पैलतिराचे वेध लागलेले हे प्रवासी राहीलेला प्रवास कसा सुखाचा बनवता येइल याचे आटोकाट प्रयत्न करत होते. त्याच प्रयत्नातला एक टप्पा म्हणजे हा पेन्शनर कट्टा. वृद्धत्वाबरोबर येणार्या समस्या कुणालाच चुकलेल्या नव्हत्या. आपापल्या परीने प्राक्तनावर कुरघोडी करण्याचे अपयशी प्रयत्न करत आयुष्याची लढाई लढणे चालु होते. कट्ट्यावर तसे पन्नासेक जण जमत. पण देशपांडे, चिरमुले, खांडेकर आणि सावंत यांची युती झाली होती खरी.
अरविंदराव खांडेकर उर्फ अरुकाका, वय वर्षे ६९. सगळे आयुष्य पैशांच्या सोबत काढलेला हा माणुस. स्टेट बँकेत कॅशियर म्हणून सुरुवात करुन शेवटी निवृत्तीच्या वेळेपर्यंत ब्रांच मॅनेजरच्या पोस्टपर्यंत पोचले होते. बर्यापैकी पेन्शन होती. मुलगा अमेरिकेत होता, तो नियमीतपणे पैसा पाठवायचा. एकंदरीत खांडेकरांची निवृत्ती सुखाने चाललेली होती.
गोविंदराव चिरमुले, वय वर्षे ७१. गृपमध्ये वयाने सगळ्यात मोठे. त्यांना तीन मुले होती. त्यांची कायम इकडून तिकडे, तिकडून इकडे अशी यात्रा चालु असे. चार महिने पुर्ण झाले की मुलगा लगेच दुसर्या भावाकडे पोचवून येत असे त्यांना. मोठी गुणी मुले होती. बापाला अगदी व्यवस्थित वाटुन घेतले होते तिघांनी. वर्षातले चार महिने ते वसंताकडे म्हणजे इथल्या मुलाकडे असत, तेवढाच त्यांचे गृपमधले वास्तव्य. इतर वेळी गृप तिघांचाच.
अविनाश सावंत, वय वर्षे ६४ तसे राजा माणुस. मुंबैत कुठल्याश्या मिलमधून निवृत्त झालेले. तसा कोकणातला प्रत्येक माणुस राजा माणुसच असतो, स्वतःसाठी तरी निदान. कोकणात सावंतांची वाडी होती म्हणे. पाच पन्नास आंब्याची झाडं, काही पोफळी, काही काजुची झाडं. एक तीन खोल्यांची जागा असं काही बाही होतं. पण कोर्ट कज्ज्यात अडकलेलं. सावंत हसुन सांगत…
“आमच्या बापाची सगळी हयात गेली हा कज्जा लढवण्यात. आमच्या हयातीत आम्ही पण तेच केलं. फक्त एकच महत्त्वाचा बदल घडला. वकील बदलला आम्ही. आमच्या मुलाला ती पण गरज नाही पडणार, आमच्या बापटवकीलाचा झिल पण वकीली शिकतोय म्हणे.”
राहीले ते वयाने सगळ्यात लहान असलेले शंकरराव दिनकर देशपांडे, वय वर्ष ६१. निवृत्तीनंतरचे आयुष्य आपल्या एकुलत्या एक मुलाच्या संसारात कसेबसे ढकलत होते. नाही म्हणायला त्यांच्याही घरात कुरबुरी होत्याच. त्या कुणाच्या घरात नसतात हो. आयुष्यभर मास्तरकी करून झाली. आता जगण्याचे नवे संदर्भ नातवंडांकडून शिकण्याची वेळ आलेली होती. परवाचीच गोष्ट. त्यांचा १४ वर्षाचा नातू विचारत आला.
“आबा, लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल तुमचे काय मत आहे?”
आबा काय उत्तर देणार डोंबल. त्यांना त्यांचे दिवस आठवले. लग्नानंतर तीन महिने त्यांची बायको त्यांच्याशी बोलायला लाजत होती आणि आज…………………
आज ती ही नव्हती आणि त्या आठवणीही नव्हत्या.
नातवाला काहीतरी थातुरमातुर उत्तर देवून त्यांनी पळवून लावले होते तेव्हा, पण तेव्हापासुन त्यांच्या डोक्याला लागलेला विचारांचा भुंगा काही संपत नव्हता.
“अरविंदराव, तुम्हाला काय वाटतं? आजकालच्या जगात ‘विवाहसंस्थेचे’ महत्व कितपत टिकून आहे? रादर आज विवाहसंस्थेची कितपत गरज आहे?”
तिघे मित्र आ वासुन शंकररावांकडे बघायला लागले. नाहीतरी हा म्हातारा नको तितका सुधारणावादी आहे. याच्या डोक्यात कायम काहीतरी तिरपागडे विचार चाललेले असतात याची तिघांनाही खात्री असायची. पण आजचा हा प्रश्न म्हणजे अक्षरशः बाऊन्सरच होता. अरुकाका स्वतः काही उत्तर द्यायच्या ऐवजी चिरमुल्यांकडे बघायला लागले. शंकररावांच्या डोक्यातून असला काही किडा निघाला की बॉलला नुसता कट मारून एक चोरटी धाव घ्यायची आणि स्ट्राइक गोविंदरावांकडे सोपवायची हा उरलेल्या त्रिकुटाचा अलिखित नियम होता. सराईतपणे स्ट्राईक सांभाळत गोविंदरावांनी बॉलला सीमेपार टोलवले.
“काय शंकरराव, आता या वयात कुणी भेटली की काय तुम्हाला?”
“मी काय म्हणतो, आपल्याला या प्रश्नाचा विचार करण्याची गरज काय? आपण चौघेही विधुर आहोत. आता वयाच्या अशा टप्प्यावर आहोत की कुणी स्त्री आपल्या आयुष्यात येणं तसंही शक्य नाही. मग नसत्या गोष्टींवर डोके कशाला खपवायचे. त्यापेक्षा चला रमेशच्या टपरीवर जाऊन नेहमीप्रमाणे मस्त गरमागरम भजी हाणुयात आणि एकेक कटींग चहा मारुयात. कस्सं?”
सावंतांनी पोटावरून हात फिरवत मध्येच फर्माइश केली आणि विषय बदलण्याचा असफल प्रयत्न केला. पण शंकरराव आज चर्चेच्या मुडमध्ये दिसत होते.
“नाही, म्हणजे असं बघा ना. आजकाल आजुबाजुला जे काही चालले आहे ते बघता…. अगदी आपल्याच सोसायटीत बघा. आमच्या शेजारचे घाटपांडे. त्यांच्या मुलाचे मागच्या वर्षीच लग्न झालेय. अगदी पत्रिका, गुण वगैरे सगळे पाहून. चांगले २४ गुण जुळले होते दोघांचे. पण आजकाल एक दिवस असा जात नाही की त्या नवरा-बायकोंची भांडणे कानावर येत नाहीत.”
“हे बरिक खरं आहे हो शंकरराव. आमच्या बिल्डींगमधलं ते ३०२ मधलं जोडपं. त्यांचातर प्रेमविवाह आहे. पण कायम कुरबुरी चालुच असतात. ती पोर दर २-३ महिन्यांनी कंटाळून माहेरी जाते. मग हा कशीबशी तिची समजुत घालुन तिला परत आणतो. काही दिवस शांततेत गेले की पुन्हा आपले ये रे माझ्या मागल्या.” सावंतांनी शंकररावांची री ओढली.
“पण एवढ्याश्या कुरबुरीवरून आपल्या विवाहसंस्थेबद्दलच शंका घेण्याचं कारण काय शंकरराव?” इति चिरमुले.
“नाही चिरमुले, मी शंका घेत नाहीये. विवाहसंस्थेवर माझाही विश्वास आहेच की हो. पण कधी कधी मनात अनेक प्रश्न उभे राहतात.” शंकरराव हवेत कुठेतरी पाहात बोलले.
“जसे….?” इति खांडेकर
” म्हणजे…म्हणजे असं बघा.., एवढा प्रचंड खर्च करून लग्न करायचे. सगळ्या शक्याशक्यता लक्षात घेवून एकत्र यायचा निर्णय घ्यायचा आणि नंतर त्यावर पश्चाताप करत बसायचे. मला ना हे थोडंसं विचित्र वाटायला लागलय आजकाल.”
“विचित्र काय आहे त्यात शंकरराव. अहो आपण नाही का संसार केला. तुमचे पण वहीनींशी वाद व्हायचेच की? पण तरीही तुमचा संसार सुखाचा झालाच ना? वहिनी असेपर्यंत कधी काही तक्रार केलीत का तूम्ही तरी आणि वहीनींनी तरी. आमच्याकडे तर दोन ध्रुवावर दोघे आपण अशी परिस्थीती होती. पण आपण केलाच ना संसार?”
“तेच तर खटकतेय अरविंदराव आता. आपला काळ बराच वेगळा होता. एकत्रीत कुटूब व्यवस्थेवर, विवाहसंस्थेवर आपला विश्वास होता. आपल्या तथाकथीत रुढी परंपरांवर आपली नाईलाजाने का असेना, खोटी दिखाऊ का असेना पण श्रद्धा होती. त्या परंपरा, सो कॉल्ड संस्कार जपण्यासाठी म्हणून आपण जगत राहीलो एकत्र. पण आता जाणवतं की आपण केवळ स्वतःचा आणि त्या तथाकथित संस्कार-परंपरांचाच विचार करत राहीलो हो. जसं आत्ता तूम्ही म्हणालात ‘दोन ध्रुवावर दोघे आपण’ तसं माझ्या पत्नीला किंवा वहिनींनाही कधी ना कधी वाटले असेलच की. पण मनावरचा रुढी परंपरांचा पगडाच एवढा मजबुत होता की आपण इच्छा असो वा नसो जगत राहीलो. एकमेकाला समजुन घेत संसाराचा सारीपाट खेळत राहीलो.”
“आता कसे बोललात शंकरराव! “एकमेकाला समजुन घेत संसाराचा सारीपाट खेळत राहीलो.” त्या खेळातुन, त्या समजुन घेण्यातुन तर आयुष्याची रादर विश्वासाची, नात्याची विण घट्ट होत जाते ना.”
चिरमुलेंनी मध्येच शिरकाव करत आपले मत मांडले.
“तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे चिरमुले. पण आताची पिढी आपल्यापेक्षा खुप वेगळी आहे. मुलं दहा-बारा वर्षाची झाली की त्यांना सगळं समजायला लागतं. विशेषतः आपले हक्क, आपले अधिकार, विचार स्वातंत्र्य याची जाणीव आजच्या मुलांना खुप लवकर होते. विनाकारण एखाद्या गोष्टीसाठी सायास घेण्याची त्यांची इच्छा नसते. सुदैवाने त्यांच्यात फार लवकर समजुतदारपणाही येतो. पण तो समजुतदारपणाच त्यांना प्रत्येक गोष्टीचा खोलात जाऊन विचार करायला शिकवतो.”
“म्हन्जे? माका नाय समजला, तुमका नक्की काय म्हणायचा आसा ता शंकरराव?”
विचारांचा गोंधळ उडाला की ते व्यक्त करायला सावंत नेहमी आपल्या बोलीभाषेचा, कोकणीचा आधार घेत.
” म्हणजे…, मला एक सांगा सावंत, तुमचं लग्न कसं झालं होतं हो?”
“कस्सं म्हणजे, एके दिवशी सकाळी बापाने सांगितलं, शेजारच्या गावातल्या सावंताच्या पोरीशी तुझं लग्न ठरवलय म्हणून आणि महिन्याभरात लग्न झालं. लग्न झाल्यानंतर सहा महिन्यांनी इथे मिलमध्ये कामाला लागलो आणि मुंबैला आलो , तो दिवस आणि आजचा दिवस. सगळे दिवस सारखेच. फक्त तेव्हा शांता बरोबर होती, आता ती गेली अप्सरांचा डान्स बघायला फुकटचं बाल्कनीचं तिकीट काढून. आम्ही बसलोय वाट बघत, साला कोणी ब्लॅकवाला पण भेटत नाहीये.”
सावंतांच्या बोलण्यात नकळता एक विषण्णता आली, त्यांचा एकटेपणा उफाळून वर आला.
“म्हणजे बघा, तुम्ही मुलीला किंवा मुलीने तुम्हाला बघीतलेही नव्हते. तुम्हाला नोकरी नव्हती, कामधंदा नव्हता तरीही तुमचे लग्न झाले.”
“नाय करुन सांगतो कुणाला? आमच्या बापसाकडे एक लै मोटा पोकळ बांबु होता. बाप जाईपर्यंत म्हन्जे आमच्या पन्नाशीपर्यंत आमाला त्या बांबुचा भ्येव वाटायचा.”
सावंत जुना काळ आठवत म्हणाले.
“आणि तुमच्या मुलाचं लग्न कसं झालं सावंत?”
“जाऊ द्या ना शंकरराव. आवो जमाना खुप बदललाय आता?” सावंत थोडे उदास झाले.
“नाराज नका होवु सावंतराव. त्याचंही अगदी काही पुर्णपणे चुकलं असं म्हणता येणार नाही. ही मुलगी मला पसंत आहे, तिच्याशी लग्न करायचय हे येवुन तुम्हाला सांगितले ना त्याने. थेट बायकोला समोर आणून उभे नाही केले ना तुमच्या? मला काय म्हणायचेय हे तुमच्या लक्षात येतेय का?”
“थोडं थोडं येतय शंकरराव माझ्या लक्षात !” खांडेकरांनी मान होकारार्थी हलवत सांगितले.
“म्हणजे असे बघा… ज्याला आपण म्हातारे नेहमी ’जनरेशन गॅप-जनरेशन गॅप’ म्हणून बोटे मोडत असतो, ती अगदीच काही टाकाऊ गोष्ट नाहीये. बरोब्बर?”
“माझ्या मनातले बोललात अरविंदराव ! आपण केवळ जनरेशन गॅपच्या नावाने शंख करत राहतो कारण नव्या पिढीची खुपशी मते आपल्याला पटत नाहीत. ती सगळीच बरोबर असतात असे नाही पण सरसकट आपल्याला पटत नाही म्हणून त्यांच्या मतांना चुकीचे ठरवणेदेखील पटत नाही मनाला. काही दिवसांपूर्वी माझ्या नातवाने मला ‘लिव्ह इन रिलेशनशिप’बद्दल माझे मत विचारले. माझ्या जिभेवर लगेचच ‘सगळा मुर्खपणा आहे झालं’ असे आपल्या पिढीला संमत असे मत आले होते, पण का कोण जाणे मी त्या क्षणी त्याला उत्तर देणे टाळले. काहीतरी थातुरमातुर बोलुन मी विषय बदलला. पण तेव्हापासुन माझे विचार पुन्हा पुन्हा तिथेच येवुन थांबताहेत.”
“तुम्हाला काय म्हणायचेय शंकरराव? ते ‘लिव्ह इन’ की काय म्हणतात ते नव्या पिढीचं नवं फॅड योग्य आहे?” चिरमुलेंनी बहुदा अस्तन्या सरसावल्या होत्या.
“शब्दाला धरून बसु नका चिरमुले. माझा मुद्दा लक्षात घ्या. ‘लिव्ह इन’ हा फक्त एक नैमित्तिक मुद्दा आहे. ‘जुनं ते सगळं सोनं आणि नवं ते सगळं चुकीचं’ ही मेंटॅलिटी आपल्याला बदलायला हवी. ‘लिव्ह इन’ बद्दल तुम्हाला किंवा मला काय वाटतं हे महत्त्वाचं नाहीये. तर ते अगदीच निरर्थक आहे की त्यात किंचीतका होइना विचार करण्यासारखे काही आहे’ हे महत्त्वाचे. मला तर ती संकल्पना अगदीच चुकीची वाटत नाही. म्हणजे बघा ना, लग्न झाल्यानंतर ‘पदरी पडले आणि पवित्र झाले’ म्हणायचे आणि आयुष्यभर नशिबाला बोल लावत बसायचे, यापेक्षा लग्नाआधी काही काळ परस्परविचाराने एकत्र राहून परस्परांना समजावून घेण्याचा प्रयत्न केला तर कुठे बिघडले?”
“अहो पण ज्याला आपण कोर्टींग पिरियड म्हणतो तो पुरेसा असतोच की या सगळ्यांचा अनुभव यायला, माहिती व्हायला.” खांडेकरांनी मध्येच आपले पिल्लु सोडले.
“अरविंदराव, खरोखर तेवढे पुरेसे असते? कोर्टींग पिरियडच्या थोडक्या दिवसात येणार्या अनुभवामधुन मधून संसारात काय-काय प्रसंग येवु शकतील याची तपासणी करणे, म्हणजे मला वाटते ‘छंदोपासना’ वाचून गझल लिहीण्यासारखे आहे. त्यात तुम्हाला तंत्र कळते पण मंत्र…….! तो कुठून मिळणार? अहो प्रत्यक्ष समुद्रात पडल्याशिवाय पोहता येवु शकते, त्यासाठी स्विमींग पुल असतात पण समुद्रातले शार्क मासे स्विमींग पुलमध्ये नाही असत. त्या अनुभवासाठी समुद्रातच उतरावे लागते. तसेच संसाराचे आहे, पुस्तकी ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभव यात खुप मोठा फरक असतो अरविंदराव. ”
“म्हणजे लग्नानंतर होणार्या सर्व म्हणजे सर्वकाही गोष्टींचा अनुभव लग्न न करताच घ्यायचा असे म्हणताय तुम्ही? आणि नंतर काही काळानंतर त्यांचे नाही पटले तर………..!”
चिरमुल्यांनी आपल्या मनातली मुलभुत आणि खरीखुरी शंका व्यक्त केली तसे सगळ्यांनीच डोकी हलवली.
“म्हणून तर हा विचार जास्त पटतोय मला चिरमुले. काही काळानंतर जर त्यांना आपण एकत्र राहु शकत नाही असे वाटले तर ते वेगळे होऊ शकतात. कारण हे एकप्रकारचे काही मर्यादित कालावधीचे काँट्रॅक्टच असते ना. केवळ आता लग्न झालेय, मग समाज काय म्हणेल? मग शास्त्र काय म्हणेल अशा भ्रांतित न पडता परस्परांच्या विचाराचा सन्मान करण्याची संधी ही पद्धती तुम्हाला देवु शकते.”
“अहो पण सगळं झाल्यावर….?”
“तुम्ही पुन्हा गल्लत करताय चिरमुले. सगळं म्हणजे काय हो? दोन शरीरं एकत्र आली की संपलं सगळं? अहो आजकालची पिढी जागरुक आहे. आपल्या हक्क्-अधिकारांची, आवडी-निवडींची त्यांना जाणीव आहे असं मी म्हटलं त्याबरोबरच या पिढीला आपल्या कर्तव्यांची, जबाबदार्यांची पण जाणीव आहेच की! अर्थात प्रत्येक गोष्टीला असतात तसे यालाही अपवाद आहेत पण ते आपल्या काळीही होतेच की. आपलं बरं वाईट त्यांनाही कळतं. आपल्यातला आणि त्यांच्यातला महत्वाचा फरक म्हणजे आपले सर्व संदर्भ देहाशी येवुन थांबताहेत. ही कालची पोरं मात्र देहापेक्षाही मनाला, मानसिकतेला जास्त महत्व देताहेत. देहाचे अवडंबर माजवण्यापेक्षा एकमेकाच्या मनाचं काय मागणं आहे ते पाहताहेत, त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करताहेत.”
“अहो पण याचे दु:ष्परिणामदेखील आहेतच की!”
“अहो ते तर लग्नाचेदेखील असतातच की. चिरमुले मी ‘लिव्ह इन’ ही संकल्पना पुर्णपणे समर्थनीय आहे असे म्हणत नाहीये. पण विचार करण्यासारखी नक्कीच आहे. काही गोष्टी अपरिहार्य असतात. राहता राहीला शारिरीक संबंध किंवा आकर्षणाचा भाग तर तो साहजिक आहे. ते तसेही इतके वर्ष चालु आहेतच की. फक्त इतकी वर्ष लग्न न करता असे संबंध बेकायदेशीर मानले जात होते, कारण ते सामाजिक हिताला बाधा आणत. पण ‘लिव्ह इन’ ही त्यातल्या त्यात जरा सुरक्षीत पातळी आहे. ‘लिव्ह इन’ म्हणजे तरी काय? एक प्रकारचे ठराविक मुदतीचे लग्नच झाले ना. आणि लग्न करुनही घटस्फोट होतातच की? मग स्वतःला थोडा वेळ देवून पाहण्यात काय हरकत आहे? आजही विवाहबाह्य संबंधांची उदाहरणे आपण ऐकतोच ना? पण आज खरोखर व्हर्जिनीटी हा नैतिकतेचा मुद्दा राहीलाय का? बाहेरील देशात आज त्याकडे केवळ एक शारिरीक गरज या दृष्टीने बघीतले जाते. आपल्याकडेही अंगवस्त्रे ठेवायची प्रथा होतीच की? मग आजच त्या मुद्द्याचा एवढा बाऊ करण्यात काय हशील आहे? मला वाटते या मुद्द्याला सामाजिक समस्येचे स्वरुप देवुन आपण आपल्याच, म्हणजे व्यक्तीच्या वैयक्तीक हक्क आणि स्वातंत्र्यावर बाधाच आणतोय. परस्पर संमती असेल तर त्याबद्दल प्रश्न उभे करणारे आपण कोण? आणि ‘लिव्ह इन’ ला तर आता कायद्यानेही मान्यता दिलेली आहे. ”
“पण मग आपली संस्कृती? आपले वेद, पुराणे…..आपला इतिहास !”
चिरमुल्यांनी आपल्या भात्यातले शेवटचे अस्त्र बाहेर काढले, पण आता त्यांचा उत्साह ओसरायला लागला होता. अगदीच ‘लिव्ह इन’ चे समर्थन करणे त्यांना आयुष्यात कधी जमणार नव्हते, पण शंकररावांनी त्यांच्या विचारांना एक नवी दिशा दिली होती. हे बरोबर नसले तरी जर परस्परसंमतीने होणार असेल तर अगदीच गैरही नाही याकडे त्यांचे मत हळू-हळू झुकायला लागले होते.
“हम्म्म संस्कृती ! ‘लिव्ह इन’ हा केवळ एक मुद्दा झाला चिरमुले. मला अपेक्षीत आहे ते म्हणजे ‘होणारे योग्य ते बदल स्विकारणे!”
” संस्कृती म्हणजे नेमके काय हो चिरमुले! एक पिढी जगण्याचे काही नियम ठरवून घेते, जेणे करून जीवन सोपे आणि सुलभ होइल. अशा काही गोष्टी अंगिकारते की ज्यामुळे समाजाचे एकमेकाबद्दलचे वर्तन, परस्परसंबंध सलोख्याचे राहतील. समाजाच्या हिताच्या दृष्टीने काही निर्णय घेते की जेणेकरुन सौहार्द नांदेल. एकमेकाबद्दलचे प्रेम वाढीला लागेल. समाजातील वाईट किंवा अनिष्ट गोष्टींना आळा घालता येइल. मग त्यानुसार सगळी पिढी जगायला लागते, जगते, वाढते. ही जी एकंदर प्रक्रिया असते त्यातुन तुमची आमची संस्कृती निर्माण होत असते. वेद, पुराणे ही ज्ञानाची कोठारे आहेत. ती मानवजातीच्या भल्यासाठीच बनवण्यात आलेली आहेत. पण बदलत्या काळानुसार जगण्याचे संदर्भ बदलताहेत. नैतिकतेच्या व्याख्या बदलताहेत. त्यानुसार आपले वेद, पुराणेही बदलायला नकोत का? वेद जरुर अभ्यासा, पण कधी कौटिल्यही अभ्यासा. कधी इब्सेन, मार्क्स, कृष्णमुर्ती तर कधी ओशोही चाळायला हवा. भगवदगीता आपल्याला पुज्यच आहे हो पण कधी ‘गीतारहस्यही’ चाळुन बघा. त्यातनं जे चांगलं असेल ते घेवून त्यानुसार आपल्याला बदलायला हवे. अहो आपले पुर्वज जसे वागले तसे आज आपण वागतो आणि त्यालाच आपली संस्कृती म्हणतो. आजपासून २००-३०० वर्षांनी आपल्या पुढच्या पिढ्या जेव्हा असतील, सारे जग आधुनिकतेच्या वळणावर उभे असेल तेव्हा हे वेद असेच्या असे अंगिकारुन नाही चालणार. जुन्या-नव्याच्या संतुलीत मिश्रणाने तयार होणारी नवी संस्कृती त्यावेळी हवी असेल आणि आपण आजच जर स्वतःला या बदलायोग्य नाही बनवले तर आपले वंशज कदाचित आपल्याला कधीच स्मरणार नाहीत. आपल्याला जर आपली संस्कृती टिकायला हवी असेल तर हा नव्या-जुन्यांचा तोल आपल्याला सावरायलाच हवा.”
“बघु, कितपत जमतं ते.” चिरमुल्यांनी हसत हात हलवले.
“विचार चांगला आहे. त्या जगतापाच्या म्हातारीशी आजकाल चांगली दोस्ती झालीय माझी. ती पण बिच्चारी एकटीच आहे…., काय म्हणता शंकरराव? ”
आपला खास कोकणी बेरकी, तिरकसपणा दाखवत सावंतांनी खिश्यातला कंगवा काढत डोक्यावरचे राहीलेले केस विंचरण्याचा आविर्भाव केला.
“चला सावंत, आजचं सेशन संपलं. या मुद्द्यावर उद्याच्या कट्ट्यावर चर्चा करू. सद्ध्या रमेशची गरमागरम भजी आणि चहा वाट पाहताहेत आपली. ”
कट्ट्याचे वारकरी आपापल्या घरट्याकडे परत निघाले व्हाया रमेशची टपरी. कंटाळा आला असेल आमचं चर्हाट ऐकुन तर या तुम्ही पण भजी आणि चहा ढोसायला !
समाप्त.