Category Archives: रसग्रहण – कविता व गाणी

मायबोली तसेच मिसळपाववरील काही सुंदर कवितांचे तसेच जुन्या गाजलेल्या गाण्यांचे तेथील दिग्गज महारथींनी केलेले रसग्रहण.

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता

ती गेली तेव्हा….
तीन शब्दाचा हा चक्रव्यूह ! ग्रेसबाबा, तु कसले प्राक्तन घेवून जन्माला आला होतास रे ? एखाद्याच्या आयुष्याला दुःखाचे, वेदनेचे किती विविध पदर असावेत याचे आदर्श उदाहरण असावे तुझे आयुष्य. पण बॉस, तुझी तऱ्हाच निराळी. त्या वेदनेलाच आपल्या जगण्याचे सूत्र बनवलेस. आम्ही वेदनेपासून दूर पळायला पाहतो, वेदना टाळायला पाहतो आणि तु तिलाच आपले शस्त्र बनवलेस?
20190508_133803
क्षमा कर ग्रेसबाबा, पण इथे, निदान या कवितेच्या बाबतीत मी तुझ्याइतकेच श्रेय पं. हृदयनाथ मंगेशकरांना सुद्धा देईंन. ग्रेसच्या अपार वेदनेला संगीताचा भरजरी साज चढ़वण्याची दुश्कर किमया फक्त बाळासाहेबच करू जाणोत. तुझी ही कविता अफाट आहेच पण तुझ्या इतर कवितांप्रमाणे दुर्बोध म्हणवली जाण्याचा शाप तिला देखील आहेच. पण बाळासाहेबांच्या संगीताने या कवितेला एक वेगळेच परिणाम प्राप्त करून दिलेले आहे.  देवानु, तुमच्या कवितेवर लिहायचे म्हणजे शिवधनुष्य उचलण्याइतके कर्मकठीण काम असते. पण क़ाय रे, ही अफाट ताकद कवितेला लाभण्यासाठी वेदना हा मूलभूत घटक हवाच असतो का? त्या आरतीप्रभुंची सुद्धा हिच तऱ्हा. कुठल्या मुशीतुन घडला होतात रे तुम्ही लोक? तो स्वतःला अफसाना निगार म्हणून घेणारा मंटो, काळीज पिळवटुन टाकणारे आमचे साहिरमियाँ. तुम्ही सगळे बहुदा एक सारखेच नशीब घेवून जन्माला आला होता. वेदना हाच एक सामाईक घटक घेवून जगलात. पण त्या वेदनेचा वापर करून आमच्यासारख्या क्षुद्र चाहत्यांना मात्र अपार सुख दिलेत.
असो, तर आपण बोलत होतो तूझ्या त्या तीन शब्दाच्या चक्रव्यूहाबद्दल. मुळात एका ओळीत , अवघ्या सात शब्दात एवढ्या भावना, एवढं आर्त ओतणं कसं करायचास रे तू ग्रेसबाबा. ‘पाऊस निनादत होता‘ अवघ्या तीन शब्दात तन मन डोलायला लावणारा अनाहत नाद, त्या नादाला आनंदाचे उच्च परिणाम प्राप्त करून देणारा तो आनंददायी रिमझिम हा शब्द आणि हे सगळे कशासाठी? तर ‘ती’ गेली तेव्हा … ही वेदना मांडण्यासाठी?
ग्रेसबाबा, तुझ्या या ‘ती’ने आजवर अनेक संभ्रम निर्माण केलेत. मी सर्वात पहिल्यांदा ऐकलेली दंतकथा म्हणजे तुम्हाला आईच्या चितेसमोर ही कविता सूचली. केवढा थरारलो होतो तेव्हा. कित्येक वर्षे त्याच संमोहनात होतो. पण नंतर जेव्हा तुझ्याबद्दल, तू लिहीलेलं, तू वेगवेगळ्या मुलाखतीतुन सांगितलेलं सत्य कळालं तेव्हा या थराराची जागा शहाऱ्याने घेतली. क्षणभर स्वतःला तुझ्या जागी कल्पून बघितले आणि…. नाही, आपल्याला नसते जमले बाबा हे जगणे.  मी असं ऐकलंय की हे द्वंद्व तुझ्या सावत्र आईमुळे निर्माण झालेलं होतं. (खरं खोटं तुलाच माहीती.) पण ते जर खरं मानलें तर तशी वयाने तुला समवयस्क असणारी सावत्र आई जेव्हा तिच्या प्रियकराला भेटायला जात असे तेव्हा अनावर झालेला हा कढ़ आहे हे जेव्हा कळाले तेव्हा मुळातून हाललो होतो. नाही, मी तिला दोष नाही देत, तुही कधी दिला नाहीत. पण ती वेदना शब्दाच्या रुपात साकारलीत.  वर तुझ्या प्रतिभेचा कहर म्हणजे ती गेली तेव्हा, पाऊस रिमझिम निनादत होता हे सांगताना तिच्या केशांना तू मेघाची उपमा देतोस आणि वर आपल्या आंदोलित मनाची उलाघाल व्यक्त करताना सांगतोस की त्या मेघात अडकलेली किरणें, ती किरणे सोडवण्याचा प्रयत्न हा स्वतःच गोंधळलेला सूर्य करत होता. कुठून येतं रे हे बळ?
तशि सांजहि अमुच्या दारी, येऊन थबकली होती
शब्दांत अर्थ उगवावा, अर्थांतुन शब्द वगळता 
हे कडवं बाळासाहेबांनी आपल्या गाण्यात घेतलं नाहीये. कारण काहीही असो, पण त्यामुळे तुझ्या या गाण्यावर दुर्बोधतेचा शिक्का लागता लागता राहिला. नाही पण ते बरंच केलं. नाहीतर यातून अजुन हल्लकल्लोळ उडाला असता. कारण तुही कधी आपली कविता समजावून सांगण्याच्या भानगडीत पड़त नाहीस आणि या ओळीचा जो अर्थ मला लागलाय तो …
मी समजू शकतो. केवळ वडिलांची दूसरी बायको हेच क़ाय ते नाते, त्यात जवळपास तुझ्याच वयाची. हे वादळ कधी ना कधी दारात घोंघावणार होतंच. पण ते अंतर, नात्याचा तो तोल आणि आत्यंतिक मोहाची ती  अवस्था तू असोशीने जपलीस. नातं हे मानण्यावर असतं म्हटलं तरी काही गोष्टी प्रगल्भपणे जपाव्याच लागतात. संबोधनाला काही अर्थ नसतो म्हटले तरीही कुठलाच शब्द कधीच निरर्थक नसतो. त्यात काही ना काही अर्थ शिल्लक राहतोच. हा नाजुक तोल किती सुंदरपणे जपलायस तू गाण्यात.
ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता
‘घनव्याकुळ’ ! आईगगगं , केवढा आर्त, कवितेच्या आशयाशी आणि त्या रिमझिम बरसणाऱ्या पावसाशी नाते
सांगणारा शब्द. हे असे नवे तरीही अर्थसमृद्ध शब्द निर्माण करण्यात तुझा हात कोण धरणार देवा? ‘ती आई होती म्हणूनी’…. उफ्फ, कसा सहन केलास तो कोंडमारा? अर्थात शब्द साथीला होते त्यामुळे त्या उद्रेकाला वाट करून दिलीत. तो कोंडमारा असह्य झाल्याने घनव्याकुळ म्हणजे आंसवे ढाळलीत हे सांगताना पूढच्याच ओळीत अश्या प्रसंगी सामोरे जावे लागणाऱ्या सामाजिक उपहासालाही वाचा फोडलीस. त्यावेळी ‘वारा सावध पाचोळा उडवित होता’ .  सावध खरेतर असंवेदनशील अश्या समाजाला तुमच्या भावनिक आन्दोलनाशी काहीच देणे घेणे नसतें. ते फक्त संधीचा फायदा उचलून टीकेचा पाचोळा उडवीत राहतात.
पण खरं सांगू, या संपूर्ण कडव्यात मला भावला तो ‘घनव्याकुळ’ हा शब्द. त्या एका शब्दाने तुझ्या अविरत वेदनेचा अमूर्त धागा नकळत माझ्या मनाशी जोडला गेला. तुझ्या मनात नक़्क़ी क़ाय आन्दोलने चालू असतील त्यांची जाणीव करून देवून गेला. त्या एका शब्दाने मला ग्रेसपुढे, त्याच्या वेदनेपुढे पूर्णत: समर्पित करून टाकलं.
अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता 
किती त्रास देशील रे ग्रेसबाबा? ‘संपले बालपण माझे’ ! आता काहीच राहिलेलं नाहीये. ‘ती आई’ आता राहिलेली
नाहीये आणि ‘ती’ आता आई राहिलेली नाहीये. आई नाही म्हणजे घर नाही, म्हणजे अंगणही नाही. सगळे बंध, सगळी ओढ़ धूसर होवून गेलेली आहे. त्यावर कहर म्हणजे तू स्वतःची तुलना भिंतीवरच्या एकाकी धुरकट कंदीलाशी करतोस. त्या वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या कंदीलाप्रमाणेच मी ही एकाकी झालोय, त्या चौकटीबद्ध आयुष्यात कायमचा गुरफटून गेलोय हे सुद्धा तू किती सहज सांगून जातोस.
हे रक्त वाढतानाही, मज आता गहिंवर नाही
ही केवढी विषण्ण, भीषण अवस्था आहे. आता माझे अस्तित्व म्हणजे निव्वळ एक दररोज वाढत राहणारा
हाड़ामासाचा गोळा इतकेच शिल्लक आहे. भावना, जाणिवा गोठुन गेल्याहेत. आईपासुन तुटण्याची ती भयाण प्रक्रिया,
तिने माझ्यातला जीवनरसच शोषुन घेतलाय. माझा मीच राहिलो नाहीये. तिचं जाणं मलाच दगड बनवून गेलय.
हे सगळं कमी होतं की क़ाय म्हणून जाताजाता एक मास्टरस्ट्रोक दिलासच तू…
वस्त्रांत द्रौपदीच्याही, तो कृष्ण नागडा होता 
इतके दिवस आईला, भलेही सावत्र असेल पण आईच ना. तिला समाजापासुन, त्यांच्या टीकेचे भक्ष्य होण्यापासुन वाचवण्यासाठी धडपडत राहिलो. अखेरपर्यंत तिच्यासाठी कृष्ण होवून वस्त्रे पुरवत राहिलो.  पण आता सगळेच एवढ्या अवस्थेला येवून पोचलेय की मीच असहाय होवून गेलोय. कुठल्याही प्रकारची मदत आता निरर्थक झालीय. तुला वस्त्रे पुरवताना त्यात मीच निर्वस्त्र झाल्याचा आभास होतोय.
यातलं  दुसरं आणि शेवटचं कडवं पंडितजीनी गाण्यात घेतलेलं नाहीये. कारणे त्यानाच ठाऊक पण याच्या संगीतात त्यांनी जे काही केलय, ज्या पद्धतीने त्यांनी हे गाणं स्वतः गायलय,  ते निव्वळ अफाट आहे, दैवी आहे. सर्वसामान्याच्या वेदनेची नाळ थेट ग्रेसबाबा तुझ्या वेदनेशी नेवून जोडणारे आहे. मला खरेतर पंडितजीच्या संगीताबद्दल, या गाण्याला त्यांनी दिलेल्या ट्रीटमेंटबद्दल खुप काही बोलावंसं वाटतेय पण ते पुन्हा कधीतरी. तो एका वेगळ्या लेखाचा विषय आहे.  तुला खरं सांगु? तूझी कविता म्हणजे त्या Schrodinger’s Cat सारखी आहे. किंवा त्याही पेक्षा स्पष्ट बोलायचे झाले तर आपल्याकडच्या त्या ‘हत्ती आणि चार आंधळे’ गोष्टीसारखी आहे. तूझी कविता त्या गोष्टीतल्या हत्तीसारखी भव्य, विशाल आहे आणि आम्ही चाहते म्हणजे त्या चाचपडणाऱ्या आणि आपापल्या  आकलनक्षमतेनुसार आपल्याला हवे ते आणि तसे निष्कर्ष काढणाऱ्या आंधळ्यांसारखे आहोत. आपापल्या कुवतीनुसार, वकुबानुसार तुझ्या कवितेतले गर्भित अर्थ, अस्पर्श भावना शोधण्याचे अपयशी प्रयत्न करत असतो. मला माहितीये की तुला उगाचच नाती जोड़त येणारी माणसे आवडत नाहीत. पण माझाही नाईलाज आहे रे. क़ाय करणार तू माझ्या रक्ताच्या थेँबा-थेँबात रुतुन बसलाहेस ग्रेसबाबा. मीच का, माझ्यासारखे असे कितीतरी आंधळे असतील ज्यांच्यासाठी ग्रेस ही ऋणानुबंधांतली एक अमूल्य अशी ठेव आहे.

 

विशाल कुलकर्णी
०९९६७६६४९१९

मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है

IMG-20190428-WA0019

IMG-20190428-WA0020

परमेश्वराने सृष्टीची निर्मिती करताना पहिली चूक ही केली की त्याने मानव पण निर्मिला. दूसरी चूक ही केली की मानवाला विचार करण्याची, कल्पना शक्तीची देणगी दिली. तसं पाहायला गेलं तर हे मानवाला मिळालेलं एक वरदान, एक खास भेट आहे. पण त्याने झाले असे की मानव विचार करायला लागला. मानव हा तसा समुहप्रिय प्राणी, त्यामुळे त्याने समुहात राहायला सुरुवात केली. तसे समुहात राहण्याचे नियम बनवले गेले. आणि तिथेच बिनसले. नियम आले की बंधने वाढतात. पण माणूस सरसकट एकसारखा नसतो. जितक्या व्यक्ती तितक्याच प्रवृत्ती. कुणी बंधने पाळतो तर कुणी बंडखोरी करतो. प्राण्यांचे बरे असते ना? उन्मुक्त जीवन, कसली बंधने नाहीत, नियम नाहीत. आयुष्यात कसली गुंतागुंत नाही. “

गुंतागूंत” , यस्स, किती तरी वेळ झाला हाच शब्द आठवण्याचा प्रयत्न करतोय. या विचार करण्याच्या क्षमतेने , कल्पनाशक्तीने मानवी जीवन इतके गुंतागूंतीचे करुन ठेवलेय की विचारूं नका. But then it’s completely human. कदाचित परमेश्वराने ठरवलेले असेल की पुढे आपल्याला संपूरणसिंग कालरा उर्फ गुलझार नावाचा एक हज़ारो लाखो लोकांना वेड लावणारा वेडा जन्माला घालायचा आहे. त्याची सोय म्हणून कदाचित परमेश्वराने आधीचा ही क्षमता, हे सामर्थ्य मानवाला दिलेले असावे.

गुलझारचा , त्यांनी दिग्दर्शीत केलेला कुठालेही चित्रपट पाहा, त्यात मानवी जीवनातील मानवी नात्यातील गुंतागूंतीवर थेट आतवर जावून भिडणारे भाष्य असते. असाच एक चित्रपट होता १९८७ मध्ये आलेला ‘इजाजत’ ! महेंद्र (नसीरमियाँ), सुधा (रेखा) आणि माया (अनुराधा पटेल) यांच्या प्रेमत्रिकोणावर आधारीत अतिशय गुंतागूंतीचे कथानक. श्री सुबोध घोष यांच्या कथेवर आधारित या चित्रपटाची पटकथा, संवाद, गीते आणि दिग्दर्शन सर्वस्वी गुलझारचे होते. सोबत चार चाँद लावायला पंचमदा, आशाबाई यांच्यासारखे मनस्वी कलाकार होतेच. इजाजत सर्वार्थाने गाजला. त्याची गाणी आजही ओठावर सहजी रेंगाळतात. त्यातलेच एक नितान्तसुन्दर गीत..

मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पड़ा है.   

गुलझारच्याच काही ओळी आठवतात..

सिर्फ अहसास है ये दूर से महसूस करो, प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो।

प्रेमाच्या अस्पर्श, अशारिर आणि तरीही अभिन्न भावनेची खरी गंमत अनुभवायची असेल तर डोळे मिटायचे आणि डोळ्यासमोर ‘मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पड़ा है’ म्हणत आर्तपणे साद घालणारी माया डोळ्यासमोर आणायची.

गुलझार हा विलक्षण भावनाप्रधान कवि आहे. त्यांच्या कवितेत, गाण्यात कधीच अर्थ, आशय शोधायचा वेडेपणा करू नये असे माझे प्रामाणिक मत आहे. गुलझार समजून घ्यायचा असेल तर नुसती त्याची गाणी ऐकुन, कविता वाचुन कळत नाही. गुलझार ही एक वृत्ती आहे. गुलझार जगावा लागतो, अनुभवावा लागतो. त्यातली अनुभूती घ्यायला सुरूवात केली की गुलझार आपोआप उलगड़त जातो. आता हेच बघा ना…

भीगे दिन, खत में लिपटी रात या गोष्टी. नेहमीच्या भौतिक आयुष्यात त्यांना काहीच अस्तित्व नाही. पण या शब्दात गुलझार ओतप्रोत सामावलेला आहे. त्यातला अनहद नाद अनुभवायचा असेल तर गुलझार व्हावे लागते.

माया, सुधा, पुन्हा माया आणि पुन्हा सुधा अश्या विलक्षण पेचात सापडलेला संवेदनशील महेंद्र, महेन्द्रवर जीवापाड प्रेम करणारी पण त्याच्या वागण्याने दुखावली गेलेली सुधा आणि महेन्द्रवर जीवापाड प्रेम करणारी, नंतर त्याचा संसार आपल्यामुळे उध्वस्त झालाय हे कळल्यावर पुन्हा उध्वस्त होणारी कविमनाची माया असा सगळा गुंता गुलझार अतिशय तरलपणे हाताळतात आणि जन्माला येतो इजाजत.

“पतझड़ में कुछ पत्तों के गिरने की आहट, कानों में एक बार पहन के लौटाई थी” या सारख्या कल्पना सूचण्यासाठी जरी कवि असणं आवश्यक असलं तरी ती चाहूल अनुभवण्यासाठी ते रसिक, तरल मनही हवं असतं. आणि “पतझड़ की वो शाख अभी तक काँप रही हैं” यातली वेदना थेट आतवर झिरपण्यासाठी तितकं संवेदनशील मन असावे लागते. या सर्व मानवी भावनांना, खरेतर गुलझारच्या कवितेतील या कल्पनांना कसलेही भौतिक अधिष्ठान वा अस्तित्व नाहीये. या सर्वस्वी अनुभवायच्या, मनाच्या खोल डोहात आतपर्यंत झिरपुन घ्यायच्या गोष्टी आहेत.  झाडाच्या फांद्यातुन झिरपणारी वाऱ्याची, पानाची सळसळ ही त्यालाच समजू शकते ज्याने प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतलाय. हे रूपक मायाच्या आयुष्यात आलेल्या स्थित्यन्तराचे आहे. ती हे सगळे जगलीय. महेन्द्रच्या विरहांने तिला या वेदनेची अनुभूती आलीय. त्या वेदनेतून झालेला हा साक्षात्कार आहे.

“वो शाख गिरा दो, मेरा वो सामान लौटा दो” ….. आणि वेळ पडलीच तर मनाची सगळी अस्वस्थता, कातरता, बेचैनी संपवून मुळावरच घाव घालु शकेल अश्या कठोरपणाचीही गरज आहे.

इज़ाजतची माया अशीच आहे.  बेदरकार तरीही संवेदनशील, मनस्वी. कुठलीही गोष्ट ठरवून प्लान करुन करणे तिच्या स्वभावातच नाहीये. तिला त्या त्या क्षणापुरते जगणे मंजूर आहे. त्यामुळेच कदाचित लग्नानंतर सुधाच्या सांगण्यावरुन महेंद्र मायाच्या सर्व वस्तु तिला परत पाठवून देतो. तेव्हा पोच देण्यासाठी माया त्याला एक चिठ्ठी लिहीते , ज्यात असते ही कविता.. मेरा कुछ सामान….

एक अकेली छत्री में जब आधे आधे भीग रहे थे
आधे सूखे, आधे गिले, सुखा तो मैं ले आयी थी

हि कल्पनाच केवढी तरल, केवढी सुंदर आणि तरीही त्रासदायक आहे. एकत्र असण्याच्या काळात एकमेकाच्या सहवासात घालवलेले ते जादुई क्षण.  तन-मन जणुकाही एकजीव झालेले. वेगळेपणा असा काही उरलेलाच नाही. मग जे काही सुख-दुःख असेल ते सामाईक झालेलं. दोघांनी मिळून भोगलेलं, उपभोगलेलं. त्यातही मायाची खंत आहे की तिला अर्ध्यातुनच जावं लागलं. प्रेमाच्या त्या पावसात अर्धवट भिजलेलं , अर्धवट शुष्क राहिलेलं मन.

गिला मन शायद, बिस्तर के पास पडा हो
वो भिजवा दो, मेरा वो सामान लौटा दो

आपल्या कवितेत ती म्हणते. शिल्लक राहिलेलं शुष्क, कोरडं मन मी माझ्याबरोबर घेवून आलेय. आपल्या प्रेमाचा तो ओलावा, ती जवळीक मात्र तिथेच मागे सोडून आलेय. ते वेडं मन तिथेच कुठेतरी रेंगाळतय अजुन. जमलं तर तेवढे फक्त परत पाठवून दे. बाकी काही नको.

एक सौ सोलह चाँद की रातें, एक तुम्हारे काँधे का तील
गीली मेहंदी की खुशबू, झूठमूठ के शिकवे कुछ

माझ्या मते बॉलीवुडमधल्या समस्त हिंदी गाण्यापैकी सर्वाधिक चर्चा झालेली ही एकमेव ओळ असेल. या “एकसौ सोलह चाँदकी राते” बद्दल आजवर इतकं लिहिले आणि वाचले गेलेय की जितके भगवदगीतेबद्दल सुद्धा नसेल. अनेकांनी अनेक अंदाज बांधले, विशेषतः एकसौ सोलह या आकड्याबद्दल अनेकांनी विश्लेषणं केली आहेत. गंमत म्हणजे गुलझार यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलेले आहे की त्या आकड्याला तसा काहीही अर्थ, कसलेही संदर्भ नाहीत. लिहीता लिहीता खुपदा सहज काहीतरी सुचुन जातं आणि ते इतकं आवडतं आणि गाण्यात चपखल बसतं की त्याचा आशय, संदर्भ शोधण्याची आवश्यकताच राहात नाही. आणि ते आहे तसं स्वीकारलं जातं. हे शब्दही तसेच उस्फूर्तपणे आलेले आहेत. ते म्हणाले होते की

“अंक इतना महत्वपूर्ण नहीं है जितनी यह बात कि प्रेम संबंध में जीने वाले दो में से एक व्यक्ति इस बात को सहेज कर रखता है कि उसने कितनी चांदनी रातें अपने प्रेमी के संग बिताई हैं|”

माया-महेन्द्रच्या प्रेमीजीवनातील असे कित्येक क्षण असतील जे मायाला साद घाल असतील. कधी सुखाचे, तर कधी दुःखाचे क्षण. अश्या गोष्टी ज्या दोघांनी फक्त एकमेकांपुरत्याच मर्यादित ठेवलेल्या आहेत. त्या क्षणांच्या आठवणी, त्या एकांतातील नखरे, प्रेमालापाचे, रुसव्या फुगव्याचे क्षण परत करता येतील का? मायाला कळून चुकलेय की महेंद्र आता सुधाचा झालाय, तिचा राहिलेला नाहीये. काहीअंशी तिने ते स्वीकारलेय सुद्धा. पण मन मानत नाही.

तिला महेंद्र नकोय, पण त्या साऱ्या क्षणांच्या आठवणी, ते क्षण ती परत मागतेय ज्यात तिने आपले आयुष्य खऱ्या अर्थाने जगलेले आहे. ते क्षण परत करणे शक्य आहे का?

झूठमूठ के वादे भी, सब याद करा दो
सब भिजवा दो, मेरा वो सामन लौटा दो

ती महेन्द्रला आठवण करून देते त्या क्षणी त्याने केलेल्या असंख्य वचनांची, तिच्या रुसव्या-फुगव्याची. तिला मान्य आहे की अशी वचने, ते रूसवेफुगवे, त्या लाड़िक, लटक्या तक्रारी ही त्या त्या क्षणांची तात्कालिक देण असते. त्यांना काही भौतिक अस्तित्व असायलाच हवे हे जरूरी नाही. आपली वचने त्याने पूर्ण करावीत हिसुद्धा तीची मागणी नाहीये. तिला फक्त ते सुखावणारे क्षण हवे आहेत. तेवढे परत आणता येतील का? आणि ते जऱ परत करणे शक्य नसेल तर बाकीच्या भेटवस्तू, प्रेमपत्रे यासारख्या भौतिक वस्तु परत करण्यात काहीच अर्थ नाही. कारण तिचा जीव त्या महेन्द्रच्या सहवासात घालवलेल्या क्षणांमध्ये गुंतलेला आहे. बाकी भौतिक गोष्टीत तिला कसलेच स्वारस्य राहिलेले नाहीये.

एक इजाजत दे दो बस
जब इस को दफ़नाऊँगी
मैं भी वही सो जाऊँगी

माया सर्वार्थाने महेन्द्रमध्ये गूंतलेली आहे. तो तिच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेला आहे. त्याच्याशिवाय, त्याच्या आठवणीशिवाय जगणे तिला सहनच होणार नाहीये. ज्या भावना, जे प्रेम, लालसा तिने महेन्द्रबद्दल बाळगल्या आहेत त्या ती परत मागतेय. आणि याचबरोबर ती अजुन एक मागणी, रादर परवानगी, इजाजत मागतेय की त्या सगळ्या भावना, ते क्षण, ते प्रेम तिने विसरावे अशी जर महेन्द्रची अपेक्षा असेल, तर तिलासुद्धा त्या प्रेममयी क्षणांमध्ये विलीन होवून जाण्याची, विरघळून जाण्याची परवानगी मिळावी. कारण त्यांनंतर तिच्या अस्तित्वाचे काही प्रयोजनच उरत नाही.ती सर्वस्वी महेंद्रमय होवुन गेलेली आहे. तिच्या आयुष्यातुन महेन्द्रला वजा केले की उरते ते निव्वळ एक शून्य. त्यापेक्षा तिला त्या क्षणांबरोबरच स्वतःचे अस्तित्व संपवणे जास्त स्विकारार्ह आहे.

मी वारंवार सांगत आलेलो आहे की आशाबाईंचा आवाज हे माझं पहिलं प्रेम आहे. आम्ही वेडे लतादिदीच्या आवाजाची एखाद्या भक्ताप्रमाणे भक्ती करतो पण आमचे प्रेम आहे ते आशाबाईंच्या सुरांवर, आवाजावर. आणि प्रेमभावना ही जगातल्या कुठल्याही भावनेपेक्षा श्रेष्ठ आहे माझ्या मते. या गाण्यात आशाबाई आशाबाई राहात नाहीत, त्या माया होवून जातात. अतिशय आर्तपणे थेट आतवर जावून झिरपणारे त्यांचे स्वर आपल्याला मायाच्या वेदनेची, तिच्या मनातील आन्दोलनांची सार्थ जाणीव करुन देतात. आणि नकळत आपणही माया होवून जातो. गुलझारसाहेबांच्या प्रत्ययकारी शब्दाना योग्य आणि समर्पक आधार देण्याची ताकद फक्त पंचमदांच्या संगीतातच आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा गुलझार, पंचम आणि आशा हे दैवी त्रिकुट एकत्र येते तेव्हा अश्या अविस्मरणीय गीतांची निर्मिती होते.

मुखड्यात रेंगाळणारे सिंथेसायजरचे सूर एखाद्या स्मृतीसारखे अंगावर येणारे. मध्येच गिटार आणि बासरीच्या रेझोनन्सचा केलेला अप्रतिम वापर आणि या सगळ्याची सांगड घालत काळजाला हात घालत अंगावर येणारा आशाबाईंचा आलाप.
‘लौटा दो’ च्या वेळी नकळत सुरु होणारा मंद मधुर तबला आणि पहिल्या इंटरल्यूडमध्ये पंचमने वापरलेला पं. उल्हास बापट यांच्या संतुरच्या सुरेल सूरांचा अप्रतिम तुकडा.. अहाहा ! पंचमची कमाल म्हणजे संतुरचे हे सूर त्याने पानगळीत झाडावरून अलगद गळून पडणाऱ्या शुष्क पानांच्या नादासाठी वापरलेले आहेत. दुसऱ्या इंटरल्यूडमध्ये येणारे सरोद, क्लैरीनेट आणि बासरीचे सुर ही खरी ट्रीट आहे या गाण्यातली. आणि या सर्वाबरोबर गाणं संपल्यावर देखील कानात, रादर गात्रा-गात्रांत रेंगाळत राहणारा आशाबाईंचा आर्त स्वर आपण जगत राहतो, अनुभवत राहतो. मग पंचमची आठवण असह्य होते आणि आपण आर्तपणे परमेश्वराला साद घालतो…

मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पड़ा है ! आमचा पंचम आम्हाला परत दे प्रभो, बाकी काही नको.

धन्यवाद.

विशाल कुलकर्णी
पनवेल. (०९९६७६६४९१९)