Category Archives: रसग्रहण – कविता व गाणी

मायबोली तसेच मिसळपाववरील काही सुंदर कवितांचे तसेच जुन्या गाजलेल्या गाण्यांचे तेथील दिग्गज महारथींनी केलेले रसग्रहण.

कोई ना संग मरे ….

कोई ना संग मरे …

दिवस संपत येतो. संध्याकाळी, कातरवेळी नकळत मनाला अनंताचे, क्वचित अद्वैताचे वेध लागतात. दिवस कसा सरला हेच लक्षात येत नाही. दिवसभराच्या धांदलीत मन सैरभैर होवून गेलेले असते. आपण नक्की क़ाय करतोय? कश्यासाठी जगतोय? कुठल्या आशेने पुन्हा-पुन्हा जगण्याच्या, जीवनाच्या मोहपाशात गुरफटत जातोय….? कश्याचेच भान उरत नाही. आणि अचानक एखादे दिवशी संध्याकाळच्या निवांत वेळी कुठल्यातरी विचारात मन गुरफटलेले असताना रफीचा आर्त, थेट आरपार जाणारा, अंतर्बाह्य हलवून सोडणारा स्वर कानामार्गे सगळ्या गात्रा-गात्रांतुन, कायेच्या रंध्रा-रंध्रातुन अलगद झिरपत जातो….

मन रे ! तू काहे ना धीर धरे

ब्रह्मानंदी टाळी लागणे कश्याला म्हणतात याचा जिवंत साक्षात्कार असतो तो. काही गाणी मुळातच मर्मबंधातली ठेव बनून येतात. येताना स्वर्गीय सौन्दर्याचं लेणं लेवुन येतात. नक्की कश्यासाठी गाणं ऐकावं असा प्रश्न पडण्याच्या सांप्रत काळात कश्या, कश्यासाठी म्हणून पुन्हा पुन्हा ऐकावं असा मनाला प्रश्न पाडणारं, ‘वो निर्मोही मोह ना जाने जिनका मोह करे’ म्हणताना मनाला स्वतःच्याच (गाण्याच्या) मोहात पाडणारं हे गीत. साहीरचे मोजक्या शब्दात जिवनाचे सार मांडणारे गहन पण प्रभावी शब्द, रोशनचं स्वर्गीय संगीत आणि ….

थेट काळजाला येवून भिड़णारा मनाला थेट ब्रह्मतत्वात विलीन करण्याचं सामर्थ्य असणारा मानवी रफीचा दैवी, आर्जवी यमन कल्याण ! रफी जीव ओवाळून टाकावा असे गात असतो…..

मन रे ! तू काहे ना धीर धरे

साहिरचा एकेक शब्द काळजाला स्पर्शत एकाच वेळी जगण्याचे सार आणि त्याच्या बद्दलच्या मोहाची निरर्थकता या दोहोंवर समर्थपणे भाष्य करत असतो.

परिवर्तन, बदल हा निसर्गनियम आहे. इथे काहीही चिरंतन नाही. प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक वस्तुला, प्रत्येक जिवाला, जीवाच्या प्रत्येक गुणधर्माला, स्वरूपाला कधी ना कधी बदलाच्या, परिवर्तनाच्या अवस्थेतुन जावेच लागते. इथे काहीही शाश्वत नाही. कभी ना कभी हर किसीको फना होना ही है . एक मानवी आशा, मोह…; सोडले तर बाकी सर्व काही नश्वर आहे. उतार-चढ़ाव हा स्वभाव आहे निसर्गाचा. मानवी जीवनही त्याला अपवाद नाही. त्यात सतत परिवर्तन होत राहणारच. त्यात कितीही ठरवले तरी आपण ढवळाढवळ करू नाही शकत. मग जे कधी आपल्या हातातच नव्हते त्यासाठी वृथा खंत कश्याला? आणि तरीही मन मोह काही सोडत नाही. देह असो वा आत्मा, भौतिक असो वा आध्यात्मिक कश्या ना कश्याच्या आसक्तीत गुंतून राहते. त्याला साहिर विचारतो…

इस जीवन की चढ़ती ढलती धुप को किसने बाँधा
रंग पे किसने पहरे डाले रूप को किसने बाँधा
काहे ये जतन करे

साहिरसारखा कवि दूसरा झाला नाही या भारतवर्षात. माझं हे विधान काही जणांना खटकेल कदाचित. कारण या देशाला अनेक समर्थ कविंची परंपरा लाभलेली आहे. एकाहुँ एक उत्कृष्ट कविवर्य या मातीने दिलेले आहेत. नावे घ्यायला गेलो तर दिवस पुरणार नाही. तरीही मी माझ्या मतावर ठाम आहे. कारण साहिर कमालीचा प्रॅक्टीकल माणूस होता. त्याच्या कवितेतला रोमांस देखील प्रॅक्टीकल असायचा आणि तरीही तो कधी खटकला नाही किंवा भरकटला नाही. इथेही पाहा ना, तो कळवळून सांगतोय की….

उतना ही उपकार समझ कोई
जितना साथ निभा दे

बाबारे, इथे कुणी कुणाचा नाहीये. ज्याचा जेवढा सहवास मिळाला तेवढाच आपल्या नशिबात होता असे समजायचे आणि पुढे निघायचे. “जन पळभर म्हणतील हाय हाय” हेच क़ाय ते सत्य आहे. इथे कुणी कुणाचा नाही. जो तो फक्त स्वतःच्याच विश्वात रमलेला. स्वत:पुरताच विचार करणारा. जन्म-मृत्यु , इथली माया, इथली मत्ता, इथली सत्ता सबकुछ मिथ्या है ! निव्वळ भ्रम आहे, सोड हे सगळे इथेच.

इथे साहिर एक त्रिकालाबाधित सत्य सांगून जातो, जे आपण कायम विसरतो किंवा विसरण्याचा प्रयत्न करतो..

जनम मरण का मेल है सपना
ये सपना बिसरा दे
कोई ना संग मरे !

रफीच्या धीरगंभीर , आर्त स्वरात ही ओळ ऐकताना अंतर्बाह्य थरथरायला होतं. किती महत्वाची गोष्ट सांगून गेलाय साहिर. जे काही आहे, जे कोणी आहे ते फक्त कुडीत श्वास असेतोवरच. एकदा श्वास संपला की सगळी नाती, मोह, बंध संपतात. कितीही प्रेम असले, माया असली तरी ती तुमच्या जीवात जीव असेपर्यंत. तुमच्यासाठी तुमच्याबरोबर मरायला कोणी तयार होत नाही. आणि तुमच्यानंतर काही काळात विसरुनही जातात लगेच. म्हणून साहिर प्रत्येकाला ठणकावून सांगतो…

वृथा मोह नको, कोई ना संग मरे !

वो निर्मोही मोह ना जाने
जिनका मोह करे
मन रे ! तू काहे ना धीर धरे ….! (इथे

© विशाल कुलकर्णी

ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्यां है…

 

रसिक चाहत्यांनी सभागृह गच्च भरलेलं आहे. त्यांच्या आवडत्या कविचं, शायर विजयच्या पुस्तकाचं आज प्रकाशन आहे. जोपर्यंत विजय जीवंत होता तोवर त्याला दोन वेळच्या जेवणाची शाश्वती नव्हती. आता त्याच्या मृत्युनंतर (?) मात्र त्याच्या साहित्याच्या सरणावर आपल्या स्वार्थाची पोळी भाजून घेण्यासाठी त्याच्या भावंडासहीत सगळे हपापले आहेत. अगदी प्रकाशक घोषबाबू सुद्धा त्यातलेच. त्यांना विजयबद्दल कधीच आपुलकी नव्हती. त्यात तो त्यांच्या पत्नीचा पूर्वाश्रमीचा प्रेमी. पण आता लोकांना त्यांची शायरी आवडतेय म्हणल्यावर घोषबाबू सुद्धा फायदा लाटायला आघाडीवर आहेत. स्टेजवर त्यांची पत्नी, विजयची पूर्वप्रेमिका मीना सुद्धा आहे, जिला मृत्युनंतर का होईना विजयच्या लेखणीला न्याय मिळतोय याचे समाधान आहे. प्रेक्षकांमध्ये ‘गुलाबो’ सुद्धा आहे जिने विजयवर मनापासून प्रेम केलय. तिच्या बदनाम पेशामुळे ती समाजात कायम तिरस्कृत राहिलेली आहे, पण तिच्याच प्रयत्नामुळे आज विजयच्या कविता प्रकाशित होताहेत. इकडे प्रकाशनाला सुरुवात होते आणि तिकडे सभागृहाच्या मागच्या भागातुन अतिशय आर्त परंतु ठाम आवाजात रफीसाहेबांचे सूर कानी येतात…

ये महलों, ये तख्तों, ये ताजों की दुनिया,
ये इंसाँ के दुश्मन समाजों की दुनिया,
ये दौलत के भूखे रवाजों की दुनिया,
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है ….?

सगळ्यांचे चेहरे सभागृहाच्या दाराकडे वळतात. तिथे दाराच्या चौकटीला धरून विजय उभा आहे. तोच विजय ज्याच्या तथाकथित मॄत्युचे निमित्त करून त्याच्या न पाहिलेल्या प्रेताच्या टाळूवरचे लोणी चाखण्यासाठी या कार्यक्रमाचा प्रपंच आहे. कृसावर टांगलेल्या विकल येशुसारखा थकलेला! समाजाला, त्याच्या स्वार्थीपणाला कंटाळलेला विजय दाराच्या चौकटीला दोन्ही हात टेकवून पराभूत अवस्थेत उभा आहे. घोषबाबुना आपला डाव फसल्याची जाणीव होते, त्यांचा आणि विजयच्या मतलबी भावंडांचा चेहरा बघण्यासारखा होतो. विजयला जिवीत बघून गुलाबो मात्र अतिशय प्रसन्न झालेली आहे. लोक अवाक झालेले आहेत. साहिरचे टोकदार शब्द रफीसाहेबांचा आर्त, विकल आणि तरीही टोचणारा, बोचरा स्वर लेवुन आपल्या मेंदुवर, मनावर अतिशय आक्रमकपणे चाल करून येतात…

ये महलों, ये तख्तों, ये ताजों की दुनिया..

71257249_2684129234953655_2864370305961295872_n

चित्रपटाच्या बाबतीत त्यांचा शेवट खुप महत्वाचा असतो. १९५७ साली आलेल्या प्यासामधुन गुरुदत्तने हे पुन्हा एकदा सिद्ध केले. तोवर हलक्याफुलक्या विनोदी, अपराधपट करणाऱ्या गुरुभाईने प्यासा केला आणि लोकांनी गुरुभाईला एकदम ध्रुवपदावरच नेवून बसवले. खरे सांगायचे तर या चित्रपटामुळे गुरुदत्तलाच स्वतःचा नव्याने शोध लागला म्हणायला हरकत नाही. याच बोलपटाने गुरुदत्तला एक विलक्षण संवेदनशील दिग्दर्शक म्हणून नाव मिळवून दिले. प्यासाचा क्लायमॅक्स या गाण्याने करून गुरुदत्तने प्यासाला जणु काही ध्रुवपदावरच नेवून बसवले.

“ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है?”
साहिरमियांनी या ओळीतून अतिशय परखडपणे एक कटुसत्य सांगितलेले आहे.

मानवाच्या निर्मितीपासुन त्याच्यासमोर कायम असलेला मूलभूत प्रश्न कुठलाय माहीतीय? नाही, रोटी कपड़ा और मकान वगैरे नंतरच्या गोष्टी झाल्या. मानवाची मुळ समस्या ही आहे की क़ाय मिळाले म्हणजे मी संतुष्ट होईन? तृप्त होईन? तृप्ती ही फार दुर्लभ गोष्ट आहे. धन प्राप्त करता येते, आरोग्य कमावता येते, मित्र, नातेवाईक मिळवता येतात पण तृप्ती? तृप्ती कधी दृष्टीपथात येतच नाही. जेवढे मिळेल तेवढी अजुन, अजुन, अजुन …. अजुनची भूक अजुनही वाढतच जाते त्याला अंत नाहीये. “ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्यां है?”

आपला पूर्वाश्रमीचा प्रेमी जीवंत पाहुन घोषबाबुची पत्नी मीना मनोमन समाधानी आहे. पण विजयला या जगाची यथार्थता, या समाजाची वास्तविकता कळुन चुकलेली आहे.

हर इक जिस्म घायल, हर इक रूह प्यासी
निगाहों में उलझन, दिलों में उदासी

इथे सगळेच अश्वत्थामा आहेत. प्रत्येकाच्या कपाळावर एक भळभळती जखम आहे. जो तो गोंधळलेला, हरवलेला. आयुष्याशी झुंजताना स्वत:लाच गमावून बसलेला. अतिशय विषण्ण मनाने विजय स्वत:लाच प्रश्न करतो.

ये दुनियाँ है या आलम ए बदहवासी?

त्याला जगण्यातली निरर्थकता कळुन चुकलेली आहे. आपल्या स्वानुभवातून समाजाची स्वार्थी, मतलबी मानसिकता त्याला उमजलेली आहे. इथे कोणी कुणाचा नाही, जो तो फक्त स्वतःचा हे त्याला नेमके उमजले आहे. तो या प्रेताच्या टाळुवरचे लोणी खाणाऱ्या मुर्दाड, स्वार्थी लोकांना आपल्या काव्यातुन आरसा दाखवतो.

यहाँ इक खिलौना है इंसा की हस्ती
ये बस्ती हैं मुर्दा परस्तों की बस्ती

साहिरच्या ओळी जरी त्या त्या चित्रपटातील परिस्थितीशी, घटनांशी सुसंगत असल्या तरी त्या ओळी, त्या त्या चित्रपटापुरत्या मर्यादित कधीच नसतात. साहिरमियाँ कायमच आपल्या शायरीतून तत्कालीन परिस्थितीवर, समाजव्यवस्थेवर नेमके आणि परखड़ भाष्य करत कोरडे ओढ़त असतात. दारिद्र्य, निरक्षरता, बेकारी, भ्रष्टाचार, वासना, क्रुरता आणि अनाचाराच्या अनागोंदीत अडकलेला आपला समाज साहिरसाठी नेहमीच एक माध्यम ठरत आलेला आहे व्यक्त होण्यासाठी. आपल्या काव्यातुन, शायरीतून साहिरमियाँ जणु काही सगळ्या मानवजातीचीच व्यथा-वेदना मांडत आलेले आहेत.

साहिरचे स्वतःचे आयुष्यसुदधा अतिशय वेदनामय आहे. साहिर लुधियानवी हे हिंदी साहित्यसृष्टीला पडलेलं एक अतिशय देखणं स्वप्न आहे. हिंदी चित्रसृष्टीच्या, उर्दू-हिंदी साहित्याच्या क्षेत्रातले एक अतिशय उज्वल आणि महत्वाचे पान आहे. मला साहिर आवडतो कारण साहिर विलक्षण छळतो. आणि तरीही साहिर जगण्याला एक विलक्षण सकारात्मक अशी दिशा दाखवत राहतो. त्याच्या लहानपणी जे त्याने भोगलय. विक्षिप्त वडील, कायम बापाच्या अत्याचाराला बळी पडलेली आई आणि अश्या परिस्थीतीत लहानाचा मोठा झालेला साहिर त्याच्या मनात एकुण आयुष्याबद्दलच कटुतेची भावना निर्माण झाली असती तरी काही वाटले नसते. पण आयुष्यभर अनेक वाईट अनुभव घेत मोठा झालेला साहिर सगळी कटुता बाजूला ठेवून जगंण्याच्या सकारात्मकतेवर भाष्य करतो. जगण्यातल्या आनंद, त्याची सार्थकता दाखवून देतो तेव्हा तो अधिकाधिक जवळचा वाटायला लागतो..

पण इथला साहिर कुणी औरच आहे. वेगळा आहे. आयुष्याला, समाजाच्या स्वार्थी दांभिकपणाला कंटाळलेला , थकलेला विजय इथे साहिरमियांचा चेहरा आहे. आयुष्यात कधीकधी अशी वेळ येते की आपला स्वभाव बाजूला ठेवून बंड पुकारावेसे वाटते. हातात मशाल घेवून सगळा अंधार लख्ख धुवून काढावासा वाटतो.

जला दो इसे फूक डालो ये दुनिया
जला दो, जला दो, जला दो

इथे विजयच्या माध्यमातून साहिरामियाँ या भौतिकतावादी, स्वार्थी-मतलबी दुनियेला अखेरचा इशारा देतात. आपल्या शायरीतून इथल्या दांभिक समाजाला स्पष्ट आरसा दाखवतात.

यहाँ पर तो जीवन से है मौत सस्ती
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है .

शेवटी विजय या स्वार्थी जगाचेच अस्तित्व नाकारतो. या दुनियेचा धिक्कार करत जगाला ठणकावून सांगतो की “बास झाले, आता यापुढे हे सहन केले जाणार नाही. जऱ हे विश्व, ही दुनिया अशीच राहणार असेल तर आम्हाला तीची गरज नाही. नष्ट करा हे मतलबी जग. तेव्हाच नव्या आशादायक, स्वच्छ, सुंदर जगाचा पुन्हा पाया घालता येईल.

‘जला दो इसे फूँक डालो ये दुनिया, मेरे सामने से हटा लो ये दुनिया, तुम्हारी है तुम ही संभालो ये दुनिया…।’

इथे पुन्हा गुरुदत्तच्या दिग्दर्शनाची कमाल अनुभवता येते. हे जग नाकारताना विजय आपणही याच जगाचा एक भाग आहोत हे विसरत नाही. जगाला नष्ट करायला निघालेला विजय स्वतःचे अस्तित्वही नाकारतो. तो हॉलमधेच जाहीर करतो की ‘मी विजय नाही” … ,’
साहिबान, मैं विजय नहीं हूँ…।’

प्रेक्षकात एक प्रचंड प्रक्षोभ माजतो. पड़द्यावरच्या आणि पडद्याबाहेरच्याही. विजयच्या मनातली ती विद्ध आग घेवूनच आपण चित्रपटगृहाच्या बाहेर पडतो.

प्यासा : १९५७
#साहिरमियाँ #गुरुदत्त #सचिनदेवबर्मन #रफीसाहेब

© विशाल कुलकर्णी