Category Archives: माझी फ़ोटोग्राफी

मी घेतलेली छायाचित्रे

ऋतू हिरवा

 

चार घरांचे गांव चिमुकले पैल टेकडीकडे
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे.
पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पडे
हिरव्या कुरणामधुनि चालली काळ्या डोहाकडे…. (बालकवि)

पावसाळा संपत आलाय, वर्षाराणीला आता परतीचे वेध लागलेत. पण तिच्या इथल्या अल्पकालीन वास्तव्याने सुद्धा हि धरा नितांतसुंदर अशा हिरवाईने नटवून, सजवून टाकलीय. एखादी नवविवाहिता लग्नानंतर प्रथमच माहेरी यावी आणि तिच्या येण्याने माहेरची सारी रयाच उजळून जावी तसं काहीसं झालंय. अर्थात हे नेहमीचंच आहे पण तरीही प्रत्येक वेळी नवंनवंसं, हवंहवंसं वाटणारं आहे. विशेषतः मी राहतो ते नेरेगाव ; जुन्या माथेरान रोडवर पनवेलपासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेलं हे छोटंसं, आता शहरी होत चाललेलं एक खेडं. एका बाजूला हळू हळू जवळ येत चाललेले पनवेलचे शहरीकरणाचे पाश स्वतःपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत इतर तिन्ही बाजूंनी व्यापलेला हिरवागार निसर्ग आणि डोंगरदऱ्या जपण्याचा प्रयत्न करणारं नेरे गाव.

नेरेगावातून एक रस्ता मागच्या बाजूने सह्याद्रीचे बोट पकडून आंबिवली, लोणीवली, शेडुंग, पाली असे करत कुठल्यातरी एका ठिकाणी एक्सप्रेस वेला स्पर्शत कोकणात शिरतो. तर एक रस्ता गाढेश्वरी नदीशी गप्पा मारत-मारत वाजे, वाजापूर , धोदाणी करत थेट माथेरानच्या पायथ्याशी जावून पोचतो. एक गोष्ट पक्की कि पनवेल सोडून इतर कुठल्याही दिशेने जा , जिथवर नजर जाईल तिथवर सर्वत्र हिरवाई पसरलेली दिसून येतेय.

20160825_120611

निसर्गाच्या नाना कळा, नाना रंग , विविध रूपे. निसर्ग जेव्हा आपल्याच लहरीत, स्वतःच्याच तालावर डोलायला लागतो ना, तेव्हा त्याच्या लीला , त्याची रूपे पाहण्यासारखी असतात. त्यातही त्याचा मुड आनंदी असेल तर मग सगळे विश्वच सुंदर होऊन जाते. मग अगदी एखाद्या शुष्क, पर्णहीन वृक्षाला सुद्धा एक वेगळेच सौंदर्य प्राप्त होते. पावसाळा म्हणजे अशीच पर्वणी असते..! शांताबाई (शेळके) म्हणतात…

पावसाच्या धारा येती झरझरा
झांकळलें नभ, वाहे
सोंसाट्याचा वारा

रस्त्याने ओहोळ जाती खळखळ
जागजागीं खाचांमध्ये तुडुंबले
जळ

भरून आलेलं आभाळ, बहरून आलेली धरा ! प्रियेच्या आवेगाने धरित्रीकडे झेपावणाऱ्या वर्षेच्या धारा ! सगळंच कसं मोहून टाकणारं, वेड लावणारं. जणू काही कालिदासाच्या मेघदूतामध्ये वर्णिलेले त्या कामार्त यक्षराजाचे ते विरहवेडे दुतच ! यक्षाचा निरोप घेऊन त्याच्या प्रियेकडे (कि धरेकडे?) निघालेले ते मेघदूत !

निळे सावळे घन थरथरणारे
दंव्-बिंदूचे अन हळवे स्पंदन
विहग स्वरांचे सुखे मिरवती
शुभ्र क्षणांचा सुरेल मेणा…

आणि मिलनाच्या त्या आतुर, अधीर ओढीने अलगद स्रवणारी ती वसुधा, तिच्या जणूकाही स्तनसम पर्वतातून झरणारे ते निर्झर कुठल्याश्या अनामिक ओढीने , अज्ञात दिशेने, आवेगाने धावत सुटतात. आणि जिथून जिथून जातील तिथली धरा आपलं रूप पालटायला लागते, नटायला लागते. हिरवाईचा विलक्षण, संमोहक साज लेवून सज्ज होते. अगदी नजर पोचेल तिथपर्यंत हिरवेगार मखमली गालिचे अंथरलेले. केवळ जमीनच नाही, तर झाडे, वेली एवढेच नव्हे तर एखाद्या एकाकी, ओसाड, घराची एखादी जीर्ण पडकी भिंतसुद्धा हिरवीगार होऊन गेलेली असते या दिवसात. एखाद्या शुष्क वृक्षाला सुद्धा बांडगुळाच्या रुपात का होईना पण हिरवाई चिकटतेच. अगदी जातिवंत कुरुपतेलासुद्धा सौंदर्य मिळवून देणारी अशी ही या ऋतूची किमया….

20160825_120711

बाकीबाब त्यांच्या एका कवितेत फार छान लिहून गेलेत याबद्दल…

जिकडे तिकडे गवत बागडे
कुठे भिंतीच्या चढे कडेवर
ती म्हातारी थरथर कापॆ
सुखांसवे होऊनी अनावर

आणि अशा या स्वर्गीय वातावरणात जेव्हा अचानक पावसाची रिमझिम संततधार भेटावी…

अहाहा, यासारखे दुसरे सुख नाही. पावसाची साथ कुणाला नको असते? पण माणसाला हे क्षण जपून ठेवावेसे वाटतात. नभातून कोसळणारा पाऊस, चोहोबाजुला पसरलेली हिरवाई आणि “थांब, मी या पावसाला कैदच करून टाकते!” म्हणणारी चिंब प्रिया…, ती हिरवळलेली वसुधा ! स्वर्ग-स्वर्ग तो अजून काय असतो?

मेघांचे उत्सव रिमझिमणारे
जलदांचे अन सुरेल चिंतन
समीर बावरा निरंतर गातो
आषाढातील जलदाच्या वेणा…

खरेतर मला भटकायला आवडतं आणि पावसात खास करून धबधबे, नद्या बघत बसण्यापेक्षा त्या पावसाने ओलेचिंब झालेले रस्ते न्याहाळणं, त्या रस्त्यावरून फार नाही, पण तरीही अगदी फार फार ८०-९० च्या वेगाने बाईक चालवणं हे खास आवडतं. पाऊस जर फार मोठा नसेल ना तर त्या पावसाची एक वेगळीच गंमत असते. मातीला एक जीवघेणा , वेड लावणारा गंध सुटलेला असतो. वाईट अवस्था होते. गाडी चालवू? क्लच-अ‍ॅक्सेलरेटरकडे लक्ष देवु? की हेल्मेटच्या काचेवरून ओघळणारे पाणी टिपत बसू…..
कि सगळे सोडून गाडी एका बाजूला उभी करून मुग्ध करून सोडणाऱ्या त्या मृदगंधाच्य आहारी जावू? काही कळेनासे होते.

पण समोर दूरवर जाणारा , हिरव्यागार वनराईत लपलेला रस्ता दिसत राहतो आणि मग भान विसरून फक्त अ‍ॅक्सेलरेटर कमी जास्त करत पुढे जात राहणं इतकंच आपल्या हातात उरतं. इथुन तिथून चिंब भिजलेला रस्ता, रस्त्याच्या कडेने पावसाची जल मौक्तिके अंगा-खांद्यावर मिरवत उभी असलेली हिरवीगार झाडे आपलं लक्ष वेधून घ्यायला लागतात. कुठेतरी माझ्याही नकळत मी ही त्या हिरवेपणात हरवत हिरवा व्हायला लागतो. मग काळ वेळ विसरायला होतं. सकाळ, दुपार , संध्याकाळ असे भेद विसरून जायला होतं. बालकवींच्या कवितेत अनुभवलेली ती ‘आनंदी’ अवस्था असते.

सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले
इकडे, तिकडे, चोहिकडे
…………………………..आनंदी आनंद गडे !

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातल्या सगळ्या विवंचना विसरून निसर्गापुढे, त्याच्या महानतेपुढे नतमस्तक होण्याचा तो क्षण असतो. स्वतःचे अस्तित्व , काही काळापुरते का होईना पण विसरून त्या वनदेवतेला शरण जाण्याचा तो क्षण असतो. अशा वेळी मग मीही स्वतःला भौतिकाच्या, व्यावहारीकतेच्या चौकटीच्या बाहेर फेकून देतो आणि …..

गीत अधरीचे ते हूळहूळणारे
थिजलेल्या अन मौनाचे मंथन
मेघही वळले होवून आतूर
अन जलधारांची अक्षयवीणा…

ते मुग्ध इशारे प्रतिबिंबांचे
रुजतो अन होवून हिरवे पाते
लंघुन सार्‍या सीमा शब्दांच्या
एकटा कोरतो मौनाच्या लेण्या… !!

विशाल कुलकर्णी
३०/०८/२०१६

करवंदं, उंबरं… मोदक आणि अर्थातच कोकण !

आपण खरंच नशीबवान आहोत. रोजच्या रामरगाड्याचा कंटाळा आलाय, थोडा बदल हवाय असे वाटले की फारशी धावपळ करावी लागत नाही. ‘रजा मिळत नाही’यासारखी कारणे बायकोच्या तोंडावर फेकून तिचे वाकडे झालेले तोंड बघावे लागत नाही. कंटाळा आलाय तर दोन कपडे बॅगेत भरा आणि निघा….

सज्जनगड आहे, कोयनाडॅमचा परिसर आहे अगदीच एक-दोन दिवस हातात असतील आणि हाताशी स्वतःचे वाहन असेल तर मग कोकणही फार दूर नाही. गेल्या महिन्यात असेच झाले. बायकोला कधी नव्हे ते शनीवारची सुटी मिळाली तिच्या शाळेतून आणि रवीवार जोडून घेवून आम्ही दिवे आगारला कुच केले. सकाळी लवकरच घर सोडले. ताम्हिणीच्या रस्त्याला लागताना आजुबाजुचे कोरडे वातावरण बघून थोडा मुडऑफच झाला होता. पण जरा आत शिरल्यावर हळुहळू हिरवाई दिसायला सुरुवात झाली. त्यात एका ठिकाणी करवंदाची जाळी दिसली म्हणून थांबलो आणि मग हरवलेला मुड परतायला वेळ लागला नाही.

प्रचि १
1

प्रचि २
2

खरेतर दिवेआगारला ज्यांच्याकडे उतरणार होतो त्या केळकरकाकुंना आधी फोन करून जेवायच्या वेळेपर्यंत पोचतो असे सांगितले होते. पण ताम्हिणी घाटातला हा रानमेवा पाहून काकुंना परत फोन केला आणि आता काय जेवायच्या वेळेपर्यंत पोहोचू असे वाटत नाही असे सांगुन टाकले. पण काकुंनी , “काळजी करु नका, तुम्ही चार वाजता पोहोचलात तरी गरम गरम जेवायला वाढेन” असे सांगितले आणि आम्ही निश्चिंत झालो.

प्रचि ३
कच्ची-पक्की करवंदे
3

प्रचि ४
हि फळे भलतीच टेम्प्टींग वाटत होती, पण नक्की काय आहे ते माहीत नसल्याने तोंडात टाकायचा धीर झाला नाही.
4

प्रचि ५
उंबर
5

प्रचि ६
6

प्रचि ७
7

प्रचि ८
8

आजुबाजुला फिरताना हे दोस्तही सापडले …
प्रचि ९
9

प्रचि १०
10

प्रचि ११
11

शेवटी अकरा-साडे अकराच्या दरम्यान नाईलाजानेच तिथून बाहेर पडलो आणि माणगावच्या दिशेने कुच केले. यानंतर मात्र अध्येमध्ये कुठेच थांबलो नाही. करवंदं, उंबरं खाऊन पोटही बर्‍यापैकी भरलेलं असल्यामुळे आता जेवायला मुक्काम पोस्ट दिवे आगार गाठायचे असेच ठरवले होते. त्यानुसार दोन वाजेपर्यंत दिवेआगारला पोचलो.

केळकरांचे हे केळकर भोजन आणि निवासगृह काही फार उत्कृष्ट वगैरे कॅटेगरीतले नाहीये. खरेतर ते साधेच आहे अगदी. पण त्यामुळेच तिथे घरचा फिल येतो. महत्वाचे म्हणजे कोकणच्या गाभ्यात राहात असुनही, स्वतः अस्सल कोब्रा असुनही केळकर कुटुंबिय कोब्रांना लाज आणतात. चक्क अतिशय प्रेमाने, मायेन विचारपूस करतात. स्वतःचेच गाडे पुढे न रेटता तुमचे म्हणणे ऐकुन घेतात. आणि महत्वाचे म्हणजे ‘हे असलं काही आमच्याकडे मिळत नाही’ असे वस्सकन अंगावर न येता ‘ते’ कुठे मिळू शकेल हे प्रेमाने सांगतात. ( हे आणि ते म्हणजे मांसाहारी अन्न).”

केळकरांकडे त्यांच्या घराव्यतिरीक्त सहा-सात जादा खोल्या आहेत त्या ते पर्यटकांसाठी भाड्याने देतात. प्रत्येक खोलीत दोन कॉट, गाद्या, पंखे यासारखे जुजबी सामान असते. एसीची चैन इथे नाही. पण तरीही लोक केळकरांकडे यायला धडपडतात. त्याचे कारण म्हणजे काकुंकडे मिळणारे उकडीचे मोदक. ते तसे कोकणात सगळीकडेच मिळतात हो, पण आंब्यांच्या दिवसात काकुंकडे खास हापुसचे शाही मोदक असतात आणि अप्रतिम चवीचं शुद्ध शाकाहारी जेवण ….

प्रचि १२
12

प्रचि १३
केळकर निवास
13

बरं खोलीत गरम होतय म्हणून तुमच्यावर कोणी खोलीतच बसून राहा म्हणून सक्ती नाही केलेली काही. केळकरांची छान दोन एकराची वाडी आहे. कुठेही जावून पथारी पसरा. दिवे आगारला गेले की समुद्रावर फिरणे तर होतेच. पण माझा मुख्य प्रोग्राम असतो, काकुंकडून एक चटई घ्यायची आणि वाडीत जावून तोंड वर करून पडायचे. एखादे पुस्तक आणि जोडीला कधी तलत, तर कधी वसंतराव, कधी आशाबाई तर कधी अख्तरीबेगम असतातच.
सुख म्हणजे तरी दुसरे काय असते हो?

प्रचि १४
14

प्रचि १५
15

केळकरांकडे पोचलो आणि गरमागरम जेवूनच घेतले आधी. माफ करा मोदकांचे फोटो काढायला वेळ नाही मिळाला. (खरेतर बायकोने मोबाईल आणि कॅमेरा दोन्ही काढून घेतला होता. आता आधी गपचूप, व्यवस्थीत जेव असा दम भरुन) तसेही समोरचे गरमागरम खास हापुसचे शाही मोदक पाहिल्यावर फोटो काढण्याचे भान आणि वेळही कुणाला होता म्हणा.

केळकरांच्या वाडीत अजुनही बरंच काही आहे बरंका…

प्रचि १६
फणस…
16

प्रचि १७
17

प्रचि १८
18

प्रचि १९
19

प्रचि २०
20

प्रचि २१
21

प्रचि २२
22

प्रचि २३
23

प्रचि २४
24

प्रचि २५
25

त्या दिवशीही संध्याकाळी समुद्रकिनार्‍यावर एक चक्कर झालीच. दिवे आगारच्या समुद्रकिनार्‍याची मात्र वाट लागलेली आहे आता. तिथे वॉटरस्पोर्ट्स सुरु झाल्यापासून सगळ्या किनार्‍यावर ती वाहने दिवसभर इकडून-तिकडे फिरत असतात. निवांतपणे समुद्रकिनार्‍यावर बसून सागराची गाज ऐकण्याचं सुख आता दिवे आगारमध्ये उपभोगता येत नाही. त्यासाठी मग तुम्हाला रात्री साडे सात-आठच्या नंतर बीचवर जावं लागतं. त्यावेळी लोकांची गर्दीही विरळ झालेली असते. त्यामुळे वॉटरस्पोर्ट्सवाल्यांचा धिंगाणाही कमी झालेला असतो.

तरीही एखादा चुकार रेंगाळत असतोच शेवटची गिर्‍हाइके शोधत…
प्रचि २५
25

आम्ही सहा-साडे सहाच्या सुमारास गेलो होतो बीचवर. भास्कररावांना बाय-बाय केल्याशिवाय निघायचे नाही असे ठरवले होते. गर्दी कमी व्हायला लागली होती.

प्रचि २६
26

प्रचि २७
27

प्रचि २८
28

शेवटी भास्करराव अगदीच दिसेनासे झाल्यावर आम्हीही बीचचा निरोप घेवून परत केळकरांच्या घराकडे निघालो. मोदक वाट बघत होते. सकाळी लवकर उठून एक चक्कर समुद्रकिनार्‍यावर टाकायची, सुर्यनारायणाचे दर्शन घ्यायचे आणि मग साडे आठ-नऊच्या दरम्यान न्याहारी करून हरिहरेश्वराकडे प्रयाण करायचे. असा बेत होता. त्यानुसार सकाळी साडेपाच-सहाच्या दरम्यान समुद्रकिनार्‍यावर येवून हजर झालो.

समुद्रकिनार्‍यावर तसा उजेड होता बर्‍यापैकी, पण अजून सुर्यनारायणाचे आगमन झालेले नव्हते. आमच्यासारखेच सकाळची शुद्ध हवा खायला आलेले काही रसिक लोक दिसत होते. काहींचा व्यायाम सुरू होता, तर काही जण नुसतेच या टोकापासून त्या टोकापर्यंत चालत होते. इतक्यात पुर्वा उजळायला लागली..

प्रचि २९
29

पूर्वा उजळली तसे आसमंतही झळाळून निघाले..
प्रचि ३०
30

प्रचि ३१
31

प्रचि ३२
32

आणि तेवढ्यात सुर्यनारायणाने हजेरी लावलीच.

प्रचि ३३
33

प्रचि ३४
34

आता काकुंच्या हातचे गरमागरम पोहे-उप्पीट जे असेल ते हाणायचे आणि हरिहरेश्वरला रवाना….

जाते-जाते एक सेल्फी हो जाये?

35

हरिहरेश्वरबद्दल पुन्हा कधीतरी… !

विशाल.