परमेश्वराने सृष्टीची निर्मिती करताना पहिली चूक ही केली की त्याने मानव पण निर्मिला. दूसरी चूक ही केली की मानवाला विचार करण्याची, कल्पना शक्तीची देणगी दिली. तसं पाहायला गेलं तर हे मानवाला मिळालेलं एक वरदान, एक खास भेट आहे. पण त्याने झाले असे की मानव विचार करायला लागला. मानव हा तसा समुहप्रिय प्राणी, त्यामुळे त्याने समुहात राहायला सुरुवात केली. तसे समुहात राहण्याचे नियम बनवले गेले. आणि तिथेच बिनसले. नियम आले की बंधने वाढतात. पण माणूस सरसकट एकसारखा नसतो. जितक्या व्यक्ती तितक्याच प्रवृत्ती. कुणी बंधने पाळतो तर कुणी बंडखोरी करतो. प्राण्यांचे बरे असते ना? उन्मुक्त जीवन, कसली बंधने नाहीत, नियम नाहीत. आयुष्यात कसली गुंतागुंत नाही. “
गुंतागूंत” , यस्स, किती तरी वेळ झाला हाच शब्द आठवण्याचा प्रयत्न करतोय. या विचार करण्याच्या क्षमतेने , कल्पनाशक्तीने मानवी जीवन इतके गुंतागूंतीचे करुन ठेवलेय की विचारूं नका. But then it’s completely human. कदाचित परमेश्वराने ठरवलेले असेल की पुढे आपल्याला संपूरणसिंग कालरा उर्फ गुलझार नावाचा एक हज़ारो लाखो लोकांना वेड लावणारा वेडा जन्माला घालायचा आहे. त्याची सोय म्हणून कदाचित परमेश्वराने आधीचा ही क्षमता, हे सामर्थ्य मानवाला दिलेले असावे.
गुलझारचा , त्यांनी दिग्दर्शीत केलेला कुठालेही चित्रपट पाहा, त्यात मानवी जीवनातील मानवी नात्यातील गुंतागूंतीवर थेट आतवर जावून भिडणारे भाष्य असते. असाच एक चित्रपट होता १९८७ मध्ये आलेला ‘इजाजत’ ! महेंद्र (नसीरमियाँ), सुधा (रेखा) आणि माया (अनुराधा पटेल) यांच्या प्रेमत्रिकोणावर आधारीत अतिशय गुंतागूंतीचे कथानक. श्री सुबोध घोष यांच्या कथेवर आधारित या चित्रपटाची पटकथा, संवाद, गीते आणि दिग्दर्शन सर्वस्वी गुलझारचे होते. सोबत चार चाँद लावायला पंचमदा, आशाबाई यांच्यासारखे मनस्वी कलाकार होतेच. इजाजत सर्वार्थाने गाजला. त्याची गाणी आजही ओठावर सहजी रेंगाळतात. त्यातलेच एक नितान्तसुन्दर गीत..
मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पड़ा है.
गुलझारच्याच काही ओळी आठवतात..
सिर्फ अहसास है ये दूर से महसूस करो, प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो।
प्रेमाच्या अस्पर्श, अशारिर आणि तरीही अभिन्न भावनेची खरी गंमत अनुभवायची असेल तर डोळे मिटायचे आणि डोळ्यासमोर ‘मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पड़ा है’ म्हणत आर्तपणे साद घालणारी माया डोळ्यासमोर आणायची.
गुलझार हा विलक्षण भावनाप्रधान कवि आहे. त्यांच्या कवितेत, गाण्यात कधीच अर्थ, आशय शोधायचा वेडेपणा करू नये असे माझे प्रामाणिक मत आहे. गुलझार समजून घ्यायचा असेल तर नुसती त्याची गाणी ऐकुन, कविता वाचुन कळत नाही. गुलझार ही एक वृत्ती आहे. गुलझार जगावा लागतो, अनुभवावा लागतो. त्यातली अनुभूती घ्यायला सुरूवात केली की गुलझार आपोआप उलगड़त जातो. आता हेच बघा ना…
भीगे दिन, खत में लिपटी रात या गोष्टी. नेहमीच्या भौतिक आयुष्यात त्यांना काहीच अस्तित्व नाही. पण या शब्दात गुलझार ओतप्रोत सामावलेला आहे. त्यातला अनहद नाद अनुभवायचा असेल तर गुलझार व्हावे लागते.
माया, सुधा, पुन्हा माया आणि पुन्हा सुधा अश्या विलक्षण पेचात सापडलेला संवेदनशील महेंद्र, महेन्द्रवर जीवापाड प्रेम करणारी पण त्याच्या वागण्याने दुखावली गेलेली सुधा आणि महेन्द्रवर जीवापाड प्रेम करणारी, नंतर त्याचा संसार आपल्यामुळे उध्वस्त झालाय हे कळल्यावर पुन्हा उध्वस्त होणारी कविमनाची माया असा सगळा गुंता गुलझार अतिशय तरलपणे हाताळतात आणि जन्माला येतो इजाजत.
“पतझड़ में कुछ पत्तों के गिरने की आहट, कानों में एक बार पहन के लौटाई थी” या सारख्या कल्पना सूचण्यासाठी जरी कवि असणं आवश्यक असलं तरी ती चाहूल अनुभवण्यासाठी ते रसिक, तरल मनही हवं असतं. आणि “पतझड़ की वो शाख अभी तक काँप रही हैं” यातली वेदना थेट आतवर झिरपण्यासाठी तितकं संवेदनशील मन असावे लागते. या सर्व मानवी भावनांना, खरेतर गुलझारच्या कवितेतील या कल्पनांना कसलेही भौतिक अधिष्ठान वा अस्तित्व नाहीये. या सर्वस्वी अनुभवायच्या, मनाच्या खोल डोहात आतपर्यंत झिरपुन घ्यायच्या गोष्टी आहेत. झाडाच्या फांद्यातुन झिरपणारी वाऱ्याची, पानाची सळसळ ही त्यालाच समजू शकते ज्याने प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतलाय. हे रूपक मायाच्या आयुष्यात आलेल्या स्थित्यन्तराचे आहे. ती हे सगळे जगलीय. महेन्द्रच्या विरहांने तिला या वेदनेची अनुभूती आलीय. त्या वेदनेतून झालेला हा साक्षात्कार आहे.
“वो शाख गिरा दो, मेरा वो सामान लौटा दो” ….. आणि वेळ पडलीच तर मनाची सगळी अस्वस्थता, कातरता, बेचैनी संपवून मुळावरच घाव घालु शकेल अश्या कठोरपणाचीही गरज आहे.
इज़ाजतची माया अशीच आहे. बेदरकार तरीही संवेदनशील, मनस्वी. कुठलीही गोष्ट ठरवून प्लान करुन करणे तिच्या स्वभावातच नाहीये. तिला त्या त्या क्षणापुरते जगणे मंजूर आहे. त्यामुळेच कदाचित लग्नानंतर सुधाच्या सांगण्यावरुन महेंद्र मायाच्या सर्व वस्तु तिला परत पाठवून देतो. तेव्हा पोच देण्यासाठी माया त्याला एक चिठ्ठी लिहीते , ज्यात असते ही कविता.. मेरा कुछ सामान….
एक अकेली छत्री में जब आधे आधे भीग रहे थे
आधे सूखे, आधे गिले, सुखा तो मैं ले आयी थी
हि कल्पनाच केवढी तरल, केवढी सुंदर आणि तरीही त्रासदायक आहे. एकत्र असण्याच्या काळात एकमेकाच्या सहवासात घालवलेले ते जादुई क्षण. तन-मन जणुकाही एकजीव झालेले. वेगळेपणा असा काही उरलेलाच नाही. मग जे काही सुख-दुःख असेल ते सामाईक झालेलं. दोघांनी मिळून भोगलेलं, उपभोगलेलं. त्यातही मायाची खंत आहे की तिला अर्ध्यातुनच जावं लागलं. प्रेमाच्या त्या पावसात अर्धवट भिजलेलं , अर्धवट शुष्क राहिलेलं मन.
गिला मन शायद, बिस्तर के पास पडा हो
वो भिजवा दो, मेरा वो सामान लौटा दो
आपल्या कवितेत ती म्हणते. शिल्लक राहिलेलं शुष्क, कोरडं मन मी माझ्याबरोबर घेवून आलेय. आपल्या प्रेमाचा तो ओलावा, ती जवळीक मात्र तिथेच मागे सोडून आलेय. ते वेडं मन तिथेच कुठेतरी रेंगाळतय अजुन. जमलं तर तेवढे फक्त परत पाठवून दे. बाकी काही नको.
एक सौ सोलह चाँद की रातें, एक तुम्हारे काँधे का तील
गीली मेहंदी की खुशबू, झूठमूठ के शिकवे कुछ
माझ्या मते बॉलीवुडमधल्या समस्त हिंदी गाण्यापैकी सर्वाधिक चर्चा झालेली ही एकमेव ओळ असेल. या “एकसौ सोलह चाँदकी राते” बद्दल आजवर इतकं लिहिले आणि वाचले गेलेय की जितके भगवदगीतेबद्दल सुद्धा नसेल. अनेकांनी अनेक अंदाज बांधले, विशेषतः एकसौ सोलह या आकड्याबद्दल अनेकांनी विश्लेषणं केली आहेत. गंमत म्हणजे गुलझार यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलेले आहे की त्या आकड्याला तसा काहीही अर्थ, कसलेही संदर्भ नाहीत. लिहीता लिहीता खुपदा सहज काहीतरी सुचुन जातं आणि ते इतकं आवडतं आणि गाण्यात चपखल बसतं की त्याचा आशय, संदर्भ शोधण्याची आवश्यकताच राहात नाही. आणि ते आहे तसं स्वीकारलं जातं. हे शब्दही तसेच उस्फूर्तपणे आलेले आहेत. ते म्हणाले होते की
“अंक इतना महत्वपूर्ण नहीं है जितनी यह बात कि प्रेम संबंध में जीने वाले दो में से एक व्यक्ति इस बात को सहेज कर रखता है कि उसने कितनी चांदनी रातें अपने प्रेमी के संग बिताई हैं|”
माया-महेन्द्रच्या प्रेमीजीवनातील असे कित्येक क्षण असतील जे मायाला साद घाल असतील. कधी सुखाचे, तर कधी दुःखाचे क्षण. अश्या गोष्टी ज्या दोघांनी फक्त एकमेकांपुरत्याच मर्यादित ठेवलेल्या आहेत. त्या क्षणांच्या आठवणी, त्या एकांतातील नखरे, प्रेमालापाचे, रुसव्या फुगव्याचे क्षण परत करता येतील का? मायाला कळून चुकलेय की महेंद्र आता सुधाचा झालाय, तिचा राहिलेला नाहीये. काहीअंशी तिने ते स्वीकारलेय सुद्धा. पण मन मानत नाही.
तिला महेंद्र नकोय, पण त्या साऱ्या क्षणांच्या आठवणी, ते क्षण ती परत मागतेय ज्यात तिने आपले आयुष्य खऱ्या अर्थाने जगलेले आहे. ते क्षण परत करणे शक्य आहे का?
झूठमूठ के वादे भी, सब याद करा दो
सब भिजवा दो, मेरा वो सामन लौटा दो
ती महेन्द्रला आठवण करून देते त्या क्षणी त्याने केलेल्या असंख्य वचनांची, तिच्या रुसव्या-फुगव्याची. तिला मान्य आहे की अशी वचने, ते रूसवेफुगवे, त्या लाड़िक, लटक्या तक्रारी ही त्या त्या क्षणांची तात्कालिक देण असते. त्यांना काही भौतिक अस्तित्व असायलाच हवे हे जरूरी नाही. आपली वचने त्याने पूर्ण करावीत हिसुद्धा तीची मागणी नाहीये. तिला फक्त ते सुखावणारे क्षण हवे आहेत. तेवढे परत आणता येतील का? आणि ते जऱ परत करणे शक्य नसेल तर बाकीच्या भेटवस्तू, प्रेमपत्रे यासारख्या भौतिक वस्तु परत करण्यात काहीच अर्थ नाही. कारण तिचा जीव त्या महेन्द्रच्या सहवासात घालवलेल्या क्षणांमध्ये गुंतलेला आहे. बाकी भौतिक गोष्टीत तिला कसलेच स्वारस्य राहिलेले नाहीये.
एक इजाजत दे दो बस
जब इस को दफ़नाऊँगी
मैं भी वही सो जाऊँगी
माया सर्वार्थाने महेन्द्रमध्ये गूंतलेली आहे. तो तिच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेला आहे. त्याच्याशिवाय, त्याच्या आठवणीशिवाय जगणे तिला सहनच होणार नाहीये. ज्या भावना, जे प्रेम, लालसा तिने महेन्द्रबद्दल बाळगल्या आहेत त्या ती परत मागतेय. आणि याचबरोबर ती अजुन एक मागणी, रादर परवानगी, इजाजत मागतेय की त्या सगळ्या भावना, ते क्षण, ते प्रेम तिने विसरावे अशी जर महेन्द्रची अपेक्षा असेल, तर तिलासुद्धा त्या प्रेममयी क्षणांमध्ये विलीन होवून जाण्याची, विरघळून जाण्याची परवानगी मिळावी. कारण त्यांनंतर तिच्या अस्तित्वाचे काही प्रयोजनच उरत नाही.ती सर्वस्वी महेंद्रमय होवुन गेलेली आहे. तिच्या आयुष्यातुन महेन्द्रला वजा केले की उरते ते निव्वळ एक शून्य. त्यापेक्षा तिला त्या क्षणांबरोबरच स्वतःचे अस्तित्व संपवणे जास्त स्विकारार्ह आहे.
मी वारंवार सांगत आलेलो आहे की आशाबाईंचा आवाज हे माझं पहिलं प्रेम आहे. आम्ही वेडे लतादिदीच्या आवाजाची एखाद्या भक्ताप्रमाणे भक्ती करतो पण आमचे प्रेम आहे ते आशाबाईंच्या सुरांवर, आवाजावर. आणि प्रेमभावना ही जगातल्या कुठल्याही भावनेपेक्षा श्रेष्ठ आहे माझ्या मते. या गाण्यात आशाबाई आशाबाई राहात नाहीत, त्या माया होवून जातात. अतिशय आर्तपणे थेट आतवर जावून झिरपणारे त्यांचे स्वर आपल्याला मायाच्या वेदनेची, तिच्या मनातील आन्दोलनांची सार्थ जाणीव करुन देतात. आणि नकळत आपणही माया होवून जातो. गुलझारसाहेबांच्या प्रत्ययकारी शब्दाना योग्य आणि समर्पक आधार देण्याची ताकद फक्त पंचमदांच्या संगीतातच आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा गुलझार, पंचम आणि आशा हे दैवी त्रिकुट एकत्र येते तेव्हा अश्या अविस्मरणीय गीतांची निर्मिती होते.
मुखड्यात रेंगाळणारे सिंथेसायजरचे सूर एखाद्या स्मृतीसारखे अंगावर येणारे. मध्येच गिटार आणि बासरीच्या रेझोनन्सचा केलेला अप्रतिम वापर आणि या सगळ्याची सांगड घालत काळजाला हात घालत अंगावर येणारा आशाबाईंचा आलाप.
‘लौटा दो’ च्या वेळी नकळत सुरु होणारा मंद मधुर तबला आणि पहिल्या इंटरल्यूडमध्ये पंचमने वापरलेला पं. उल्हास बापट यांच्या संतुरच्या सुरेल सूरांचा अप्रतिम तुकडा.. अहाहा ! पंचमची कमाल म्हणजे संतुरचे हे सूर त्याने पानगळीत झाडावरून अलगद गळून पडणाऱ्या शुष्क पानांच्या नादासाठी वापरलेले आहेत. दुसऱ्या इंटरल्यूडमध्ये येणारे सरोद, क्लैरीनेट आणि बासरीचे सुर ही खरी ट्रीट आहे या गाण्यातली. आणि या सर्वाबरोबर गाणं संपल्यावर देखील कानात, रादर गात्रा-गात्रांत रेंगाळत राहणारा आशाबाईंचा आर्त स्वर आपण जगत राहतो, अनुभवत राहतो. मग पंचमची आठवण असह्य होते आणि आपण आर्तपणे परमेश्वराला साद घालतो…
मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पड़ा है ! आमचा पंचम आम्हाला परत दे प्रभो, बाकी काही नको.
धन्यवाद.
विशाल कुलकर्णी
पनवेल. (०९९६७६६४९१९)