कुठल्याही देशासाठी त्यांचे लष्कर हा अतिशय अभिमानाचा आणि आत्मविश्वासाचा विषय असतो. रस्त्याने जाताना कुणी मिलिटरी, नौसेना अगर वायुसेनेचा जवान अथवा अधिकारी दिसला की मान आपोआपच आदराने लवते. कारण देशाचे सैन्य, देशाचे सैनिक हे काय्म देशाच्या पर्यायाने देशातील नागरिकांच्या सेवेसाठी आपले सर्वस्व पणाला लावत असते. मिलिटरी असो, नौसेना असे वा वायुसेना यापैकी कुठल्याही दलाचा विचार मनात आला की पहिली गोष्ट डोळ्यासमोर येते ती म्हणजे या विविध सैन्यदलांतर्फे पाळली जाणारी विलक्षण शिस्त, त्यांची शिस्तबद्धता. आपण येता जाता म्हणत असतो की माणसाला जर शिस्त लावायची असेल, शिकवायची असेल तर त्याला आयुष्यातले एक वर्षका होइना सैन्यात घालवायला हवे. आणि हे म्हणणे म्हणजे अगदीच अतिशयोक्ती नसते. या सर्व सैन्यदलांत पाळली जाणारी शिस्त ही कायम सर्वसामान्य नागरिकांच्या अभिमानाचा, आदराचा विषय असते. आपल्यासाठी ते शिस्तीचे आदर्श असतात. आपण आपल्या मुलांना शिस्तीबद्दल सांगताना, शिकवताना देखील नेहमी सैन्याचे, एन्.डी.ए. आणि तत्सम सैन्य प्रशिक्षण संस्थांचे उदाहरण देत असतो. पण गेल्या काही वर्षात काही वेगळेच चित्र पाहायला मिळते आहे. काही वर्षापुर्वी देहुरोड भागत मद्यधुंद लष्करी जवांनाच्या एका गटाने घातलेल्या गोंधळाची बातमी प्रसिद्ध झाली होती. ती आठवण जरा जुनी होत नाही तोवर आता कालची पुण्यातील संभाजी पुलावरील घटना….
काल रात्री लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) ऑफिसर-कॅडेट्सनी लकडी पुलावर पोलिसांसह माध्यमांच्या प्रतिनिधींना मारहाण-शिविगाळ करीत मंगळवारी रात्री धुडगूस घातला. पुण्यातील डेक्कनजवळील लकडी पुलावर दुचाकी वाहनांना प्रवेश नाही, वाहतुकीचा गोंधळ होवु नये म्हणुन या मार्गावर दुचाकी वाहनांना मनाई आहे. दुचाकी वाहनांसाठी खास वेगळे मार्ग आहेत. लकडी पुलावर रात्री नऊ वाजेपर्यंत टू-व्हीलरला मनाई आहे. तरीही ‘सीएमई’तील हे अधिकारी-कॅडेट्स तेथून आले. ते पाहून संभाजी चौकीतील वाहतूक पोलिस आणि अधिकारीवर्गाने त्यांना अडविले. लकडी पुलावर दुचाकीला मनाई असल्याकारणाने त्यावेली तिथे ड्युटीवर हजर असलेल्या वाहतूक पोलिसाने त्यांचा रस्ता रोखुन त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या गाडीची किल्ली काढून घेण्यात आली. ते पाहून लष्कराच्या या अधिकाऱ्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी शिविगाळ करीत पोलिसांवर हात उचलला. त्या पोलीसाने हटकल्याचा राग येऊन या अधिकारी – कॅडेटसनी चक्क पोलीसांनाच मारहाण सुरु केली आपल्या इतर मित्रांना फोन करुन बोलावून घेतले. काही वेळातच ४०च्या वर सैनिकी विद्यार्थी हजर झाले आणि त्यांनी पोलीसांना तसेच उपस्थित माध्यमांच्या प्रतिनिधींनाही मारहाण आणि दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी त्या ठिकाणी आलेल्या वाहिन्यांच्या प्रतिनिधींचे कॅमेरे हिसकावून घेत फोडले. महिला पत्रकारांना अर्वाच्य शब्दांत दम भरण्यात आला. तसेच लष्कराच्या दहा गाड्यांचा ताफा मागवून दमदाटी करण्यात आल्याने या परिसरात रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते.
या प्रकारला विरोध करणार्या उपस्थित सर्वसामान्य नागरिकांनाही दमबाजी करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे हा प्रकार पाहून संतप्त नागरिकांनी या लष्करी अधिकाऱ्यांचा समाचार घेतला. दरम्यान, या अधिकाऱ्यांना ‘कुमक’ मागवून घेतली आणि काही वेळातच लष्करी पोलिसांच्या आठ-दहा गाड्या लकडी पुलावर दाखल झाल्या. संतप्त जमावासह पोलिसांशीही हुज्जत घालण्यास प्रारंभ करण्यात आला. अगदी हात काट देंगे वगैरे धमक्याही देण्यात आल्या. या घटनेचे मोबाईलने फोटो काढण्याचे प्रयत्न करणार्या सामान्य नागरिकांचे फोन हिसकावून घेण्यात आले. त्यातील मेमरी कार्ड काढून घेवुन मोबाईल फेकुन देण्यात आले.
या घटना लष्करी अधिकार्यांच्या माजोरीपणाचे तर द्योतक नाहीत ना? पुन्हा समस्या अशी आहे की लष्करी अधिकार्यांवर कसलीही कारवाई करण्याचा अधिकार पोलींसाना नाही असा लष्कराचा दावा असतो. त्याच्या जोरावर हे देशाचे तथाकथीत रक्षक हवा तसा धुडगुस घालायला लागतात. आता या अशा घटना अपवादात्मक असतात हे जरी खरे असले. तरी हे भारतीय लष्कराच्या परंपरेला आणि किर्तीला अतिशय घातक आहे.
या घटनेसंदर्भात लष्कराच्या प्रतिनिधींनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. प्रश्न असा आहे की यापद्धतीने कायदा हातात घेणार्या त्या मग्रुर सैनिकी अधिकार्यांवर – कॅडेटसवर काही कारवाई होणार की नाही? झाल्यास ती लष्करच करणार की पोलीस? अगदी ते भारतीय लष्कराचे सैनिक – विद्यार्थी असले तरी याच देशातील कायद्याच्या प्रतिनिधीवर हात उचलण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला? माझ्यामते तरी त्या सर्व विद्यार्थ्यांना – अधिकार्यांना पोलीसांच्या ताब्यातच देण्यात यावे आणि नागरी कायद्यानुसार त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. तुम्हाला काय वाटते?
संदर्भ :
१. दै. सकाळ – पुणे आवृत्ती
२. दै. महाराष्ट्र टाईम्स – पुणे ई आवृत्ती
विशाल कुलकर्णी