Category Archives: आवडलेल्या कविता- गाणी

“तोच चंद्रमा नभात …”

“तोच चंद्रमा नभात …”

श्रोतेहो…!
आकाशवाणीच हे सांगली केंद्र आहे.. २३९.८१ मीटर म्हणजेच १२९१ किलोहर्ट्ज वरून आम्ही बोलत आहोत सकाळचे पाच वाजून पन्नास मिनिटे व दहा सेकंद झाली आहेत आहेत…आता ऐकुयात सुगम संगीत. इथे कधी सांगली, कधी पुणे, कधी नाशिक तर कधी मुंबई केंद्र एवढाच फरक असे. बाकी कार्यक्रम सगळीकडे तितकेच सुरेल आणि सुंदर …

” बालपणातील एक अविस्मरणीय आठवण म्हणजे रेडिओ…!”
लहानपणी जाग यायची ती रेडिओच्या आवाजाने,माझ्या घरी त्यावेळी मर्फी कंपनीचा रेडिओ होता. घरात आई सुद्धा गायची अधुन मधून. तिच्याकडे गाण्याचा समृद्ध वारसा आलेला आहे. माझे चारी मामा उत्तम गायचे. चौघापैकी आता फक्त नंदूमामा आहे, कालानुरूप त्याचा आवाजही वृद्ध झालाय. पण तोही उत्तम गायचा. नंदुमामा वयानुसार सगळ्यात धाकटा , आईपेक्षाही लहान. त्यामुळे त्यालाच क़ाय ते आम्ही अरेजारे करतो. तर तीन नंबरचे मामा म्हणजे सखाहरी मामा हे बाबूजीचे भक्त. सुधीर फड़के उर्फ बाबूजी हे मामांचे दैवत. बाबूजीची गाणी त्यांना मुखोदगत असत. त्यांच्याच तोंडी प्रथम ऐकले होते बाबूजीचे ….

तोच चंद्रमा नभात, तीच चैत्रयामिनी
एकांती मज समीप तीच तुही कामिनी

तेव्हा शब्दाचे अर्थ कळण्याचे, आशय समजून घेण्याचे किंवा मराठीची श्रीमंती कळण्याचे वय नव्हते. पण मामा छान गायचे आणि वर अभिमानाने सांगायचे आमच्या बाबूजींचे गाणे आहे. तेव्हा बाबूजी म्हणजे सुधीर फडके हे तरी कुठे माहीत होते. पण घरातच गाणे असल्याने गाण्याचा कान होता. त्यामुळे बाबूजींचे गाणे ऐकताना एक जाणीव पक्की असायची की हा माणूस नक्कीच कुणीतरी दैवी देणगी असलेला माणूस आहे. बाबूजींची जवळपास सगळीच गाणी पुन्हा पुन्हा ऐकलेली आहेत, गीत रामायणाची तर अजुनही पारायणे होतच असतात. पण हे गाणे जास्त आवडायचे कारण हे गाणे मामा गायचे. नंतर वयाबरोबर समज वाढत गेली. शब्द, त्याचा आशय, भाषेचे सौंदर्य आणि अर्थातच कविता समजायला लागली तेव्हा हे गाणे अजुनच आवडायला लागले.

P.C. : Internet

माझ्या अतिशय आवडत्या कवयित्री शांता शेळके यांची ही गझलेच्या अंगाने जाणारी तरीही गझल नसलेली कविता. (नंतर एकदा सोलापुरातच कुठल्यातरी कार्यक्रमाला आलेल्या शांताबाईंची भेट झाल्यावर मी त्यांना या गाण्याशी असलेल्या माझ्या भावबंधाबद्दल बोललो होतो. हे गाणे किती आवडते हे त्यांना आवर्जून सांगितले होते. तेव्हा त्या त्यांच्या चिरपरिचित स्टाईलमध्ये गालातल्या गालात गोड हसून हळूच थैंक्यू म्हणाल्या होत्या. कसलं भारी वाटलं होतं म्हणून सांगू?) असो. तर हे आमच्या लाडक्या शांताबाईंचे गाणे, लाडक्या बाबूजींनी संगीतबद्ध केलेले आणि गायलेले गाणे. शांताबाईंनी खुप गाणी लिहीली आहेत पण एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते की त्यांच्यातली कवयित्री त्यांच्यातल्या गीतकारावर कायम सरस, वरचढ़ ठरत आलेली आहे. अर्थात तेव्हा संगीतकारही कविच्या शब्दाना न्याय द्यायचा पुरेपुर प्रयत्न करत. काही सन्माननीय अपवाद सोडले तर गाण्यासाठी म्हणून काव्यात, त्याच्या शब्दात कुठलीही चिरफाड केली जात नसे. अर्थात शांताबाईंची कविता इतकी चिरेबंदी असते की त्यात काही बदल करण्याची गरजच पड़त नाही. किंबहुना कुठलाही शब्द इकडचा तिकडे करण्याची मुभा शांताबाई अजिबात देत नाहीत, तशी गरजच पड़त नाही. त्यांची कविता अशी असते की एकही शब्द बदलण्याचा अथवा इकड़चा तिकडे करण्याचा प्रयत्न केला तर सगळी रचनाच बदलून जावी, कवितेचा सगळा डोल विसकटुन जाईल.

तोच चंद्रमा नभात, तीच चैत्रयामिनी
एकांती मज समीप तीच तुही कामिनी.

शांताबाईंनी स्वत: एका मुलाखतीत सांगितले होते की या गाण्याने त्यांना गीतकार म्हणून मान्यता मिळवून दिली. शीलाभट्टारिका नावाच्या कवयित्रीने रचलेल्या संस्कृत श्लोकावरून शान्ता शेळके यांनी हे गीत लिहिले. शान्ताबाईंनीदेखील हा उल्लेख केला आहे. मूळ श्लोकातील स्त्रीभावना त्यांनी प्रियकराच्या भावनेत रूपांतरित केली आहे. 

ज्या मूळ संस्कृत श्लोकावरून हे गीत लिहिले तो श्लोक असा आहे :

य: कौमारहर: स एव हि वर:
ता एत चैत्रक्षप:।
ने चोन्मीलितमालतीसुरभय:
प्रौढा: कदम्बानिला:।।
सा चैवास्मि तथापि तस्य
सुरतव्यापारलीलाविधौ।
रेवारोधसि वेतसि तरूतले
चेत: समुत्कंठते।।’

ज्याने माझे कौमारहर: केले तो माझा प्रियकर आहे. तोच माझा पती आहे. चैत्रातील आल्हाददायक रात्र आहे. कदंबावरून वाहणारे वारे आणि फुललेल्या जाईचा गंध वातावरणात भर टाकतो आहे. मन आणि भावना गुंतलेल्या आहेत. मात्र त्यावेळच्या प्रेमाची आठवण जास्त दु:खी करते आहे. मी तीच आहे, मी तेव्हाचीच आहे, पण ही हुरहूर प्रेम हरवल्याचं सांगते. एकमेकांचे नाते आता ‘ते’ राहिले नाही, हा मनीचा विषाद आहे. या मन:स्थितीला इतर कोणीही जबाबदार नाही. एका विशिष्ट पातळीवर ही भावना अलगद नेऊन सोडली आहे. हा नेमका भाव प्रियकराच्या भावनेसाठी व तीन अंतऱ्याच्या गीतासाठी पुरेसा ठरला आहे.

थोडंसं बारकाईने लक्ष दिलं तर लक्षात येतं की गाण्यातील काही संस्कृत शब्द हे अतिशय खुबीने वापरलेले आहेत. उदा. चैत्रयामिनी हा शब्द घ्या. मुळचा हा संस्कृत शब्द शांताबाईंनी इतक्या अप्रतिमरित्या मराठी गीतात गुंफलाय की क्यां कहने! चैत्रयामिनीला लागून येणारा ‘कामिनी’ सुद्धा तितकाच समर्पक आहे. शब्दांचे हे परस्परांवर अवलंबून असणे, परस्परांना पूरक असणे हेच शांताबाईंच्या कवितेचे सहज सौंदर्य आहे.

नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे
छायांनी रेखियले चित्र तेच देखणे
जाईचा कुंज तोच, तीच गंधमोहिनी

मी ज्याला भाषेचे सौंदर्य म्हणतो ते इथे या कडव्यात खुप ताक़दीने अनुभवायला मिळते. नीरवतेचा संबंध चांदण्याशी जोडणे ही कविच्या कल्पकतेची खरी नजाकत आहे. नीरवता म्हणजे गाढ शांतता, अगदी झाडाचे पान जरी ओघळले तरी आवाज व्हावा अशी शांतता. अश्या शांततेत लागणारी समाधी आणि चांदण्याची शीतलता (इथे चांदणी नव्हे तर चांदण्यांचा प्रकाश म्हणजे चांदणे अभिप्रेत आहे) या दोन्हीतुन मिळणाऱ्या सुखाची तुलनाच नाही. तश्यात जाईच्या प्रसन्न करून टाकणाऱ्या सुगंधाची मोहिनी … गंधमोहिनी ! किती समर्पक आणि नेमके शब्द आहेत !

सारे जरी ते तसेच, धुंदी आज ती कुठे?
मीही तोच; तीच तुही; प्रीती आज ती कुठे?
ती न आर्तता सुरांत, स्वप्न ते न लोचनी

पण एवढे सगळे असूनही काहीतरी कमी आहे. सर्व काही जैसे थे आहे, तू तूच आहेस, मी मीच आहे. पण नात्यातली ती कोवळीक, ती आर्तता मात्र हरवलेली आहे. या गाण्यातील ‘चैत्र’ हा उच्चार तर सर्व गायकांनी अभ्यास करावा असाच आहे. पूर्ण गायनात ‘जसा शब्दाचा अर्थ, तसा त्या शब्दाचा उच्चार’ हे सूत्र कायम दिसते. तोच आहे, तीच आहे, तशीच आहे, असे खंत व खेद या भावनेतील शब्द या गाण्यात बरेच आहेत. पण हा ‘तोच’ असलेला भोवताल शान्ताबाईंच्या उत्कृष्ट शब्दांनी भरला आहे.

हे गाणे सर्वश्री सुधीर फडके उर्फ बाबूजींनी गायलेले आहे. बाबूजी म्हणजे ललित संगीताचा मानदंड. गाण्याचे संगीत आणि अर्थातच चाल दोन्हीही बाबूजींचे आहे. गाणे ऐकताना हा माणूस प्रत्येक लहान-सहान बाबीचा किती खोलवर जावून विचार करत असे याची खात्री पटते. आजचे गायक एका दिवसात चार-चार गाण्याचे रेकॉर्डिंग उरकून टाकतात. बाबूजींच्या स्वरांची ताकद, त्यांच्या गळ्याचे सामर्थ्य पाहता त्यांना तर हे अगदी सहज शक्य झाले असते आणि तरीही त्यांची गाणी सर्वोत्तमच ठरली असती. पण मुळात ‘उरकुन टाकणे’ हे बाबूजींच्या स्वभावातच नव्हते. गाताना त्या गाण्याशी एकरूप होणे, बाकी सर्व विसरून गाण्याशी तादात्म्य पावणे हा बाबूजींनी स्वतःला घालून दिलेला नियमच होता जणु. त्यांचे कुठलेही गाणे ऐकावे. त्यात कधीच चाचपडलेपणा आढळत नाही. रेकॉर्डिंग झाले की माझे कर्तव्य संपले ही भावना चुकुनही येत नाही. प्रत्येक शब्द, प्रत्येक सूर प्रत्येक जागा कशी जिथल्या तिथेच यायला हवी हे बाबुजींचे खरे सामर्थ्य. गाण्यातून क़ाय सांगायचे आहे, क़ाय आशय अभिप्रेत आहे. तो रसिकांपर्यन्त कसा पोचवायचा याचा सगळा विचार बाबूजींनी केलेला असे. त्यांचे कुठलेही गाणे ऐका, उगाच कुठे भरतीच्या जागा घेतल्याहेत, श्रोत्यांना मोहवण्यासाठी कुठे अनावश्यक तान घेतलीय किंवा एखादी नको असलेली पण गाण्यात फिट बसेल अशी जागा घेतलीय… हे त्यांच्या गाण्यात कधीच दिसणार नाही. सगळे कसे जिथल्या तिथे आणि नेमके. इम्प्रोवायजेशन स्वतःच्या आवाजात असायचे , गाण्याच्या , संगीताच्या रचनेत , भूमिकेत त्यांनी कधीच ढवळाढवळ केली नाहीये. त्यांच्या गाण्याची ही सगळी लक्षणे ‘तोच चंद्रमा…’ च्या गायकीत स्पष्टपणे जाणवत राहतात.

त्या पहिल्या प्रीतीच्या, आज लोपल्या खुणा
वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा
गीत ये न ते जुळून, भंगल्या सुरांतूनी

गाण्याचा विलय जरी शोकान्त असला तरी बाबुजींचे सूर सगळे कसे सुखद करून टाकतात. श्रोत्यांना आजुबाजुच्या कसल्याही परिस्थितीचे भान हरवायला लावण्याची ताकद बाबुजींच्या आवाजात होती.

तसे पाहायला गेले तर त्यांच्या सुरूवातीच्या गाण्यावर बालगंधर्वांच्या गायकीचा स्पष्ट प्रभाव दिसतो. पण त्यातून बाबूजींनी फार लवकर सुटका करून घेतली. त्यांचा आवाज तसा हळूवार आहे. गीतरामायणातील काही गीतांमध्ये वरची पट्टी देखील समर्थपणे लावतात ते. पण त्यांची खरी जादू अनुभवायला मिळते ती हलक्या, मध्यममार्गी सुरातच. आजकाल कवि, गीतकार यांचे इंडस्ट्रीतील नेमके स्थान क़ाय? हा एका स्वतंत्र लेखाचा किंबहुना वादाचा मुद्दा होवू शकेल. पण तत्कालिन संगीतकार, विशेषत: बाबूजी हे कवि , गीतकाराला गायक-संगीतकाराईतकेच तोलामोलाचे मानत, त्यामुळे बाबूजींच्या गाण्यात कविच्या शब्दाला, त्यांच्या उच्चारणाला तितकेच महत्व दिलेले आढळून येते.

लेख थोड़ा लांबलाच, पण शेवटी थोड़े तांत्रिक बाबीबद्दल बोलून मग थांबतो. शास्त्रीय संगीताच्या तांत्रिक बाबीबद्दलचे माझे ज्ञान तसे खूपच तोकडे आहे. पण आंतरजालावर अनेक दिग्गज लोक यावर अविरत लेखन करीत असतात. असेच आंतरजालावरील संदर्भ ढूंढाळताना सर्वश्री अनिल गोविलकर यांच्या ब्लॉगवर मला या गाण्याबद्दल काही लेखन आढळले. अनिलजी लिहीतात…

” यमन रागात गाण्याची स्वररचना बांधली गेली आहे. काही राग हे काही संगीतकारांच्या खास आवडीचे असतात आणि त्याबाबत विचार करता, सुधीर फडक्यांचा राग यमन, हा खास आवडीचा राग होता, हे प्रकर्षाने लक्षात येते. फडक्यांच्या रचना “गीतधर्मी” आहेत, असे म्हणायला प्रत्यवाय नसावा. रागाच्या स्वरक्षेत्रात रुंजी घालण्याच्या ब्रीदास ते जगतात.”

असो, बाकी माझे शैलेन्द्रदादा म्हणतात तसे , अगदी त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर…

“खरं सांगायचं तर मी बाबुजींनी पकडलेलं “झाड” आहे. आणि या चेटूकावर जगात उपाय नाही, ते माझ्यासोबतच संपणार. त्यामुळे प्रत्येक ओळ ही अगदी माझीच वाटते आहे. बाकी यमनच्या वगैरे फंदात न पडलेलं बरं कारण हे ख्यालगायन नसून अस्खलित भावदर्शन आहे. फक्त काही सौंदर्यस्थळं माझ्या बुद्धीला आणखी दिसलीत – ती म्हणजे ह्रस्व-दीर्घाच्या अचूक सांभाळलेल्या जागा. उदा. मी ही तोच, तीच तू ही किंवा त्या पहिल्या प्रीतीच्या इ.”

मी सुद्धा बाबूजीनी पकडलेलं झाडच आहे शैलेंद्रदादा आणि मृत्युनंतर जऱ हे चेटुक सुटणाऱ असेल तर आपल्याला अजिबात मरायचं नाहीये. पण लव यू . दिलकी बात कह दी आपने !

बाबूजी कायम गीतातील शब्दा-शब्दांचा, काव्याचा पूर्ण अभ्यास करून मगच त्यानुसार त्याला सूट होणारी वादनसामुग्री संगीतासाठी निवडत. त्यामुळे त्यांचे संगीत हे कायम काव्याच्या आशयाशी सुसंगत असे. त्यामुळे काव्याच्या अर्थाबरोबर त्याचा आशयही गाण्यातून पुरेपुर उतरत असे. बाबूजीचे अजुन एक वैशिष्ठ्य म्हणजे त्यांचे स्वत:बद्दल, आपल्या आवाज़ाबद्दल कसलेही गैरसमज नव्हते. आपल्या सामर्थ्याबरोबर आपल्या आवाजाच्या मर्यादासुद्धा ते पूर्णपणे ओळखून होते आणि त्यांनी कधीही आपल्या मर्यादा ओलांडण्याचा अकारण प्रयत्न केला नाही. त्यामुळे बाबूजी कायम भारतीय रसिकांच्या मनात ठामपणे अढळपद मिळवून विराजमान झालेले आहेत. आणि यावत् चन्द्र-दिवाकरौ ते इथल्या रसिकांच्या मनावर राज्य करत राहतील.

बाबूजी तुम्हाला, तुमच्या सुरांना साष्टांग नमस्कार. तुमच्या सूरांची मोहिनी अशीच आमच्या पुढच्या कित्येक पिढ्यांना आनंद देत राहील यात काडीमात्रही शंका नाही. प्रणाम !

संदर्भ सौजन्य : १. श्री. अनिल गोविलकर यांच्या ब्लॉगवरील लेख

२. दै. लोकसत्ता (दिनांक २३ जुलै २०१७) मधील श्री विनायक जोशी यांचा लेख

३. माझे वडील बंधू श्री. शैलेन्द्र साठे

विशाल विजय कुलकर्णी, पनवेल
भ्रमनधवनी – ०९३२६३३७१४३

रिमझिम गिरे सावन ….

रिमझिम गिरे सावन…..
पावसाळा आला की पंख फुटतातच हो.
भरून आलेलं आभाळ, बहरून आलेली धरा ! प्रियेच्या आवेगाने धरित्रीकडे झेपावणाऱ्या वर्षेच्या धारा ! सगळंच कसं मोहून टाकणारं, वेड लावणारं. जणू काही कालिदासाच्या मेघदूतामध्ये वर्णिलेले त्या कामार्त यक्षराजाचे ते विरहवेडे दुतच ! यक्षाचा निरोप घेऊन त्याच्या प्रियेकडे (कि धरेकडे?) निघालेले ते मेघदूत !
निळे सावळे घन थरथरणारे
दंव्-बिंदूचे अन हळवे स्पंदन
विहग स्वरांचे सुखे मिरवती
शुभ्र क्षणांचा सुरेल मेणा…
आणि मिलनाच्या त्या आतुर, अधीर ओढीने अलगद स्रवणारी ती वसुधा, तिच्या जणूकाही स्तनसम पर्वतातून झरणारे ते निर्झर कुठल्याश्या अनामिक ओढीने , अज्ञात दिशेने, आवेगाने धावत सुटतात. आणि जिथून जिथून जातील तिथली धरा आपलं रूप पालटायला लागते, नटायला लागते. हिरवाईचा विलक्षण, संमोहक साज लेवून सज्ज होते. अगदी नजर पोचेल तिथपर्यंत हिरवेगार मखमली गालिचे अंथरलेले. केवळ जमीनच नाही, तर झाडे, वेली एवढेच नव्हे तर एखाद्या एकाकी, ओसाड, घराची एखादी जीर्ण पडकी भिंतसुद्धा हिरवीगार होऊन गेलेली असते या दिवसात. एखाद्या शुष्क वृक्षाला सुद्धा बांडगुळाच्या रुपात का होईना पण हिरवाई चिकटतेच. अगदी जातिवंत कुरुपतेलासुद्धा सौंदर्य मिळवून देणारी अशी ही या ऋतूची किमया.
पावसाची किमयाच काही अशी आहे की एरव्ही कमालीची रुक्ष, प्रॅक्टीकल, घड्याळाच्या काट्याला बांधलेली म्हणून ओळखली जाणारी मुंबई नगरी सुद्धा आपला नेहमीचा मुखवटा टाकून एखाद्या अल्लड़, नवथर तरुणीसारखी पूर्ण रंगात येते. अगदी सिमेंट काँक्रिटच्या इमारतीं सुद्धा गरत्या होतात आणि त्यांनाही हिरव्या शेवाळाची पोरं-बाळं लोंबू लागतात. पावसाच्या नुसत्या चाहुलीने सगळा आसमंत प्रसन्न, हिरवा होवून जातो. एकप्रकारचे चैतन्य वातावरणात पसरते. हवेत मृदगंधाचा मनमोहक सुगंध पसरायला लागते आणि अशा या स्वर्गीय वातावरणात कधी अचानक पावसाची रिमझिम संततधार भेटते…
अहाहा, यासारखे दुसरे सुख नाही. पावसाची साथ कुणाला नको असते? पण माणसाला हे क्षण जपून ठेवावेसे वाटतात. नभातून कोसळणारा पाऊस, चोहोबाजुला पसरलेली हिरवाई आणि “थांब, मी या पावसाला कैदच करून टाकते!” म्हणणारी चिंब प्रिया…, ती हिरवळलेली वसुधा ! स्वर्ग-स्वर्ग तो अजून काय असतो?
अश्या वेळी ती बरोबर असावी.  तुमच्याप्रमाणेच चिंब भिजलेली आणि त्या भिजण्याशी एक अनामिक नाते जोडून तुमच्याही श्वासात रुजलेली. पावसाची रिमझिम संततधार चालू आहे. आसमंतात मातीचा गंध पसरलाय. पावसाची रिपरिप, रस्त्यातल्या पाण्यातून चालताना पचाक-पचाक करत चपलीचे होणारे आवाज. जस्ट इमैजिन , अश्या या धुंद करणाऱ्या वातावरणाने आधीच आपली अवस्था ‘देता किती घेशील दो करांनी’ अशी झालेली असताना दुधात साखर म्हणून पार्श्वभुमीला लताबाईंचे प्रसन्न, तृप्त सुर असावेत.
रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाये मन
भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन
images (1)
१९७९ साली बासू चटर्जी नावाच्या एका मनस्वी कलंदराने चित्ररसिकांना एक देखणे स्वप्न दाखवले. १९६५ साली आलेल्या  ‘आकाश कुसूम’ नामक एका बंगाली चित्रपटाच्या कथेशी साधर्म्य सांगणारा ‘मंझील’ हा चित्रपट बासुदांनी चित्र रसिकांसाठी पडद्यावर आणला. अमिताभ बच्चन आणि  मौशुमी चटर्जी असे भन्नाट कास्टिंग होते.
तो काळ अमिताभच्या करियरच्या सुरुवातीचा होता. हळुहळु त्याचे नाव व्हायला लागले होते. पण अजुनही बच्चन पुर्णपणे त्याच्या १९७५ सालच्या अँग्री यंग मॅन विजयच्या आहारी गेलेला नव्हता. अजुनही वेगवेगळ्या विषयावरचे , त्याच्या प्रगल्भतेला आव्हान देणारे चित्रपट करत होता. त्यात समोर मौशुमीसारखी देखणी आणि तितकीच अभिनयसंपन्न रुपगर्विता अभिनेत्री होती. बासुदांसारखा हात लावेल त्याचे सोने करणारा परीस होता. त्यातून जे काही निर्माण झालं ते नितांत सुंदर होतं. चित्रपटाच्या कथानकाबद्दल बोलण्यासारखं फार काही नाहीये. तशीही मंझीलची कथा सर्वांना माहीत आहेच. एका सर्वसाधारण, सामान्य माणसाची , त्याच्या आयुष्याशी मांडलेल्या संघर्षाच्या साक्षीने फुललेली प्रेमकथा होती ती. अमिताभच्या अभिनयाचे खुप कौतुक झाले या चित्रपटासाठी. मौशुमीचे काम तर अप्रतिमच झाले होते. पण या चित्रपटाचा युएसपी होता तो म्हणजे पंचमदांचे संगीत. सोबतीला लताबाई, आशाबाई आणि अर्थातच “द किशोर कुमार”! या चित्रपटातले बाकी काही जरी लक्षात राहिलेले नसले तरी हे एक गाणे मात्र पंचमदा, लताबाई आणि किशोरदा या त्रिकुटाने अजरामर करून टाकलेले आहे. आज जवळपास ३९ वर्षानंतर सुद्धा पावसाची गाणी आठवायची म्हटले की ओठावर येणार्‍या पहिल्या ओळी असतात….
images

रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन……..
एवढी या गाण्याची जादू, त्याची गोडी अमिट आणि अवीट आहे. या गाण्याचे वैशिष्ठ्य म्हणजे चित्रपटात हे गाणे दोनदा येते. एकदा लताबाईंच्या आवाजात, तर एकदा किशोरदांच्या. किशोरदांच्या आवाजातील गाणे हे अमिताभच्या तोंडी एका घरगुती मैफलीत चित्रीत झालेले आहे. नुसते डोळे बंद करून गाणे अनुभवायचे झाले तर किशोरदांच्या आवाजातील हे गाणे म्हणजे एक कानांना एक मेजवानी ठरते. पण माझ्यासारख्या पाऊसवेड्या लोकांसाठी यापेक्षाही लताबाईंच्या आवाजातील गाणे हे जास्त सुखद आणि पुन्हा-पुन्हा ऐकावेसे वाटणारे आहे.
पहले भी यूँ तो बरसे थे बादल
पहले भी यूँ तो भीगा था आँचल
अब के बरस क्यूँ सजन, सुलग-सुलग जाए मन
भीगे आज इस मौसम में…

लताबाईंच्या व्हर्जनचे वैशिष्ठ्य आहे ते या गाण्याचे चित्रिकरण. बहुदा पावसातली गाणी हि स्टुडीओमध्ये कृत्रिम पाऊस निर्माण करून चित्रीत केली जातात. पण या गाण्यासाठी बासुदांनी कृत्रिम पावसाचा वापर न करता खर्‍याखुर्‍या पावसातच शुटींग करायचा निर्णय घेतला होता. माझे एक जिवश्च कंठश्च स्नेही श्रीयुत अतुल ठाकूर यांचे या गाण्यावर विलक्षण प्रेम आहे आणि तितकेच आमच्या मुंबईवर सुद्धा. रादर मुंबईवरचे प्रेम हा आम्हा दोघांच्या मैत्रीचा एक महत्त्वाचा समान मुद्दा आहे. अतुलभाऊ म्हणतात, “मुंबईबद्दल अनेकांची अनेक मते आहे. तिच्या रुक्षपणाबद्दल, वक्तशिरपणाबद्दल, तिच्या प्रॅक्टीकल लाइफबद्दल अनेक जण करवादतात सुद्धा. पण पावसात मुंबई विलक्षण देखणी दिसते याबद्दल कुठलेही दुमत नसावे. खरेच आहे. आणि या चित्रपटाचा काळ आहे १९७९ चा , जेव्हा मुंबई अजुनही आजच्या इतकी गजबजलेली नव्हती. अजुनही इमारतींची इतकी गर्दी वाढलेली नव्हती. अजुनही मुंबईत भरपूर झाडे आणि मोकळे , श्वास न कोंडलेले रस्ते होते. पुलंनी सर्व बलाढ्य शहरांमध्ये फक्त मुंबई ही स्त्रीलिंगी आहे हे नमुद केले आहे. या देखण्या मुंबईला आणखी देखणेपणाने सादर केले आहे बासु चटर्जींनी आपल्या या चित्रपटातील या गाण्यात.

unnamed

या गाण्यात या जोडीला नुकताच आपल्यातील नव्या, गोड नात्याचा साक्षात्कार झालेला आहे. प्रेमात पडलेल्या माणसाला आपोआपच आजुबाजुची सगळी सृष्टीच सुंदर वाटायला लागते. आजुबाजुला कोकिळ गात असल्याचा भास व्हायला लागतो. तशात जर पावसाची रिमझिम संततधार सोबतीला असेल तर तो आनंद, ते समाधान दुप्पट होवून जाते. सगळी धरा जणू आपल्यासाठी हिरव्या पायघड्या घालून बसलीय असा भास व्हायला लागतो. या आधी सुद्धा पाऊस पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे. पण तो इतका सुंदर नव्हता. आता त्यात प्रेमभावनेचे अत्तर मिसळलेले आहे. त्यामुळे या आधीचा पावसाचा अनुभव आणि आत्ताचा अनुभव हा सर्वस्वी भिन्न अनुभव आहे त्या दोघांसाठीही. वरुन पाऊस कोसळतोय पण तरीही मनात मात्र प्रेमाची ऊब आहे.

आमचे मित्र अतुलभाऊ म्हणतात, “मी जेव्हा-जेव्हा हे गाणे पाहतो तेव्हा आणि त्यानंतर नेहेमीच हे गाणं ऐकताना मला पावसाच्या गारेगार सरी अंगावर कोसळत असल्याची अनुभूती येते. लताने आवाजात चिंब ओलावा आणुन ही गाणे गायले आहे अशातर्‍हेने वातावरणाची अनुभुती आवाजात देणारी दुसरी गाणी मला तरी चटकन आठवत नाहीत. पण ही अनुभुती येथेच संपत नाही. गाण्यात नुसता पाऊसच नाही तर एकमेकांच्या हातात हात घालुन प्रेमात अगोदरच चिंब भिजलेले प्रियकर आणि त्याची प्रेयसी देखिल आहेत. त्यांना पावसात भिजताना मनात लागलेल्या प्रणयाच्या आगीची अनुभुती येते आहे. कवी योगेश यांचे समर्पक शब्द या गाण्याला लाभले आहेत. “नेमेची येतो मग पावसाळा” तेव्हा हाच पावसाळा एवढा वेगळा का भासतो आहे हा प्रश्न प्रेयसीला पडला आहे.” गंमत म्हणजे यात हे गाणे अभिनेत्रीच्या तोंडी नाहीये. नायक-नायिका फक्त हातात हात घालून त्या पावसात उन्मुक्तपणे निसर्गाची मजा घेत आनंदी पाख्ररासारखे बागडताहेत. आणि पार्श्वभुमीला गाणे स्वतंत्रपणे वाजत राहतं.

“पहले भी यूं तो बरसे थे बादल, पहले भी यूं तो भीगा था आंचल, अबके बरस क्युं सजन सुलग सुलग जाये मन…”

पडद्यावर गाणे जरी कुणी गात नसले तरी गाण्यातील भावना प्रेयसीच्या आहेत असं कुठेतरी आपल्याला जाणवतं. एकुणच हे गाणे मौशमीच्या अमिताभबद्दलच्या मुग्ध भावना मुकपणे व्यक्त करतं.

इस बार सावन दहका हुआ है
इस बार मौसम बहका हुआ है
जाने पी के चली क्या पवन, सुलग-सुलग जाए मन
भीगे आज इस मौसम में…

मनात जागृत झालेल्या प्रेमाग्नीमुळे हा पाऊस काही वेगळाच भासतोय तिला. सगळा निसर्गच बहकला असल्याची भावना होतेय. या गाण्याचे अजुन एक वैशिष्ठ्य म्हणजे थेट खर्‍याखुर्‍या स्पॉटवर केलेले चित्रिकरण. यात कुठेही स्टुडिओमधली कृत्रिमता नाहीये. सगळे चित्रिकरण थेट मुंबईच्या रस्त्यांवर केलेले आहे. सत्तरच्या दशकातील देखणी मुंबई गाण्यातून डोकावत राहते. पावसाच्या संततधारेत भिजलेली, गारेगार करणार्‍या वार्‍यात रमलेली मुंबई या गाण्यात जाणवत राहते. मुंबईत कोंक्रिटचे साम्राज्य निर्माण होण्यापूर्वीच्या देखण्या इमारती, अजुनही अधुन मधुन डोकावणार्‍या छोट्या-छोट्या बंगल्या. रेनकोट घालून पावसात भिजत शाळेला जाणारी छोटी छोटी मुले, छत्र्या घेवून ओफिसला निघालेले सामान्य मुंबईकर, उधाण आलेला समुद्र, पावसाचे पाणी उडवत भर्रकन जाणार्‍या देशी-विदेशी गाड्या आणि या सगळ्यातून जणुकाही आपण त्या गावचेच नाही अश्या भावनेने आजुबाजुची सर्व सृष्टी विसरून आपल्याच विश्वात रममाण झालेले नायक-नायिका. यात जोडीला असते पंचमदांचे अवीट संगीत आणि लताबाईंचा दैवी आवाज.

हे गाणे इथे ऐकता येइल…

https://g.co/kgs/DDmc8f

पण खरं सांगू, मला हे गाणे आवडते ते बासुदांच्या जगावेगळ्या रोमँटिसिझममुळे. भले ही हे गाणे चित्रपटाच्या नायक-नायिकेवर चित्रीत झालेले असेल पण बासुदांचे दिग्दर्शन इतके मनस्वी आणि साजिरे आहे की गाण्यातून आपल्याला क्षणोक्षणी अजुन एक वेगळीच प्रेमकहाणी जाणवत राहते. पाऊसवेड्या धरित्रीची आणि प्रियेला भेटायला आतूर झालेल्या प्रेमातुर पावसाची. जलमय झालेल्या सृष्टीची, जागोजागी साचलेल्या पावसाच्या पाण्याची.

पानोपानी तरुवेलींची
घेत चुंबने सुटला पाऊस
स्पर्शाने मोहरली वसुधा
गात्रोगात्री रुजला पाऊस

निसर्गाच्या नाना कळा, नाना रंग , विविध रूपे. निसर्ग जेव्हा आपल्याच लहरीत, स्वतःच्याच तालावर डोलायला लागतो ना, तेव्हा त्याच्या लीला , त्याची रूपे पाहण्यासारखी असतात. त्यातही त्याचा मुड आनंदी असेल तर मग सगळे विश्वच सुंदर होऊन जाते. मग अगदी एखाद्या शुष्क, पर्णहीन वृक्षाला सुद्धा एक वेगळेच सौंदर्य प्राप्त होते. पावसाळा म्हणजे अशीच पर्वणी असते.  पाऊस जर फार मोठा नसेल ना तर त्या पावसाची एक वेगळीच गंमत असते. मातीला एक जीवघेणा , वेड लावणारा गंध सुटलेला असतो.पावसाच्या आगमनाने वसुधा जणुकाही मोहरून गेलेली असते. अश्यावेळी मला सानेकरांच्या ओळी आठवतात.

उनाड पाऊस, अशांत पाऊस, अधीर भिरभिणारा पाऊस
निरोप घेऊन आभाळाचा भटके हा बंजारा पाऊस

पावसाचा तो अधीरेपणा सांभाळत, जणुकाही मेघांचा तो निरोप घेवून पृथ्वीकडे झेपावणार्‍या त्याच्या थेंबा थेंबातून त्याची आतुरताच झळकत असते. त्याचे थेंब पृथ्वीवर पोचले रे पोचले की त्यांच्या स्पर्शाने ओलावलेले रस्ते तो गंध घेवून सगळीकडे पसरवण्याच्या कामात व्यग्र होवून जातात. वारा आपल्याबरोबर जिथे जाईल तिथे पावसाच्या आगमनाची द्वाही घेवून जात राहतो. आणि कवि योगेश गौड यांच्या देखण्या ओळींना पंचमदांचा दैवी स्वरसाज लेवून जन्माला आलेले हे गाणे आपल्या गात्रागात्रांतुन, मनाच्या प्रत्येक स्तरावर हळुहळू झिरपत चित्तवृत्तीतून सतारीचे स्वर झंकारायला लागते….

रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाये मन
भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन !
पुढचे काही महिने सगळी वसुंधरा आपल्या प्रियाच्या समवेत प्रणयाराधन करत सगळ्या सृष्टीला प्रेममय करण्यात रममाण झालेली असते.
धन्यवाद.
विशाल विजय कुलकर्णी, पनवेल. ९९६७६६४९१९