All posts by अस्सल सोलापुरी

It's all about me and my passion for poetry, prose, travel, friends and a lot more...

निसर्गाचे संगीत

निसर्गाचे संगीत…

कालच्या विकांताला (बऱ्याच काळानंतर) उंडगायला बाहेर पडलो होतो, सहकुटुंब! ‘पाऊस’ असा छान बरसत होता की जणु काही एखादे व्रात्य पोर आईची नजर चुकवून घराबाहेर पळावे आणि अंगणात साचलेल्या पाण्याच्या डबर्‍यांतून, ओहोळातून त्याने मजेत फतक-फतक करत नाचायला सुरूवात करावी. तितक्यात त्याचे इतर सवंगडीही जमा व्हावेत आणि त्यांनी फेर धरावा..

पावसाचा तो अधीरेपणा सांभाळत, जणुकाही मेघांचा तो निरोप घेवून पृथ्वीकडे झेपावणार्‍या त्याच्या थेंबा थेंबातून त्याची आतुरताच झळकत असावी. त्याचे थेंब पृथ्वीवर पोचले रे पोचले की त्यांच्या स्पर्शाने ओलावलेले रस्ते तो गंध घेवून सगळीकडे पसरवण्याच्या कामात व्यग्र झालेले दिसत होते.

वेस लांघूनी क्षितीजाची
घन सावळे बरस बरसले
प्रिया बावरी धरा नटावी
नभांत ओले रंग पसरले

एखाद्या नव्वदी ओलांडलेल्या आजीच्या चेहऱ्यावर पसरलेल्या सुरकुत्यांच्या जाळ्यात एखादी तिच्याच वयाची जुनी बालमैत्रीण भेटल्यावर अचानक एक गुलाबी रंगत यावी. दाताच्या बोळक्यातून निरागस, निष्पाप हांसू फुलावं तशी गेल्या ग्रीष्मात होरपळुन निघालेली धरा वर्षेच्या भेटीने नखशिखान्त बहरुन आली होती. हिरवाईचं हंसू लेवुन गवतफुलांच्या कुंदकळ्या चमकवीत वसुंधरा हर्षभरीत होवून गंधाळली होती.

गंधरांगोळ्या रंग रंगल्या…
काळी माती, धवल जलफुले
अलवार बहरली निळावंती
करीत कलरव खग निघाले

तो सोहळा पाहुन आभाळालाही भरून आले नसते तरच नवल. त्यात पावसाच्या आगमनाने धुन्द झालेल्या पक्षीराज मयुराचा केका आसमंतात घुमायला लागला आणि भारावलेली सृष्टी आनंदोत्सव साजरा करु लागली. वातावरणात झालेला बदल पक्ष्यानाही सुखावून गेला होता. त्याची लगबग सुरु झाली. घरट्याची दरूस्ती करायची होती. मोसमासाठी पुरेसे अन्न जमा करून ठेवायचे होते. जो तो कामाला लागला होता. इतके दिवस मरगळुन गेलेल्या निसर्गाने नवी उभारी घेतली आणि आपले साम्राज्य हिरवाईच्या पार्श्वभूमीवर विविधारंगानी रंगवण्यासाठी आपला जादुई कुंचला हातात घेवून तो सिद्ध झाला.

धुंद नाचती मोर काननी
निळे-सावळे मेघही भिजले
सुखे आनंदी विहग बोलती
जलदांचे कुजन नभी रंगले

झाड़े, पाने, वेली, झरे-कालवे सगळेच आपापल्या परीने पावसाच्या स्वागतासाठी सज्ज झाले. वनदेवीने आनंदविणेवर मल्हार छेडला. आता त्यालाही राहवेना. तो सगळा संकोच बाजूला ठेवून अनंत धारांच्या रूपाने सखीकडे झेपावु लागला. आला, आला हो…. पाऊस आला.

त्या जलधारा, मुग्ध तरुवर
अंग-अंग तव मृदगंधे सजले
स्तब्ध वारा सांगतो निर्झरा
आनंदी जगणे बघ गाणे झाले

निसर्गाच्या नाना कळा, नाना रंग , विविध रूपे. निसर्ग जेव्हा आपल्याच लहरीत, स्वतःच्याच तालावर डोलायला लागतो ना, तेव्हा त्याच्या लीला , त्याची रूपे पाहण्यासारखी असतात. त्यातही त्याचा मुड आनंदी असेल तर मग सगळे विश्वच सुंदर होऊन जाते. मग अगदी एखाद्या शुष्क, पर्णहीन वृक्षाला सुद्धा एक वेगळेच सौंदर्य प्राप्त होते ! आमच्या शांताबाई (शेळके) म्हणतात…

पावसाच्या धारा येती झरझरा
झांकळलें नभ, वाहे
सोंसाट्याचा वारा
रस्त्याने ओहोळ जाती खळखळ
जागजागीं खाचांमध्ये तुडुंबले जळ

खरेतर समस्त निसर्गातच इतके संगीत ओतप्रोत भरलेले आहे की इतर कुठल्या मानवनिर्मित संगीतसाधनांची, वाद्यांची गरजच पडू नये. सतत कानावर येणारा भुंग्याचा गुंजारव, या फुलावरुन त्या फुलाकडे जाताना त्यांच्या पंखांची हळुवार आवाजातली गुणगुण किती श्रवणीय असते. कधी शांत, कोमलपणे तर कधी बेभान होत वाहणाऱ्या समीराची कानात साठवून ठेवावीशी वाटणारी सळसळ नेहमीच मनाला मोहवून टाकते.

कोयल की कुहू कुहू
पपिहे की पिहू पिहू
जंगल में झिंगुर की झाये झाये

कोकिळेची ‘कुहू कुहू साद, राव्याचा ‘पीहू पीहू ’ नाद आणि पाऊसकिडय़ांचा अनवरतपणे कानावर येणारा ध्वनी, यांनी सगळ्या निसर्गाचेच संगीत बनवले आहे. लचकत, मुरडत किनाऱ्याकडे झेपावणाऱ्या लाटांचे गाणे ऐकलेय कधी?

त्या गायला लागल्या की तो किनाराही त्यांना आवेगाने साथ देतो . त्या प्रवाही लाटा व स्तब्ध किनारा यांच्या सोबतीने मग कविमनही मुक्त कंठाने गाऊ लागते. ती सरगम हळूहळू सगळ्या आसमंतात झिरपायला लागते.

आणि हे सगळे कमी असते की काय म्हणून रात्रीच्या नीरव शांततेच्या संगीतात कित्येक मानवनिर्मित गोष्टीदेखील भर घालत असतात बरं. रात्रीच्या नीरव शांततेत घड्याळाची अविरत टिकटिक, कुठेतरी दूर एखाद्या पुलावरुन जाणाऱ्या आगगाडीची धडधड. रातकिड्यांची किरकिर, कुठेतरी दूरवर निनादणारी एखाद्या मंदिराची घंटी.., या सगळ्यात एक प्रकारचे दैवी संगीत भरलेले आहे. हे मानवी मनाचे संगीत आहे. प्रत्येक गोष्टीत आनंद शोधण्याची, त्याचे गाणे करण्याची ही ओढ, ही हूरहूर मानवी मनात जागली की मग ते निव्वळ निसर्गाचे न राहता आयुष्याचे संगीत होवून जाते.

© विशाल कुलकर्णी

परीस

परीस ….

अगदी सातवी आठवीत येईपर्यंत सुशि, शरदचंद्र वालिंबे, सुभाष शहा, गुरुनाथ नाइक इथपासुन ते वेदप्रकाश शर्मा, सुरेंद्र मोहन भारती, मेजर बलवंत , ओमप्रकाश शर्मा प्रभुतीची ओळख झालेली होती. त्यामुळे आमच्या वाचनाच्या आवडी-निवडी सुद्धा तश्याच झालेल्या. नाही म्हणायला फ़ाफ़े, फेलूदा आणि अधुन मधून गोट्या, एलिस, पिनाकियो, गलिव्हर, टारझन असायचे जोडीला (यांची भेट कुर्डवाडीच्या नगर वाचनालायात झालेली – इयत्ता चौथी, पाचवीत @विकु).

पण मग आठवी की नववीत असताना वुडहाऊसची एक कथा वाचनात आली. आमची शाळा मराठी मिडियम, त्यामुळे साहजिकच अडलेल्या इंग्रजी शब्दाचे अर्थ जाणून घेण्यासाठी लाडक्या काकड़ेबाईना पकडले. बाईंनी ती कथा तर समजावून दिलीच, पण त्याबरोबर एक मंत्रही दिला. वुडहाऊसचे इंग्रजी जर अवघड जात असेल तर सद्ध्या पुलदे वाच . मोठा झाल्यावर वुडहाउस वाचशीलच. गंमत म्हणजे पु.ल. वाचायला लागल्यावर लक्षात आले की ते सुद्धा वुडहाऊसचे प्रेमी आहेत. (भक्त म्हणायचे होते पण म्हटलं नकोच, उगीच कुणाच्यातरी भावना दुखवायच्या). तर सांगायचे इतकेच की काकड़ेबाईंनी पुलदे नावाचे जालिम व्यसन लावले आणि मी कट्टर व्यसनी बनलो.

तोपर्यंत विनोदी वाचन झालेले नव्हते अशातला भाग नव्हता चिं. वि. जोशीचा चिमणराव किंवा गडकरींचा बाळकराम वाचले होतेच. पण पुलंनी टेस्टच बदलून टाकली. माझ्याबाबतीत म्हणाल तर क़ाय वाचावे याबरोबर का वाचावे हे पुलंनी शिकवले. कुठल्याही जड़, अलंकारिक शब्दाचा आधार न घेता साध्या सरळ आणि नेमक्या, सोप्या शब्दात टोकदार तरीही न दुखावणारा विनोद क़ाय असतो हे पुलदे वाचताना समजले. तत्कालीन विनोदी लेखकांच्या बहुतांशी लेखनातून आलेला विनोद हा तात्कालिक परिस्थितीवर आधारीत असायचा. आत्यंतिक दारिद्र्य, समाजाच्या जाचक रूढीपरंपरा, लोकांचे दुटप्पी वागणे, तत्कालीन सरकारचे जाचक नियम. कुठल्या ना कुठल्या गोष्टीला शालजोडीतुन फटके मारत, त्या गोष्टीची, व्यक्तीची इनडायरेक्टली खलनायक/खलनायिका म्हणून प्रतिष्ठापना करत त्याला शब्दातुन विरोध म्हणून हा विनोद जन्माला आलेला असे. पुलंच्या विनोदाचे वैशिष्ठ्य हे की त्यात खलनायकाला स्थानच नव्हते. साध्या साध्या शब्दात खळखळून हसायला लावत , छोट्या छोट्या त्रुटी आणि उणीवावर बोट ठेवत हसवताना कुठेतरी नकळत पटकन डोळ्यांत पाणी आणणारा असा पुलंचा विनोद आहे. आठवा ना, व्यक्ती आणि वल्लीमधले कुठलेही पात्र आठवा. एक नंदा प्रधान सोडला तर प्रत्येक व्यक्तिचारित्र हे खळखळून हसवते आणि जाता जाता तुमच्याही नकळत तुमच्या डोळ्यांत पाणी उभे करुन जाते.

“…… अजुन थोड़ा वेळ लागला असता तर आमचा गणपती बाप्पा मोरया झाला असता म्हणणारे पेस्तनकाका असोत, तेवढं प्राचीला गच्ची जुळतय का बघा की, म्हणणारे रावसाहेब असोत, समस्त रत्नाग्रीच्या गाई तुर्तास गाभण क़ाय रे म्हणत येता जाता टोमणे मारणारे अंतुशेठ असोत किंवा पुराव्याने शाबित करेन अशी खात्री देणारे हरितात्या असोत. पुलंच्या प्रत्येक विनोदाला एक करुण, हळवी किनार आहे, जी रडवत नाही पण डोळ्याचे काठ नक्की ओले करते, आतवर कुठेतरी हलवून जाते.

परवा एका मित्रांशी बोलताना त्याच्या कुणा गुणी मित्राचा विषय निघाला. तर आमचा मित्र कौतुकाने म्हणाला,” अरे त्याच्याबद्दल क़ाय सांगणार? क़ाय येत नाही असे नाही. प्रत्येक क्षेत्रात पारंगत आहे, तेंडुलकरच म्हण ना!” माझ्या मनात लगेच पु.ल.च आले. मला वाटते पुलंनी फक्त खेळ हे एकच क्षेत्र सोडले असेल. पण मला खात्री आहे की मनावर घेतले असते तर त्यांनी हे सुद्धा क्षेत्र लीलया गाजवले असते. भल्या भल्या दिग्गजांची सहज हातात बॉल नसतानाही हुकमी विकेट काढ़णारा कसबी गोलंदाज होते पुल. आचार्य अत्रेसारख्या हुकमी पेसरचे चेंडू लीलया सीमेपार पोचवणारा एकमेव फलन्दाज होता तो. गायन, संगीत, लेखन, वक्तृत्व, चित्रपट दिग्दर्शन हे सगळे पैलु तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला होतेच. पण पुलंचे वैशिष्ठ्य म्हणजे ते परीस होते. फेसबुकवरचे एक लोकप्रिय लेखक जयंतदादा विद्वान्स यांनी आजच्या त्यांच्या लेखात म्हटल्याप्रमाणे ज्या ज्या व्यक्तीला, गोष्टीला, प्रसंगाला पुलंचा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा स्पर्श झाला त्या त्या व्यक्तीचे, गोष्टीचे , प्रसंगाचे सोने झालेय.

त्यांची आणि सुनिताबाइंची जोड़ी हे साहित्याच्या बाबतीत महाराष्ट्राला लाभलेले लक्ष्मी-नारायणच म्हणायला हवेत. आपलं जे काही होतं ते सगळं या जोडीने समाजाला देवून टाकलं. त्यांनी दिलेल्या दानावर, देणग्यावर आजही कितीतरी समाजोपयोगी ट्रस्ट चालु आहेत.

पुलंनी मला क़ाय दिलं? तर जगण्यासाठी धन, संपत्ती नव्हे तर एक कारण हवे असते, एक उद्दीष्ठ्य हवे असते हे शिकवलं. प्रत्येक भल्या-बऱ्या गोष्टीकड़े सकारात्मक नजरेने पाहायला शिकवले. हे जग खुप सुंदर आहे आणि आपल्याला ते अजुन सुंदर करायचे आहे याची जाणीव करुन दिली.

आज पुलंचा स्मृतिदिन आहे. त्यांच्या लेखनाबद्दल शेकडो पाने लिहून काढली आहेत साहित्यिकानी. मी पामर क़ाय वेगळे लिहिणार? एवढेच म्हणेन…

थैंक्यू भाईकाका , तुम्हाला भाईकाका म्हणण्याइतकी जवळीक नसेल आपल्यात कदाचित. आपण कधीही भेटलो नसु. पण दररोज भेटणाऱ्या दर दहा व्यक्तीत कुठे ना कुठे आम्हाला पुलदे भेटतात , भेटत राहतील कारण ते आमच्या हृदयात पक्की जागा करून बसलेत हो.

सुरूवातीला उगीचच वाटायचं …
तुम्ही गेलात !

आज इतक्या वर्षानंतरसुद्धा स्वत:लाच खोटं ठरताना, चुकीचं ठरताना पाहूनही इतका आनंद होण्याची अशी उदाहरणे विरळाच ! _/_

सादर अभिवादन ! 💐

© विशाल विजय कुलकर्णी