RSS

आप की आंखो में कुछ…..

तसा मी अगदीच नास्तिक नाहीये, पण तरीही देव, दानव, साक्षात्कार, चमत्कार अश्या गोष्टींवर चटकन विश्वास टाकणं नाही जमत मला. पण मग जेव्हा पंडीतजींचं ‘भाग्यद लक्ष्मी बरम्मा’ कानी पडतं, किंवा सैगलचे ‘सो जा राजकुमारी’ चे सुर कानावर रेंगाळायला लागतात किंवा जेव्हा शास्त्रीय संगीताचे कसलेही शिक्षण न घेतलेले किशोरदा लताबाई, मोहम्मद रफी सारख्या दिग्गजांच्या नाकावर टिच्चून ताकदीने आपले साम्राज्य उभे करतात किंवा कुणी गुलझार जेव्हा एकीकडे “आंपकी आंखोमें” सारखं वेड लावणारं लिहीताना त्याच ताकदीने ‘कजरारे कजरारे’ सारखं भन्नाट काहीतरी लिहून जातो तेव्हा साहजिकच मनात एक प्रश्न उभा राहतो…

देव नसेलही कदाचित या जगात पण काहीतरी दैवी पाठबळ असल्याशिवाय हे असं काही जमवून आणणं, करणं सामान्य, मर्त्य मानवाला शक्य आहे का? की याप्रकारे स्वतः अज्ञात राहून सामान्य मानवाकडून अशी अफाट, अचाट कामं करवून घेणार्‍या त्या शक्तीलाच ‘देव’ म्हणतात? गीत-संगीत हे माझ्या मते मानवी नसून प्रकृतीची, निसर्गाची भाषा बोलणारं, थेट आत्म्याशी संवाद साधणारं एक शक्तीशाली माध्यम आहे. इथे भाषा हा अडसर असुच शकत नाही. माझ्या मते आपल्या व्यावहारिक जीवनातले वेगवेगळे पैलू व्यक्त करण्यासाठी, आपल्या सदसदविवेक बुद्धीचा कौल लक्षात घेवून थेट आत्म्याशी संवाद साधणारी ही एक भाषेपल्याडची भाषा आहे. मानवी आयुष्यातील आनंद, दु:ख, दया, घ्रूणा, राग, प्रेम, शृंगार अशा अनेक घटकांच्या सहज सुंदर आणि थेट अभिव्यक्तीचे हे एक सोपे पण सामर्थ्यवान माध्यम आहे. याला दैवी नाही म्हणायचं तर अजुन काय म्हणायचं?

आता हेच बघा ना कलकत्त्यात जन्माला आलेला ‘पंचम’, सद्ध्या मध्य प्रदेशात असलेल्या ‘खांडव्या’चा एक मिश्कील, खुशमिजाज तरूण ‘आभासकुमार गांगुली’ आणि दिना (सद्ध्या पाकिस्तानात असलेले एक गाव) इथे जन्माला आलेला एक कोमल मनाचा गुलझार कवि ‘संपुरणसिंग काल्रा’ यांना एकत्र यायचे काय कारण होते? ते सुद्धा आपापल्या जन्मभुमीपासून हजारो मैल अंतरावरील एका मायानगरीत. बरं नुसतेच एकत्र नाही आले तर माझ्या सारख्या लाखो, करोडो लोकांचे जगणे समृद्ध करण्याचे काम या तिघांनी एकत्रीतपणे केले. याला दैवी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? देव नावाची काही शक्ती जर असेलच तर ती ‘गीत, संगीत’ यामध्येच पुर्णपणे वास करून आहे यावर माझा ठाम विश्वास आहे.

हे चमत्कार इथेच थांबत नाहीत. तर पुढे जावून कुणीतरी ‘माणिक चटर्जी’ नावाचा एक वेड लावणारा वेडा या तिघांबरोबरच सिने सृष्टीतले अजून तिन हिरे निवडतो आणि त्यातुन जे काही निर्माण होतं ते निव्वळ अवर्णनीय असंच असतं. आपली अवस्था अगदी…. “आज काल पाव जमींपर.., नही पडते मेरे” अशी होवून जाते.

किशोरदांनी त्यांच्या फिल्मी आयुष्यात साकारलेल्या बहुतेक भुमिका विनोदीच होत्या, पण या विनोदी स्वभावाच्या माणसामध्ये एक विलक्षण संवेदनशील आणि गंभीर प्रवृत्तीचा गायक कायम तरूण होता. किशोरदांनी बर्‍याच संगीतकारांसाठी कित्येक अमर गाणी दिली आहेत, पण त्यांचं गोत्र जुळलं होतं ते म्हणजे ‘पंचमदा’ उर्फ राहुल देव बर्मन यांच्याशी. किशोरदांनी इतरांबरोबर जितकी म्हणून द्वंद्वगीते केली त्या सर्व गीतांमधून एक विलक्षण खोडकर स्वभाव डोकावत राहतो, पण पंचमबरोबर मात्र किशोरदांनी नेहमीच आपल्या स्वभावापासून एकदम हटके गाणी दिलेली आहेत. त्यात पंचमदांचं वैशिष्ठ्य हे की एक विनोदी प्रवृत्तीचा गायक म्हणून ओळखला गेलेल्या किशोरदांच्या खर्‍या-खुर्‍या सामर्थ्याची जाणिव किशोरदांना स्वतःलाही आणि इतर जगालाही त्यांनीच करून दिलेली आहे. ‘मेहबुबा’ मधलं ‘शिवरंजनी’ रागातलं ‘ मेरे नैना……..’ असो (मेल व्हर्जन) वा ‘अगर तुम ना होते’ मधलं “हमे और जीनेकी चाहत…” असो, शास्त्रीय संगीताचा कसलाही अभ्यास नसलेले किशोरदा या दोन्ही गाण्यातून लताबाईंपुढे एक जबरद्स्त आव्हान उभे करतात. किशोरदा जास्त करून खुलले ते पंचमसोबतच. आणि अशा या जोडगोळीला त्या तिसर्‍या अवलियाची साथ मिळाली. अतिशय गुंतागुंतीच्या भावनाही सहजपणे समजणार्‍या आणि थेट आतपर्यंत जाऊन पोचणार्‍या, सहजपणे आपल्या आयुष्याशी जुळवून घेणार्‍या शब्दात मांडणारा हा मनस्वी कवि किशोर, पंचमच्या जोडगोळीला येवुन मिळाला आणि मग एकामागुन एक नितांतसुंदर गाण्यांचे खजीने रसिकांसमोर उलगडायला लागले. गुलझारनेच लिहीलेलं ‘खामोशी’ या चित्रपटातील एका गीतातली एक ओळ या अनुशंगाने आठवतेय….

“झुकी हुयी निगाहमें, कही मेरा खयाल था”

यातला जो ‘खयाल’ गुलझारना अपेक्षीत होता त्याला मुर्त स्वरूप दिले किशोरदांनी. याच गाण्यात असे नाही तर नंतर गुलझारबरोबर केलेल्या प्रत्येक गाण्यात किशोरदांनी प्राण भरले. “घर” या चित्रपटातलं हे एक गाणं त्यापैकीच एक….

‘सावन भादो (१९७०) ते ‘घर’ (१९७८) असा रेखाचा ‘घर’ पर्यंतचा प्रवास जर पाहीला तर एक गोष्ट ठळकपणे अधोरेखीत होते की घर पर्यंत रेखा आपल्या चित्रपट करीयरविषयी म्हणावी तितकी गंभीर कधी नव्हतीच. पण ‘घर’ मध्ये माणिकदांनी रेखाचे कॅरेक्टर इतके ताकदवान रंगवले होते की ( आणि अर्थातच रेखाने या पात्राला अतिशय समर्थपणे न्याय दिलेला आहे) या चित्रपटापासून रेखाची कारकिर्दच बदलून गेली. एका बदकाच्या कुरूप पिल्लाचे रुपांतर या चित्रपटाने एका डौलदार राजहंसीत करून टाकले. बरोबर विनोद मेहरा सारखा देखणा सहकलाकार (उगीच नाही रेखा प्रत्यक्ष जीवनातही विनोदच्या प्रेमात पडली) होता.

ghar-aap-ki-aankhon-me-vinod-rekha

खरं बघायला गेलं तर या चित्रपटातली सगळीच गाणी अतिशय सुंदर होती. त्यातल्या त्यात ‘फीर वही रात है’ आणि ‘आप की आंखो में कुछ…” ही दोन गाणी तर एकाला झाकावे आणि दुसर्‍याला काढावे इतकी सरस उतरलेली आहेत. क्षणभर कल्पना करून बघा , “तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला उद्देशून म्हणतोय / म्हणतेय की …

“आपसे भी खुबसुरत… आपके अंदाज है”

अंगावर नाही रोमांच उभे राहीले तरच सांगा. विशेषतः किशोरदा या गाण्याच्या दुसर्‍या कडव्याची सुरूवात करताना “लब हिले तो मोगरेके…….” करतात, तेव्हा त्यांच्या ‘लब हिले तो” च्या उच्चारणावर जीव ओवाळून टाकावासा वाटतो. मला वाटतं लताबाईंच्या आयुष्यातलं हे एकमेव गाणं असेल ज्यात ‘लताबाई’ असुनही मनात ‘ठसून’ राहतो तो ‘गायकाचा’ म्हणजे ‘किशोरदांचा’ आवाज. एकतर अवखळ, खोडकर मुडमधलं हे गीत, त्याला किशोरदांसारखा तेवढाच अवखळ आणि ताकदीचा गायक आणि गुलझारसाहेबांचे जानलेवा शब्द…. देता किती घेशील दो कराने? अशी अवस्था होवून जाते आपली.

आपकी आंखोमें कुछ महके हुये से राज है
आपसे भी खुबसुरत.. आपके अंदाज है

असल्या भन्नाट कल्पना फक्त गुलझारनाच सुचू शकतात. म्हणजे बघा ना , म्हटलं तर ‘गुपित’ आहे, पण गुपितही कसं तर दरवळणारं , म्हणजे गुपित असुनही गुपित नसलेलं असं काही तरी. गुपित असुनही आपल्या अस्तित्वाची अलगद जाणिव करुन देणारं असं काहीतरी ! क्या बात है गुलझारसाहब… क्या बात है !

लब हिले तो मोगरे के फूल खिलते है कही
आपकी आंखोमें क्या साहिलभी मिलते है कही
आपकी खामोशियांभी आपकी आवाज है …

प्रेयसीच्या ओठांची तुलना मोगरीच्या पाकळ्यांशी करणं, तिच्या डोळ्यातल्या गहिर्‍या भावनांना सागराच्या लाटांची उपमा देणं आणि वर कळस म्हणजे “तुझं मौनदेखील बोलकं आहे” हे सांगणं ही सगळी गुलझार ल़क्षणं व्यक्त करण्यासाठी किशोरच हवा आणि ती सार्थ ठरवण्यासाठी समोर ‘रेखाच’ हवी.

या गाण्याबद्दल बोलताना ‘गुलझारसाहेब’ एक किस्सा नेहमी सांगतात. जेव्हा गाण्याचं रेकॉर्डींग चालू होतं. तेव्हा एका ओळीवर गुलझार थोडेसे अडकले होते. म्हणजे त्यांना स्वतःला त्या ओळी प्रचंड आवडल्या होत्या. पण त्यातला एक शब्द, त्यातुन ध्वनित होणारा अर्थ त्यांना स्वतःलाच खटकत होता. खटकत होता म्हणण्यापेक्षा त्यांना संकोच वाटत होता. कारण या ओळी गाण्यात लताबाईंच्या म्हणजे एका स्त्रीच्या तोंडी होत्या.

आप की बातोंमें फीर कोइ शरारत तो नहीं
बेवजह तारीफ करना.., आपकी आदत तो नहीं
आपकी ‘बदमाशीयोंके‘ ये नये अंदाज है…..

यातल्या ‘बदमाशीयोंके’ हा शब्द, त्यातून ध्वनित होणारा अर्थ यामुळे गुलझारसाहेबांना प्रचंड संकोच वाटत होता. त्यांनी हळुच लताबाईंना विचारले सुद्धा की हा शब्द ‘बदलुयात’ का आपण? पण लताबाई, किशोर तसेच पंचमचेही मत पडले की तो शब्दच तिथे जास्त पक्का बसतोय. आणि रेकॉर्डींगला सुरूवात झाली.

पहिल्या दोन ओळी रेकॉर्ड झाल्या आणि लताबाईंना रेकॉर्डींगच्या आधी गुलझार यांच्याशी झालेली चर्चा आणि त्यांचा तो संवाद आठवला आणि न राहवून त्यांना हसु आवरलं नाही, त्यांचं ते नाजुक हंसणंदेखील रेकॉर्ड झालं आणि ते मुळ गाण्यात इतकं चपखल बसलं की आजही हे गाणं ऐकताना असं वाटतं की गुलझारनी गाण्याचे बोल लिहीताना ते हास्याचे स्वरही लिहीले असावेत. पण त्या नाजुक हास्याने पुढच्या ओळीला, त्यातला ‘बदमाशी’ या शब्दाला जो काही गहीरा अर्थ मिळवून दिला तो निव्वळ लाजवाबच. हे गाणं केवळ आणि केवळ किशोरदांचं होतं. त्यांनी इतक्या उत्कटपणे गायलय हे गाणं की लताबाई असुनही नसल्यासारख्या आहेत या गाण्यात. अथ पासून इतिपर्यंत फक्त आणि फक्त किशोरदाच व्यापून राहतात या गाण्यात. लताबाईंना गाण्याच्या बाबतीत एवढं डॉमीनेट कुणीच आणि कधीच केलेलं नसेल. पण तरीही लताबाईंशिवाय हे गाणं अधुरं राहीलं असतं हे ही तितकेच सत्य आहे.

या सगळ्यांबरोबर गाण्याच्या यशात तितकाच, किंबहुना काकणभर जास्तच वाटा होता तो पंचमदांच्या संगीताचा. चित्रपटातला प्रसंग,ती परिस्थिती ओळखून त्यानुसार तिला संगीत देणे, त्यानुसार त्या गाण्यातल्या पात्रांना (काम करणार्‍या कलाकारांना नव्हे) साजेशी संगीतरचना करणे ही पंचमदांची खासियत होती. पंचमदाच्या संगीतात बघा , कुठलाही चित्रपट असो, कुठलेही गाणे असो किंवा पार्श्वसंगीत असो ते कधीही अनाठायी, संदर्भहीन वाटत नाही कारण पंचमदांनी आपल्या संगीताचा वापर नेहमीच सिनेमाच्या कथेचा, त्यातल्या पात्रांचा, त्या पात्रांमधील नातेसंबंधांचा, कथेत उपलब्ध परिस्थितीचा पुर्ण अभ्यास करुन त्या संदर्भातच केलेला आढळुन येतो.

किशोरदा आणि पंचमदा दोघेही त्या जगात निघून गेले आहेत. पण त्यांनी दिलेलं हे गीत अजुनही कित्येक वर्षे, दशके रसिकांच्या स्मरणात राहील यात शंका नाही.

विशाल…

 

 

कतेया करु…कतेया करू………..

काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘रॉकस्टार’ने तरुणाईला पुन्हा आपल्या तालावर नाचवलं. खरे तर रणबीर कपूर हा प्राणी फारसा आवडत नसल्याने मी चित्रपट पाहायचा नाही असेच ठरवले होते. पण खुप जणांकडून चित्रपटातील गाण्यांबद्दल ऐकल्यामुळे राहवले नाही आणि शेवटी एक दिवस मुहुर्त लागला. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर रणबीरने अभिनय बरा केलाय. त्याबद्दल त्याला अवार्ड्सही मिळाली. पण मला खुणावलं होतं ते त्यातल्या एका गाण्याने…

“कतेया करू..कतेया करू… कतेया करु तेरी रू !.”

अतिशय सुंदर शब्दरचना आणि हर्शदीप कौरचा मधाळ आवाज, सपना अवस्थीचा नशीला सुर… !

हाय्य…, गाणं खासच रंगलं होतं. जर मी चुकत नसेन तर या गाण्याने हर्शदीपला त्या वर्षीचा ‘अप्सरा फिल्म अँड टेलीव्हिजन प्रोड्युसर्स गिल्ड’चे ‘सर्वोत्कृष्ट गायिकेचे’ पारितोषीकही मिळाले. त्या एका गाण्यासाठी मी २०० रुपये माफ करून टाकले.

हे गाणं इतकं आवडायचं कारण काय? तर हे गाणं ऐकताना आपोआप मन भुतकाळात रेंगाळायला लागलं होतं. अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाला असू बहुदा तेव्हा. सी.ओ.ई.पी.चा बोट क्लब हा आमचा अड्डा असायचा. उद्धवच्या (नाव नक्की आठवत नाहीये आता त्याचं) कँटीनवर अमर्यादीत स्वरुपात चालणारी उधारी हा आमचा तेव्हाचा जगण्याचा महत्त्वाचा आधार असे. कधी त्याच कँटीनच्या आवारात तर कधी बोटक्लबच्या पायर्‍यांवर बसून अनेक गप्पांच्या मैफली रंगलेल्या. पं. भीमसेन जोशी श्रेष्ठ की वसंतखा श्रेष्ठ की कुमार गंधर्व की दीनानाथ मंगेशकर?

चल बे ‘बालगंधर्वा’च्या आवाजात जो गोडवा जी ओढ होती ती कधीच, कुठेच आढळली नाही.

छोड यार, अख्तरीबाईला ऐकलेस का कधी? काय नशाय साला तिच्या आवाजात. अशा अनेक विषयांवर चर्चा रंगायच्या. वाद-विवाद झडायचे. मध्येच कोणी तरी रसिक सैगलची आठवंण काढायचा आणि मग ते सामुहिक रित्या ‘जब दिलही टुट गया’ म्हणायचं….., (ही दिल टुटण्याची वगैरे समस्या फार कॉमन असायची त्या काळी). मग मुकेश कसा सैगलची नक्कल करायचा यावर कोणीतरी तान छेडायचं…

चल बे मुकेशने नंतर स्वतःची अशी एक शैली तरी बनवली. पण सैगलची नक्कल करून मोठे झालेले कलावंत काही कमी नाहीत. दुराणी, आत्मा फार काय रफीची सुरुवात तरी काय वेगळी झाली होती? कुणीतरी कळवळायचा….

रफीची आठवण आली की मग मात्र सगळेच एका ट्रॅकवर यायचे. काहीही असो , त्याकाळी , तशा अवस्थेतही (म्हणजे ७ ते १० तारखेच्या दरम्यान मनीऑर्डर यायची आणि १५ तारखेला संपायची , त्यानंतर उद्धव जिंदाबाद असे..त्या दिवसांत) आमचा ७-८ जणांचा गृप एकमेकाला पक्का धरून होता. त्याला कारणीभुत होते ‘संगीत’ ! त्याबद्दलची अफाट ओढ….. त्याकाळी पुण्यात होणार्‍या प्रत्येक जलश्याला आमची उपस्थिती असेच असे.

गंमत म्हणजे यातला मुकेश किंवा रफीसाहेब सोडले तर बाकी सगळे गायक आमच्यासाठी “आमच्या काळी असं नव्हतं बरं का” म्हणणार्‍यांच्या जमान्यातीलच होते. पण त्या सुरांची मोहिनीच इतकी जालीम होती की आपण या गायकांसाठी खुप नवे, नवखे आहोत ही कल्पनाही मनाला स्पर्शत नसे. मला आता नक्की नाव आठवत नाही पण लक्ष्मीरोडवर कुठेतरी मधल्या एका बोळात एक पानटपरी होती. बहुदा ‘लक्ष्मी पान शॉप’ की असेच काहीतरी नाव होते. तिथे कायम वसंतरावांची गाणी वाजत असायची. ती ऐकण्यासाठी म्हणून आम्ही सायकली हाणत तिकडे जायचो. तर कधी विद्यापीठ रोडवर असलेल्या ‘रेकॉर्ड्स सोसायटी’चे कार्यक्रम ऐकायला धडपडायचो. त्यांच्याकडे तीन तीन मिनीटांच्या खुप तबकड्या होत्या. टेप रेकॉर्डवरची गाणी ऐकण्यापेक्षा त्या तबकड्यांवरचे सुरु उपभोगण्यात जास्त गंमत होती.

असो, पाल्हाळ खुप झाले. तर एके दिवशी असेच संध्याकाळच्या वेळी पाताळेश्वराच्या आवारात आमची मैफल रंगली होती. वेगवेगळ्या गायकांच्या आवाजाबद्दल चर्चा सुरू होती. भीमसेनजी आवाज पहाडी असला तरी गरज असली की तो लाजाळुच्या झाडासारखा मखमली, मुलायम कसा होतो, वसंतरावांच्या मारव्यातली फिरत कशी असते, तलतच्या आवाजातला कंप त्याची ताकद कसा काय आहे? ….एक ना दोन अनेक गोष्टींवर चर्चा सुरू होती. त्यात एकाने लताबाईंचा विषय काढला. लताबाईंचा मधाळ आवाज, सुरांवरची हुकूमत यावर गाडी सरकली.

“काही म्हणा राव पण आवाजात जर मधाळपणा नसेल ना, तर त्याची गोडी फिकी पडते यार. भीमसेनजी कितीही ताकदीचे गायक असले तरी तलतला ऐकताना जी मजा येते ती भीमसेनना ऐकताना नाही येत. ” कुणीतरी पिल्लु सोडलं आणि मिन्या भडकला.

‘मिनानाथ जगताप’ या विचित्र नावाचं हे महा उपद्व्यापी कार्टं म्हणजे आमच्या गृपचा जिव की प्राण होतं. स्वतः खुप सुरेल गायचा मिन्या, त्याचं नरडंही भलतंच गोड होतं राव. पण या माणसाला आवडायचे ते नुरजहा, अख्तरीबेगम, सरदारी बेगम, शमशाद बेगम असे जरा वेगळे आवाज. त्यातही नुरजहाच्या आवाजात विलक्षण गोडवा. पण बाकीच्या सगल्या आवाजात एक प्रकारचा पुरुषी स्वभाव डोकावयाचा…, पण तरीही हे सुर जिवघेणे. वेड लावणारे होते. अख्तरी बेगमच्या आवाजाचं वेड मला मिन्यानेच लावलं…..

“भोसडीच्यांनो कोण म्हणतो आवाज मधाळ नसेल तर मज्जा येत नाही? चला एक कातिल आवाज ऐकवतो….”

आम्ही सगळे थेट ‘लक्ष्मी पान शॉप’ वर.

‘ ए भाऊ, ती ‘कतिया करु’ लाव रे जरा ! या भोसडीच्यांना कळु दे जरा ‘शमशादच्या आवाजात कसली मज्जा होती ते’ ! त्या पानवाल्याने ते गाणं लावलं…

ढोल-ढोलकीच्या पार्श्वभुमीवर शमशाद गायला लागली आणि आमच्यापैकी एकेक जण शहीद व्हायला सुरूवात झाली…..

6627_shamshad

‘हंसराज बहल’चं संगीत आहे, बहुदा. कुठल्यातरी पंजाबी चित्रपटातलं हे गीत. पंजाबी लोकसंगीताचा ठेका, तशीच ठेका धरायला लावणारी धुन आणि शमशादचा नशिला आवाज ! आधीच्या हिरोने आपलं विधान बिनशर्त मागे घेतलं आणि मग आम्ही ‘जनमत’ घेतलं. (जनमत म्हणजे त्यावेळी एखाद्याला खड्डयात घालायचं असेल, पार्टी उकळायची असेल तर एकमताने कुठे जायचं? काय खायचं , खायचंच कारण प्यायचं वेड नव्हतं तेव्हा. सुरांची नशाच पुरून उरायची. इतर कुठल्या व्यसनांची गरजच भासली नाही कधी.) गंमत म्हणजे त्या काळी समाधानमध्ये सगळ्यांना पाव सँपल खाऊ घालण्याइतके पैसेही नव्हते त्याच्याजवळ. (हे ही नेहमीचेच) मग नेहमीप्रमाणे काँट्री काढून आमची दणक्यात पार्टी झाली, अर्थात पुढच्या मनी ऑर्डरला त्याच्याकडून पार्टीचा पक्का वायदा घेतल्यानंतरच…..

‘रॉकस्टार’ मधलं ते ‘कतेया करू’ ऐकताना ते जुने दिवस आठवत होते. हर्षदीपचा आवाज ऐकताना मन नकळत कुठेतरी आतल्या आत शमशादच्या ‘कतेया करू’ शी त्याची तुलना करायला लागले होते. अर्थात दोघींचाही आवाज खुप वेगळा आहे, त्यात तुलना होवुच शकत नाही. दोघी आपापल्या ठिकाणी ग्रेट आहेत. पण आम्ही शमशादचे पंखे असल्याने आमचा ओढा शमशादकडेच असणे साहजिक होते.

शमशादच्या आवाजात ’कतेया करु….”

काल ९४ व्या वर्षी ‘शमशाद बेगम’ गेल्याची बातमी कळाली आणि झटकन मनात विचार आला…

“एवढ्या लवकर?”

मी शमशादला कधीही प्रत्यक्ष ऐकलेले नाहीये. तिचा फोटो सुद्धा आता आंतरजालाशी संबंध आल्यावर पाहायला मिळाला. त्या आधी कधीतरी वर्तमानपत्रातुन एखाद वेळेस पाहीला असेल तरच. कारण तसेही आम्ही ऐकायला लागलो तेव्हा शमशादची सद्दी संपली होती. लताबाईंचा, आशाबाईंचा जमाना सुरू झाला होता. पण शमशाद बेगमच्या आवाजाची नशा जी तेव्हा चढली ती कधी उतरलीच नाही…

पण निदान माझ्यासाठी तरी ‘शमशाद बेगम’ कालपर्यंत ते “कतेया करु” गाणारी शमशाद बेगमच (त्यावेळी देखील ती जवळपास ४४ वर्षाची होती वरं का, १९६३ साली गायलेलं आहे हे गाणं तिने) होती , माझ्यासाठी ती चिरतरूणच होती आणि राहील….

शमशाद बेगम, हमे पता है अब आप अल्ला तालाके दरबारमें अपनी कला पेश करेगी, लेकीन दिलसे….. हम आपको भुला नहीं पायेंगे, कभी भुला नही पायेंगे…..!

विशाल….

 
 
%d bloggers like this: